ओवैसींसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी बीजेपी नेते बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाशी भेट घेऊन त्यांच्या सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन आणि अल्जीरिया दौऱ्याचा आढावा घेतला. या दौऱ्यात शिष्टमंडळाने पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांना उघड केलं.

शिष्टमंडळाने परराष्ट्रमंत्र्यांना आपला अहवाल सादर केला. माजी परराष्ट्र सचिव हर्ष व्ही. श्रृंगला म्हणाले, “ही अतिशय चांगली बैठक झाली. सर्व सदस्यांनी आपले मत मांडले आणि अनुभव सांगितले.” जयशंकर यांनी शिष्टमंडळाचं उद्दिष्ट साध्य झाल्याचं सांगत सर्वांचं अभिनंदन केलं, असं श्रृंगला यांनी नमूद केलं.

पांडा यांनी पत्रकारांना सांगितलं की, हा दौरा यशस्वी झाला आणि भारताच्या दहशतवादविरोधी “नव्या दृष्टिकोनाची” माहिती देण्यात यश आलं. “चार देशांचा दौरा—बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया आणि अल्जीरिया—यशस्वी झाला. हे देश दहशतवादाविरुद्ध ठोस पावलं उचलतात आणि भारताच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेला समर्थन देतात,” असं पांडा यांनी X वर पोस्ट केलं.

पांडा म्हणाले, “भारत अहिंसेचा देश आहे, आम्हाला कोणतंही समर्थन देण्याची गरज नाही. आम्ही अनेक देशांतील लोकांना आश्रय दिला आहे. दहशतवादी हिंसाचाराला प्रत्युत्तर देण्याचा आणि पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा थांबवण्यास भाग पाडण्याचा आमचा संदेश आहे.” भारताने आर्थिक निर्बंध लादले असून, या देशांनी केवळ आर्थिक वाढीतच नव्हे, तर दहशतवादविरोधातही भारताला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं.

शिष्टमंडळात माजी जम्मू-काश्मीर मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू, निशिकांत दुबे आणि असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश होता. या दौऱ्यात परदेशी नेते आणि भारतीय समुदायाशी संवाद साधत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश केला गेला. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter