उमराह दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अझरुद्दीन मदिनेला रवाना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
तेलंगणाचे अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनी मदिनेजवळ झालेल्या बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबांची भेट घेतली
तेलंगणाचे अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनी मदिनेजवळ झालेल्या बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबांची भेट घेतली

 

पवित्र शहर मदिनेजवळ झालेल्या बस दुर्घटनेत तेलंगणातील उमराह यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा सरकारचे एक शिष्टमंडळ सोमवारी रात्री (१७ नोव्हेंबर) मदिनेसाठी रवाना झाले.

अझरुद्दीन यांच्यासोबत अल्पसंख्याक कल्याण सचिव बी. शफीउल्ला आणि एआयएमआयएमचे (AIMIM) आमदार माजिद हुसेन हे देखील गेले आहेत. ही टीम सौदी अरेबियातील औपचारिक बाबींवर देखरेख करेल आणि मृतांचे दफनविधी पीडित कुटुंबीयांच्या इच्छेनुसार आणि स्थानिक प्रक्रियेनुसार पार पडतील, याची खात्री करेल.

नातेवाईक सौदीला रवाना

दुर्दैवी कुटुंबातील प्रत्येकी दोन सदस्य, असे सुमारे ३५ नातेवाईक मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सौदी अरेबियाला जाण्यासाठी नियोजित आहेत. त्यांचे व्हिसा अर्ज सौदी वाणिज्य दूतावासाकडे सादर करण्यात आले होते आणि ज्यांचे पासपोर्ट कालबाह्य झाले होते, ते हैदराबादच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत तातडीने नूतनीकरण करून घेण्यात आले आहेत.

रवाना होण्यापूर्वी, मंत्री अझरुद्दीन यांनी सरकारी सल्लागार मोहम्मद अली शब्बीर आणि टीएमआरईआयएसचे (TMREIS) अध्यक्ष ए. के. फहीम कुरेशी यांच्याशी व्यवस्थेचा आढावा घेतला. हे सर्व काम राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या सूचनेनुसार केले जात आहे.

मदत आणि अंत्यसंस्कार

तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) दुजोरा दिला आहे की, मृतांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच केले जातील. तसेच राज्य सरकारने प्रत्येक पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत (Ex-gratia) जाहीर केली आहे.

अपघाताचा तपशील

सोमवारी पहाटे यात्रेकरूंच्या बसला डिझेल टँकरने धडक दिली आणि बसने पेट घेतला. या भीषण अपघातात १० मुलांसह किमान ४५ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. बळी गेलेले बहुतेक लोक हैदराबादमधील आसिफ नगर, झिर्रा, मेहदीपट्टणम आणि तोलीचौकी भागातील रहिवासी होते.

९ नोव्हेंबरला जेद्दाहला गेलेल्या ५४ यात्रेकरूंपैकी चार जण कारने मदिनेला गेले होते आणि चार जण मक्कामध्येच थांबले होते. उर्वरित ४६ यात्रेकरू त्या बसमध्ये होते जिचा अपघात झाला.

यातील ४५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अब्दुल शोएब मोहम्मद हा एकमेव प्रवासी वाचला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर सौदीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.