‘इतिहासातून धडा घ्या आणि देशाला महासत्ता बनवा’

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'मध्ये तरुणांशी संवाद साधताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'मध्ये तरुणांशी संवाद साधताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

राजीव नारायण

राष्ट्राच्या स्थित्यंतराच्या काळात इतिहास केवळ कुजबुजत नाही, तर तो आपल्यासमोर थेट उभा ठाकतो. 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नेमकी हीच वेळ साधली. त्यांनी भारताच्या तरुणांशी संवाद साधताना केवळ गोड बोलणे टाळले आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. भारताचे नशीब केवळ सरकार किंवा धोरणे ठरवणार नाहीत, तर तरुण पिढी कशा प्रकारचे नेतृत्व विकसित करते, यावरच देशाचे भविष्य अवलंबून असेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक निश्चित दिशा आणि वेग पकडला आहे. हा वेग इतका निर्णायक आहे की, आज देश 'ऑटोमॅटिक मोड'वर असला तरी तो वेगाने प्रगती करेल. मात्र, डोवाल यांनी सावध केले की, उद्दिष्टाशिवाय वेगाला काहीच अर्थ नसतो. हे उद्दिष्ट आपल्या इतिहासात, जाणीवांमध्ये आणि दृढ निश्चयामध्ये रुजलेले असावे लागते.

डोवाल यांनी स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख केवळ एक सोहळा म्हणून केला नाही, तर तो एक जिवंत वारसा असल्याचे सांगितले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग ही केवळ दगडी स्मारके नाहीत. हे ते तरुण भारतीय होते ज्यांनी अतोनात हाल सोसले आणि आपले सर्वस्व पणाला लावले, जेणेकरून या प्राचीन संस्कृतीला तिची ओळख पुन्हा मिळवून देता येईल. 

आजही त्यांचे महत्त्व हे केवळ जुन्या आठवणींत नसून त्यांनी जपलेल्या धैर्यामध्ये आणि स्पष्टतेमध्ये आहे. "सामर्थ्य हे प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे," असे डोवाल म्हणाले. मग ते सीमा सुरक्षा असो, आर्थिक शक्ती असो, सामाजिक एकता असो किंवा संस्थात्मक मजबुती असो. या बहुआयामी ताकदीशिवाय देश भरकटतात, पण ही ताकद असेल तर ते इतिहास घडवतात.

या संदर्भात, डोवाल यांच्या भाषणातील 'बदला' (Revenge) या शब्दावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. हे अत्यंत दुर्दैवी आणि खोडसाळपणाचे आहे. मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी केलेला हा एक केविलवाणा प्रयत्न होता. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर ठरते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या संदेशाचा मूळ हेतू कोणा व्यक्ती किंवा राष्ट्राविरुद्ध सूड घेणे हा कधीच नव्हता. तो संदेश होता पुनर्निर्मितीचा, कर्तृत्वातून मिळणाऱ्या आदराचा आणि राष्ट्रीय नवनिर्माणाच्या संकल्पाचा. अशा कुरापती बाजूला सारून काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

ऐतिहासिक चुकांतून धडा घेण्याची गरज

भारताचा भूतकाळ केवळ आध्यात्मिक श्रीमंतीचा नव्हता, तर तो आर्थिक आणि संस्थात्मक ताकदीचाही होता. शतकानुशतके भारत जगातील आघाडीची आर्थिक महासत्ता होता. हे अपघाताने घडले नव्हते, तर व्यापार, शिक्षण, उत्पादन आणि सुशासनाच्या भक्कम यंत्रणेवर ते आधारलेले होते. साम्राज्यवाद आणि परकीय राजवटीने ही सर्व यंत्रणा मोडून काढली, संपत्ती लुटली आणि आपला आत्मविश्वास हिरावून घेतला. स्वातंत्र्याने राजकीय स्वातंत्र्य तर दिले, पण राष्ट्राचे सामर्थ्य पुन्हा मिळवण्याचे काम अजूनही अपूर्ण आहे.

डोवाल यांनी दिलेला "इतिहासातून धडा घेण्याचा" सल्ला याच संदर्भात समजून घेतला पाहिजे. इतिहास ही केवळ तक्रारींची यादी नसून ते एक धोरणात्मक मार्गदर्शक पुस्तक आहे. आपण का हरलो हे जे राष्ट्र विसरते, त्यांच्यावर पुन्हा अधोगतीची वेळ येते. त्यामुळे हा पुकार जुन्या नुकसानीवर शोक करण्यासाठी नसून त्या आठवणींना प्रेरणेत बदलण्यासाठी आहे. गाफील राहिल्यामुळे किंवा आपापसातील फुटीमुळे आपण पुन्हा कधीही असुरक्षित होणार नाही, असा संकल्प आपल्याला करावा लागेल.

तरुण पिढी: केवळ लाभार्थी नव्हे, तर देशाचे भागीदार

या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी भारताचे तरुण आहेत. जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेल्या भारताकडे एक मोठा लोकसंख्याशास्त्रीय फायदा आहे, जो आपल्याला पुढे नेऊ शकतो किंवा अडथळाही ठरू शकतो. डोवाल यांचा संदेश स्पष्ट होता की, तरुण हे केवळ लाभार्थी नाहीत, तर ते या प्रवासातील भागीदार आहेत. त्यांनी स्वीकारलेले नेतृत्वच देशाची भविष्यातील वाटचाल ठरवेल.

