श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या राजकारणात एक मोठा अंतर्गत राजकीय वाद उफाळून आला आहे. श्रीनगरचे खासदार आगा सैयद रुहुल्लाह मेहदी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांना एक चिठ्ठी लिहून पक्षाच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर आणि धोरणांवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. आर्टिकल ३७० च्या मुद्द्यावरून पक्षाच्या भूमिकेत आलेली नरम भूमिका आणि केवळ राज्याचा दर्जा बहाल करण्याला अंतिम ध्येय मानण्यास त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.
खासदार रुहुल्लाह यांनी आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, केवळ राज्याचा दर्जा बहाल करणे हा जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी पूर्ण न्याय असू शकत नाही. जर पक्षाने केवळ राज्याच्या दर्जालाच आपल्या मागण्यांची अंतिम मर्यादा मानले, तर ऑगस्ट २०१९ मधील घटनात्मक बदलांना आपसूक मान्यता दिल्यासारखे होईल. दरम्यान, या वादाची पार्श्वभूमी अशी आहे की, काही दिवसांपूर्वी फारूक अब्दुल्ला यांनी पक्षाच्या भूमिकेवर जाहीरपणे बंडखोरी करणाऱ्या रुहुल्लाह यांना थेट राजीनामा देऊन जनतेच्या दरबारात जाण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून रुहुल्लाह यांनी आपली चिठ्ठी सार्वजनिक करत नेतृत्वालाच थेट उत्तरदायित्वाचे धडे दिले आहेत.
रुहुल्लाह यांनी आपल्या पत्रात नॅशनल कॉन्फरन्सच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याचा दाखला दिला आहे. निवडणुकीदरम्यान पक्षाने आर्टिकल ३७० च्या पुर्नस्थापनेसाठी लढा देण्याचे आश्वासन दिले होते, मग आता सरकार स्थापन झाल्यानंतर त्या मुद्द्यापासून मागे का हटले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. पक्षाचे धोरण भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळे का वाटत नाही, असा कळीचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या अंतर्गत कलहामुळे जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळाचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे.