"युद्धाचे स्वरूप आता सेकंदात मोजले जाते," राजनाथ सिंहांचा तटरक्षक दलाला इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

"उपग्रह, ड्रोन आणि सेन्सर्समुळे संघर्षाचे स्वरूप बदलले असून, आता युद्धाचे मोजमाप तास आणि सेकंदात केले जात आहे," असे म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी तटरक्षक दलाला (Coast Guard) भविष्यातील आव्हानांचा वेध घेणारा एक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. "सज्जता, अनुकूलता आणि जलद प्रतिसाद हे तटरक्षक दलाच्या दूरदृष्टीचे आधारस्तंभ असले पाहिजेत," असेही ते म्हणाले.

सागरी दलाच्या उच्चस्तरीय कमांडर्सना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, सागरी धोके आता अधिकाधिक तंत्रज्ञानावर आधारित आणि बहुआयामी बनत आहेत. सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध हे आजचे वास्तव आहे. दहशतवादी, गुन्हेगार आणि समुद्री चाच्यांपेक्षा पुढे राहण्यासाठी भारताला आपल्या सागरी सुरक्षा आराखड्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग-आधारित पाळत ठेवणे, ड्रोन आणि सायबर संरक्षण यांसारख्या गोष्टींचा समावेश करावा लागेल.

"एखादे राष्ट्र क्षेपणास्त्रांनी नव्हे, तर हॅकिंग, सायबर हल्ले आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगद्वारे आपल्या प्रणालींना निकामी करण्याचा प्रयत्न करू शकते. प्रतिसाद वेळ सेकंदांपर्यंत कमी करण्यासाठी आणि प्रत्येक वेळी सज्जता सुनिश्चित करण्यासाठी स्वयंचलित पाळत ठेवणारे नेटवर्क आणि एआय-सक्षम प्रणाली आवश्यक आहेत," असे राजनाथ सिंह म्हणाले.

म्यानमार आणि बांगलादेशसारख्या शेजारील देशांमधील 'अस्थिरते'चा परिणाम अनेकदा सागरी क्षेत्रात, विशेषतः बंगालच्या उपसागरात, निर्वासितांचा ओघ, बेकायदेशीर स्थलांतर आणि अनियमित सागरी हालचालींच्या रूपाने दिसून येतो. त्यामुळे तटरक्षक दलाने केवळ नियमित पाळतच ठेवू नये, तर बाह्य घडामोडींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी भू-राजकीय घटनांवरही बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

राजनाथ सिंह म्हणाले की, सागरी व्यापारातील कोणत्याही व्यत्ययाचा सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. "आपण राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षेला एकच मानले पाहिजे," असेही संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले.