"नाटकीपणा सत्य लपवू शकत नाही," भारताने UN मध्ये पाकिस्तानला सुनावले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणाला भारताने शनिवारी सडेतोड उत्तर दिले आहे. शरीफ यांच्या वक्तव्यांना "हास्यास्पद नाट्य" म्हणत, "कोणत्याही प्रकारचे नाटक सत्य लपवू शकत नाही," असे भारताने ठामपणे सांगितले.

'राईट ऑफ रिप्लाय'चा (उत्तर देण्याचा हक्क) वापर करत, भारतीय मुत्सद्दी पेटल गहलोत यांनी पाकिस्तानवर तीव्र टीका केली. "या महासभेने आज सकाळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे हास्यास्पद नाट्य पाहिले, ज्यात त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचे उदात्तीकरण केले, जे त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या केंद्रस्थानी आहे," असे गहलोत म्हणाल्या.

दहशतवादावरील पाकिस्तानच्या भूमिकेवर बोट ठेवत, गहलोत यांनी पहिलगाम हल्ल्यातील इस्लामाबादच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. "कोणतेही नाटक आणि कितीही खोटेपणा सत्य लपवू शकत नाही. हा तोच पाकिस्तान आहे, ज्याने २५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत, जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडाची जबाबदारी घेण्यापासून 'रेझिस्टन्स फ्रंट' या पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवादी संघटनेला वाचवले होते," असे त्या म्हणाल्या.

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या इतिहासाची आठवण करून देत गहलोत म्हणाल्या, "ज्या देशाची दहशतवाद निर्यात करण्याची जुनी परंपरा आहे, त्याला असे हास्यास्पद कथन पुढे आणायला कोणतीही लाज वाटत नाही. लक्षात घेऊया की, याच देशाने ओसामा बिन लादेनला दशकभर आश्रय दिला होता, आणि त्याच वेळी ते दहशतवादाविरोधातील लढाईत भागीदार असल्याचे नाटक करत होते. त्यांच्याच मंत्र्यांनी अलीकडेच कबूल केले आहे की, ते अनेक दशकांपासून दहशतवादी तळ चालवत आहेत." 

यापूर्वी, पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांचा पुनरुच्चार करत म्हटले होते की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मे महिन्यातील लष्करी कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यात "सक्रिय भूमिका" बजावली होती. शरीफ यांनी भारतावर "राजकीय फायदा" उचलण्याचा आणि "निष्पाप नागरिकांना" लक्ष्य केल्याचा आरोप केला होता.

"या वर्षी मे महिन्यात, माझ्या देशाने पूर्वेकडील सीमेवरून झालेल्या विनाकारण आक्रमणाचा सामना केला. शत्रू अहंकाराने आला होता आणि आम्ही त्यांना अपमानाने परत पाठवले," असे शरीफ म्हणाले होते. शरीफ यांनी पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा आपला पूर्वीचा खोटा दावाही पुन्हा केला.