४५ वर्षांनंतर दिल्ली भाजपला मिळाले कायमस्वरूपी ‘घर’

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील भाजपच्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील भाजपच्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन

 

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थापनेनंतर ४५ वर्षांत पहिल्यांदाच, पक्षाला राष्ट्रीय राजधानीत दीनदयाल उपाध्याय मार्गावर आपले कायमस्वरूपी कार्यालय मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन केले आणि या वास्तूला "जनसेवेचे केंद्र" म्हटले.

"भाजपचे कार्यालय हे कोणत्याही मंदिरापेक्षा कमी पवित्र नाही. हे पक्ष आणि लोकांच्या अपेक्षांमधील एक मजबूत दुवा आहे," असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि पक्षाचे दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. "आम्ही सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी आहोत आणि आमची कार्यालये याच भावनेला जोपासण्यासाठी आहेत," असेही ते म्हणाले.

दिल्ली भाजपचे युनिट अनेक दशकांपासून तात्पुरत्या पत्त्यांवरून कार्यरत होते. पक्षाचे नेते मदन लाल खुराना यांना मिळालेल्या पंडित पंत मार्गावरील बंगल्यातून सुमारे ३५ वर्षे कामकाज चालले.

कार्यालय २४ तास उघडे

"आमचे कार्यालय २४ तास उघडे आहे. हे एक 'संस्कार केंद्र' असेल, जिथे कार्यकर्ते संघटना आणि तिच्या कार्याबद्दल शिकू शकतील," असे जे.पी. नड्डा म्हणाले. त्यांनी आठवण करून दिली की, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात स्वतःची कार्यालये असावीत, असा निर्णय घेतला होता. आज ६१७ कार्यालये बांधून झाली आहेत आणि हे ६१८ वे आहे.

हे पाच मजली प्रशस्त कार्यालय ८२५ चौरस मीटरमध्ये पसरलेले असून, त्याचे बांधकाम ३०,००० चौरस फुटांचे आहे. ते पर्यावरणपूरक असून, आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

जीएसटी सुधारणांसाठी आवाहन

कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले की, सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, याची खात्री करा. "नवीन पिढीच्या जीएसटी सुधारणांचा लाभ अगदी सामान्य नागरिकांनाही मिळावा, हे आपण सुनिश्चित केले पाहिजे," असे मोदी म्हणाले.

राजधानीला 'लघु भारत' संबोधत पंतप्रधान म्हणाले, "दिल्ली ही केवळ राजकीय राजधानी नाही, तर सांस्कृतिक विविधतेचीही राजधानी आहे. शीख गुरुंच्या उत्सवांपासून ते छठ पूजा, दुर्गा पूजा आणि पोंगलपर्यंत - राजधानी संपूर्ण भारताला एकत्र आणते. हीच भावना आपल्या कामातही दिसली पाहिजे, याची आपण खात्री केली पाहिजे."