डॉ. समीना बेगम : आरोग्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेचे जीवन बदलणाऱ्या लोकनेत्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 17 h ago
नगरसेविका डॉ. समीना बेगम
नगरसेविका डॉ. समीना बेगम

 

मलिक असगर हाश्मी

राजकारणात अनेकदा खूप आरडाओरडा करणाऱ्या नेत्यांचीच जास्त चर्चा होते. पण तेलंगणाच्या राजकारणात एक वेगळे चित्र पाहायला मिळते. तिथे एका नेत्याच्या शांततेतूनही त्यांच्या कामाचा मोठा आवाज ऐकू येतो. 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन'च्या (AIMIM) या एक अत्यंत महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्या याकूतपुरा भागातील कुर्मगुडा विभागाच्या नगरसेविका आहेत. त्यांचे नाव डॉ. समीना बेगम आहे. नेतृत्वाचा खरा अर्थ केवळ घोषणाबाजी करणे नसून प्रत्यक्ष काम करणे आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.

त्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याप्रमाणेच वैचारिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ आहेत. पण त्यांचे मुख्य लक्ष तळागाळातील लोकांची समाजसेवा आणि परिसराच्या विकासावर केंद्रित असते. हैदराबादबाहेर कदाचित अनेकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसेल. पण हैदराबादमध्ये त्यांचे नाव म्हणजे आशा आणि विश्वासाचे दुसरे रूप बनले आहे.

डॉ. समीना यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. त्या केवळ एक राजकारणी नाहीत. त्या एक उच्चशिक्षित डॉक्टर आणि दूरदृष्टी असलेल्या उद्योजिकाही आहेत. त्यांचे शिक्षण आणि अनुभव हाच त्यांच्या प्रशासकीय आणि सामाजिक कौशल्याचा खरा पाया आहे. त्यांनी युनानी मेडिसिन आणि सर्जरीमध्ये पदवी (BUMS) घेतली. यातून त्यांना आजार आणि उपचारांची सखोल समज मिळाली.

त्यानंतर त्यांनी 'मास्टर ऑफ हेल्थ मॅनेजमेंट'ची (MHM) पदवी मिळवली. या शिक्षणामुळे त्यांना हेल्थकेअर प्रशासनात आणि रुग्णालय चालवण्यात मोठे कौशल्य मिळाले. एवढेच नाही, तर त्यांनी कायद्याची पदवीही (LLM) मिळवली आहे. यातून त्यांना वैद्यकीय कायदे, नीतिमत्ता आणि रुग्णांच्या हक्कांची संपूर्ण माहिती मिळाली. अशा प्रकारे वैद्यकीय, व्यवस्थापन आणि कायदेशीर ज्ञानाचा हा अनोखा संगम त्यांना आपल्या रुग्णालयाचे आणि परिसराचे प्रभावी नेतृत्व करण्यास मोठी मदत करतो.

डॉ. समीना यांनी 'समीना ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स'च्या माध्यमातून समाजसेवेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. १९८७ मध्ये त्यांनी एका छोट्याशा प्रसूतिगृहाच्या रूपाने याची सुरुवात केली होती. हे छोटेसे प्रसूतिगृह पुढे जाऊन एका मोठ्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात बदलेल, असा विचार तेव्हा कुणीच केला नसेल.

 त्यांची कठोर मेहनत, दूरदृष्टी आणि रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची पद्धत आज एका मोठ्या शिखरावर पोहोचली आहे. हे रुग्णालय आज गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी विश्वासाचे मोठे प्रतीक बनले आहे. "राजकारण आपल्या जागी आहे आणि समाजसेवा आपल्या जागी," असे त्या नेहमी आवर्जून सांगतात. याच विचारामुळे त्या रुग्णालय आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर उत्तम समतोल राखतात.

कोविड-१९ च्या भयंकर साथीच्या काळात डॉ. समीना यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. शहर आणि देशातील लोकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण होते. अशा कठीण काळात त्या आघाडीवर राहून लढत होत्या. त्यांनी केवळ आपल्या रुग्णालयाचे दरवाजे रुग्णांसाठी उघडे ठेवले नाहीत, तर रस्त्यावर उतरून मदतकार्यही केले.

त्यांनी आपल्या कुटुंबासह याकूतपुरा येथील सुपर बाजार सरकारी रुग्णालयात जाऊन कोविशिल्ड लस घेतली. त्यांच्या या एका पाऊलामुळे समाजात मोठा विश्वास निर्माण झाला. शेकडो लोकांना लस घेण्यासाठी यातून प्रेरणा मिळाली. राजकारण आणि सेवेचा योग्य समतोल साधल्यास समाजाचे किती मोठे भले होऊ शकते, हे त्यांच्या या प्रयत्नांतून दिसून आले.

