भारतीय नौदल कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज; व्हाईस ॲडमिरल स्वामीनाथन यांचे प्रतिपादन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
भारतीय नौदलाचे नियोजित प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन
भारतीय नौदलाचे नियोजित प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन

 

भारताला अनेक वर्षांपासून सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता परकीय भूमीवरून होणाऱ्या कोणत्याही दुस्साहसाला चोख आणि सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे, असा स्पष्ट इशारा भारतीय नौदलाचे नियोजित प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी दिला आहे. मुंबईत 'ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन'ने आयोजित केलेल्या एका विचारमंथन कार्यक्रमात ते बोलत होते.

'ऑपरेशन सिंदूर' आणि दहशतवादाला उत्तर

परकीय भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवाया भारत अजिबात खपवून घेऊ शकत नाही, असे स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चा विशेष उल्लेख केला. पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतांश पर्यटक होते. याला उत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. स्वामीनाथन म्हणाले की, भारत यापुढेही दहशतवादाचा बळी ठरू नये यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' अत्यंत महत्त्वाचे होते.

पाकिस्तानच्या इशाऱ्याला सडेतोड प्रत्युत्तर

पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अलीकडेच भारताला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. याला उत्तर देताना स्वामीनाथन म्हणाले की, "भारत कधीही स्वतःहून कोणतीही आगळीक करत नाही. आपण नेहमी प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेत असतो. हे दुस्साहस नेहमी सीमेपलीकडूनच होते. लोक काहीही बोलू शकतात, पण आम्ही आमच्या बाजूने पूर्णपणे तयार आहोत आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत."

सागरी सुरक्षा आणि स्वावलंबन

सध्याच्या काळात जागतिक सुरक्षेचे वातावरण वेगाने बदलत आहे. पुरवठा साखळ्यांचा शस्त्रांसारखा वापर होत असून तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. याकडे लक्ष वेधत स्वामीनाथन म्हणाले की, भारताचा सुमारे ९५ टक्के व्यापार हा समुद्रामार्गे चालतो. देशाची ऊर्जा सुरक्षा आणि इंधनाचा पुरवठा जहाजांद्वारेच होतो, त्यामुळे सुरक्षित सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचे आहेत. "हिंदी महासागर आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्र हे २१ व्या शतकातील भू-राजकीय स्पर्धेचे मुख्य केंद्र बनले आहे आणि भारतीय नौदल या क्षेत्राचे रक्षणकर्ते आहे," असे ते म्हणाले.

भारतीय नौदल हे केवळ शांतताकाळातील दल नसून ते एका अत्यंत गुंतागुंतीच्या सागरी क्षेत्रात सतत तैनात असते. सुरक्षेसाठी आणि संरक्षण सज्जतेसाठी परदेशी पुरवठादारांवर जास्त अवलंबून राहणे देशासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि यंत्रणा विकसित करून स्वावलंबनावर नौदलाने भर दिला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. व्हाईस ॲडमिरल स्वामीनाथन हे ३१ मे रोजी ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी निवृत्त झाल्यानंतर नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.