संयुक्त राष्ट्रात भारतीय गणिताचा डंका; एस. जयशंकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात भारतीय संस्कृतीच्या गणितातील अतुलनीय योगदानावर आधारित एका विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन केले. विज्ञानाच्या प्रगतीचा जागतिक इतिहास दीर्घकाळापासून अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहिला गेला आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी ऐतिहासिक विकृती सुधारण्याची गरज व्यक्त केली.

'शून्य ते अनंत (Zero to Infinity) - भारतीय संस्कृतीचे गणितातील योगदान' असे या प्रदर्शनाचे नाव आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी मिशन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि इंडिया इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विज्ञानाच्या इतिहासातील सांस्कृतिक समतोल

उद्घाटनप्रसंगी बोलताना जयशंकर म्हणाले की, जेव्हा आपण संयुक्त राष्ट्रात एकत्र येतो, तेव्हा अनेकदा सामायिक मानवी वारशाबद्दल बोलतो. मात्र, आधुनिक इतिहासाकडे पाहिल्यास विज्ञानाच्या प्रगतीचा जागतिक वृत्तांत काळ आणि भूगोलाच्या मर्यादेत, संकुचित दृष्टिकोनातून मांडला गेला आहे. "जसे जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेचे पुनर्संतुलन होत आहे, तसेच सांस्कृतिक पुनर्संतुलन होणेही आवश्यक आहे. आपल्या समृद्ध भूतकाळाचा व्यापक स्वीकार करूनच हे शक्य होईल," असे त्यांनी नमूद केले.

या प्रदर्शनात शून्याचा शोध, दशांश पद्धत, बीजगणित, अल्गोरिदम, खगोलशास्त्रीय गणना आणि भूमिती (बौधायन-पायथागोरस प्रमेय) यांसारख्या प्राचीन भारतीय गणिती संकल्पनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सहस्रकांपासून या संकल्पना भारताकडून जगाकडे कशा प्रवाहित झाल्या, हे येथे मांडले आहे.

शून्यापासून आधुनिक एआयपर्यंतचा प्रवास

जयशंकर यांनी अधोरेखित केले की, तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी इतिहासाचे लोकशाहीकरण होणे गरजेचे आहे. "भूतकाळातील विकृती दुरुस्त केल्याशिवाय आपण भविष्यातील प्रश्नांना अचूकपणे सामोरे जाऊ शकत नाही. आजच्या डिजिटल युगाचा आणि एआयचा (AI) आधार असलेला बायनरी कोड शतकांपूर्वी भारतातच संकल्पित झाला होता," असे त्यांनी स्पष्ट केले.

हे प्रदर्शन आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि भास्कर यांच्यापासून ते केरळ स्कूल ऑफ ॲस्ट्रॉनॉमी अँड मॅथेमॅटिक्सपर्यंतच्या महान भारतीय विद्वानांच्या परंपरेची ओळख करून देते. हे प्रदर्शन केवळ भिंतीवरील आकडे नसून, भारताच्या बौद्धिक मातीत उगम पावलेल्या महान संस्कृतीचा वारसा आहे, जो भविष्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.