केवळ आरोग्यच नाही, तर शिक्षण हादेखील डॉ. समीना यांच्या प्राधान्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी 'समीना विद्या भवन स्कूल' आणि 'समीना व्होकेशनल कॉलेज'ची स्थापना केली. शिक्षण हीच समाजाला पुढे नेण्याची मुख्य गुरुकिल्ली आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. शाळा आणि महाविद्यालयात मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही. तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना व्यावहारिक कौशल्येही शिकवली जातात.

एखादी पिढी शिक्षित आणि सक्षम बनते, तेव्हा समाजातील मागासलेला वर्ग आपोआपच प्रगती करतो, असा त्यांचा अत्यंत स्पष्ट दृष्टिकोन आहे.

डॉ. समीना यांचे व्हिजन केवळ त्यांच्या वॉर्डापुरते मर्यादित नाही. आपल्या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास घडवून आणण्याची त्यांची मोठी इच्छा आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी तिथल्या रेल्वे स्थानकांची व्यवस्था आणि सौंदर्य पाहिले. याकूतपुरा रेल्वे स्थानकही तसेच सुंदर आणि व्यवस्थित बनवण्याचा त्यांनी पक्का निश्चय केला आहे. त्यांचा दृष्टिकोन केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नसून तो जागतिक स्तरापर्यंत विस्तारलेला आहे, हेच यातून दिसून येते.

त्या केवळ कार्यालयात किंवा वातानुकूलित खोलीत बसून आदेश देणाऱ्या नगरसेविका नाहीत. त्या बानू नगर, सलाउद्दीन नगर आणि तालाब चंचलमच्या गल्ल्यांमध्ये पायी फिरतात. ड्रेनेज, पाणीपुरवठा, खराब रस्ते आणि पथदिवे यांसारख्या समस्यांची त्या स्वतः पाहणी करतात.

त्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतात. जोपर्यंत समस्या सुटत नाही, तोपर्यंत त्या अधिकाऱ्यांचा पिच्छा सोडत नाहीत. त्यांची ही सक्रियता आणि कठोर मेहनत त्यांना परिसरातील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय बनवते.

सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांना अनेक आरोग्याच्या आणि वैयक्तिक आव्हानांचा सामना करावा लागला. नुकत्याच त्या डेंग्यूने आजारी पडल्या होत्या. त्यांना नामपल्ली येथील केअर रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयातील तत्काळ उपचार आणि त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्या लवकर बऱ्या झाल्या.

आजारपणही त्यांच्यातील उत्साह कमी करू शकले नाही. रुग्णालयातून सुट्टी मिळताच त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला समाजसेवा आणि परिसराच्या विकासासाठी वाहून घेतले. 'लायन्स क्लब ऑफ चारमीनार सेंटेनियल'च्या सहकार्याने त्यांनी ‘केजीएन क्लिनिक’मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले. हे त्यांच्या अखंड सेवाभावाचे एक उत्तम उदाहरण आहे.

पक्षातही त्यांचे एक वेगळे आणि विशेष स्थान आहे. एआयएमआयएमच्या निर्णयांमध्ये त्या पडद्यामागे राहून अत्यंत धोरणात्मक भूमिका बजावतात. महिलांना पक्षाशी जोडणे, संघटना मजबूत करणे आणि निर्णयांची अंमलबजावणी करणे यात त्यांचे मोठे योगदान असते. २०१६ मध्ये कुर्मगुडा येथून नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी स्थानिक महिलांचा राजकीय सहभाग एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला.

योग्य पात्रता, स्पष्ट दृष्टिकोन आणि सेवेची भावना असेल तर समाजात मोठा बदल घडवून आणता येतो, हे डॉ. समीना बेगम यांच्या जीवनातून सिद्ध होते. त्या केवळ एक डॉक्टर किंवा नेत्या नाहीत. त्या एक अत्यंत दयाळू व्यक्ती आहेत. आपल्या वॉर्डातील आणि परिसरातील लोकांच्या सुख-दुःखात त्या नेहमी सहभागी होतात.

योग्य हेतूने आणि प्रामाणिकपणे राजकारण केल्यास ते समाजसेवेचे सर्वोत्तम रूप बनू शकते, हे त्यांच्या उदाहरणावरून दिसून येते. समाजासाठी स्वतःला वाहून घेणे आणि सक्रिय नेतृत्व दाखवणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा मोठे असू शकते, ही मोठी प्रेरणा डॉ. समीना यांचा हा प्रवास देतो.

डॉ. समीना बेगम यांचे जीवन साधेपणा, सेवा आणि बांधिलकीचा एक सुंदर संगम आहे. जो नेता नुसत्या शब्दांच्या फुगड्या न उडवता प्रत्यक्ष काम करून दाखवतो, तोच खरा नेता असतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांचे हे प्रयत्न हैदराबादच्या याकूतपुरा आणि आसपासच्या भागातील लोकांच्या जीवनात आजही सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. समर्पण आणि कठोर मेहनतीने समाजात कायमस्वरूपी बदल घडवता येतो, हा मोठा संदेश त्यांची ही कहाणी देते.

(लेखक 'आवाज द व्हॉईस - हिंदी'चे संपादक आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter