पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. पंतप्रधानांनी सकाळी दिल्लीतील राजघाट येथील बापूंच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन देशवासियांना केले.

या विशेष दिनानिमित्त पंतप्रधानांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. "मी बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना नमन करतो," असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. बापूंचे आदर्श आणि विचार आपल्याला आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गरिबांचे कल्याण आणि साध्या राहणीचा त्यांचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

आजचा दिवस देशात हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो. त्या अनुषंगाने पंतप्रधान मोदींनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. "आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना मी वंदन करतो. त्यांचे हे सर्वोच्च बलिदान आपण कधीही विसरू शकणार नाही," अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाची सेवा आणि प्रगती करण्यासाठी हे बलिदान आपल्याला सदैव प्रेरणा देईल, असेही त्यांनी नमूद केले.

राजघाटवर आयोजित करण्यात आलेल्या या प्रार्थना सभेत विविध धर्मांचे ग्रंथपठन करण्यात आले. महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या झाली होती. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी देशभरात गांभीर्याने आणि आदराने पाळली जाते. पंतप्रधानांच्या या अभिवादनानंतर विविध स्तरांतून बापूंच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे.