Manipur : सुरक्षा दलांकडून सहा दहशतवाद्यांना बेड्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मणिपूरमधील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोध मोहिमेत विविध बंदी घातलेल्या संघटनांच्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी बळजबरीने भरतीसाठी पकडून ठेवलेल्या तीन तरुणांची सुरक्षा दलांनी सुखरूप सुटका केली आहे.

दहशतवादी संघटनांचा भरतीचा डाव उधळला

इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील लामलाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोंगडा चाना परिसरातून सोमवारी 'पीपल्स लिबरेशन आर्मी' (PLA) या बंदी घातलेल्या संघटनेच्या चार सदस्यांना ताब्यात घेण्यात आले. हे दहशतवादी तीन तरुणांना बळजबरीने आपल्या संघटनेत भरती करण्यासाठी घेऊन जात होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या तरुणांची सुटका केली आणि चारही आरोपींना अटक केली.

शस्त्रे आणि दारुगोळा जप्त

दुसऱ्या एका कारवाईत, सुरक्षा दलांनी चुराचंदपूर जिल्ह्यातील गेलजांग गावाजवळून 'झोगम लिबरेशन फ्रंट' (ZLF) च्या एका सदस्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. तसेच, काकचिंग जिल्ह्यातील इरेंगबंद येथून 'केसीपी' (KCP - ताैबांगनबा) या संघटनेच्या एका सक्रिय सदस्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून चार बंदुका आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

मणिपूरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारानंतर सुरक्षा दलांकडून सातत्याने शोध मोहिमा राबवल्या जात आहेत. मे २०२३ पासून मेतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत २६० हून अधिक लोकांचा बळी गेला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. राज्यातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दले सातत्याने प्रयत्न करत आहेत.