पंतप्रधान मोदींनीही सातत्याने या विषयावर भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्स, डिजिटल पायाभूत सुविधा, संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन आणि अंतराळ तंत्रज्ञान यावर दिलेला भर हा तरुणांना परिवर्तनाच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठीच आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी असलेले अडथळे दूर झाले आहेत आणि जागतिक महत्त्वाकांक्षेला प्रोत्साहन दिले जात आहे. ही पिढी पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने भरलेली आहे, यावर ठेवलेला हा एक विश्वास आहे.

मात्र, केवळ महत्त्वाकांक्षा पुरेशी नसते. नेपोलियनचा दाखला देत डोवाल यांनी तरुणांना आठवण करून दिली की, नेतृत्वच राष्ट्राचे भविष्य ठरवते. नेतृत्व केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसते; ते उद्योजकता, शिक्षण, तंत्रज्ञान आणि समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसते. भारताच्या तरुणांसमोर आता प्रश्न हा नाही की ते नेतृत्व करतील का, तर ते 'कसे' नेतृत्व करतील आणि त्यांची मूल्ये काय असतील, हा आहे.

इराणचे उदाहरण: नेतृत्व डळमळीत झाल्याचे परिणाम

जागतिक परिस्थिती पाहता या हाकेची निकड अधिक स्पष्ट होते. आज जगातील अनेक विकसित देश आर्थिक मंदी, सामाजिक फूट आणि राजकीय थकव्याशी झुंजत आहेत. ज्या संस्था कधीकाळी अढळ वाटत होत्या, त्या आज दबावाखाली आहेत. याउलट भारताने विकास आणि कल्याण, धोरणात्मक स्वायत्तता आणि जागतिक सहभाग यांचा योग्य समतोल राखला आहे.

ज्यांना हे जमले नाही, त्यांच्यासाठी इराणचे उदाहरण आज डोळे उघडणारे आहे. एक प्राचीन आणि संसाधन संपन्न संस्कृती राष्ट्रीय उद्देश, आर्थिक लवचिकता आणि खंबीर नेतृत्वाच्या अभावामुळे कशी संकटात सापडू शकते, याचा तो धडा आहे. एकेकाळी पश्चिम आशियातील एक मोठी शक्ती असलेला इराण आज आर्थिक डबघाईला आला आहे. त्यांचे चलन (रियाल) कोसळले असून महागाईने आकाश गाठले आहे. तिथली तरुण पिढी आज वैचारिक कारणांमुळे नव्हे, तर आर्थिक विवंचनेमुळे रस्त्यावर उतरली आहे. निर्बंध आणि चुकीचे व्यवस्थापन यामुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. जर नेतृत्व संस्थांचे नूतनीकरण करण्यात आणि सामाजिक एकता राखण्यात अपयशी ठरले, तर नैसर्गिक साधनसंपत्ती आणि गौरवशाली इतिहासही देशाला वाचवू शकत नाही, हेच यातून स्पष्ट होते.

जागतिक आव्हाने आणि भारताची जबाबदारी

जागतिक परिस्थिती कोणाचीही दया माया करत नाही. आर्थिक कमकुवतपणा असेल तर बाहेरून दबाव वाढतो. त्यामुळे डोवाल यांनी इराणचा दिलेला संदर्भ हा एक इशारा होता. राष्ट्रे एका रात्रीत कोसळत नाहीत; जेव्हा राष्ट्रीय चेतना कमकुवत होते आणि नेतृत्व डळमळीत होते, तेव्हा त्यांचा ऱ्हास हळूहळू सुरू होतो. म्हणूनच भारत कोणत्याही प्रकारची शिथिलता किंवा गोंधळ परवडवून घेऊ शकत नाही. आपला उदय हा अंतर्गत एकता आणि संस्थात्मक विश्वासार्हतेवर आधारलेला असावा लागेल.

आज आपल्याला कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे? केवळ आवाज करणाऱ्या नेतृत्वाची नाही, तर गंभीर नेतृत्वाची गरज आहे. भारताची सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक विविधता ही अडथळा नसून ती एक शक्ती आहे. नेतृत्व हे निर्णयक्षम असावे पण समाजात फूट पाडणारे नसावे. ते आत्मविश्वासपूर्ण असावे पण गर्विष्ठ नसावे. ते आपल्या मुळांशी जोडलेले असावे पण संकुचित नसावे.

पुढचा मार्ग खडतर असला तरी स्पष्ट आहे. आपल्याला भविष्यातील कौशल्ये देणाऱ्या शिक्षणात गुंतवणूक करावी लागेल. आर्थिक संधी केवळ काही क्षेत्रांपुरत्या मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपल्या संस्था इतक्या मजबूत हव्या की त्या देशात विश्वास आणि जगात आदर निर्माण करतील.

देश घडवणे ही एकट्याची जबाबदारी नाही, ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. मग ते प्रामाणिक प्रशासन असो, वैज्ञानिक संशोधन असो किंवा जागरूक नागरिकत्व. डोवाल यांचे भाषण ही चिथावणी नव्हती, तर ते एक बोलावणे होते. भारताकडे आज तरुण शक्ती, आर्थिक वेग आणि जागतिक महत्त्व या तिन्ही गोष्टी आहेत. या संधीचे सोने करायचे की ती गमावायची, हे सर्वस्वी नवीन पिढीवर अवलंबून आहे. अजित डोवाल यांनी आपली भूमिका मांडली आहे, आता त्यावर तरुणांनी दिलेले उत्तरच भारतीय संस्कृतीचा पुढचा काळ आणि जगाचा समतोल ठरवणार आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter