काठमांडू
मध्य नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे (Flash Floods) मृतांची संख्या वाढून ५४७ वर पोहोचली आहे. भुते कोशी नदीच्या खोऱ्यात पाण्याची पातळी पुन्हा वाढल्यामुळे आणि नवीन पूर येण्याच्या शक्यतेमुळे शुक्रवारी बचाव आणि शोध मोहिमेत अत्यंत सावधगिरी बाळगण्यात आली. नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागात गाळासह पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा पूर येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
बुधवारी रसुवा आणि मध्य नेपाळच्या इतर भागांमध्ये आलेल्या महापुरात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बचाव पथके आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, आठ जिल्ह्यांमधून ५४७ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्यापही हजारो लोक बेपत्ता आहेत. चितवन, नवलपरासी पूर्व, गोरखा आणि नुवाकोट या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर मृतदेह सापडले असून रुग्णालयांच्या शवागारांमध्ये जागा अपुरी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.
या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने २९ ऑगस्टपासून पुढील सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पंतप्रधान बालेन्द्र शाह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपला एक महिन्याचा पगार मदत निधीत देण्याचे जाहीर केले आहे. प्रभावित व्यक्ती आणि व्यवसायांसाठी विशेष मदत व पुनर्वसन पॅकेज तयार करण्याचे निर्देश वित्त मंत्रालयाला देण्यात आले आहेत. दरम्यान, नेपाळ-चीन सीमेवर नवीन अडथळा सरोवर (Barrier lake) तयार झाल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.