भारताचा समावेशक आरोग्य दृष्टिकोन जगाला प्रेरणा देणारा - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

जिनिव्हा येथे झालेल्या जागतिक आरोग्य सभेच्या ७८ व्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा आरोग्य क्षेत्रातील दृष्टिकोन मांडला.‘आरोग्यासाठी एक जग’ ही या सत्राची थीम होती. ही थीम भारताच्या ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेशी जुळणारी आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, ‘निरोगी जगाचे भविष्य समावेशकता, सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नांवर अवलंबून आहे.’

भारताने आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रगतीने जगाचे लक्ष वेधले आहे. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. ही योजना ५८ कोटी लोकांना मोफत उपचार देते आहे. अलीकडेच ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ती विस्तारली गेली आहे. देशभरात हजारो आरोग्य आणि निरामय केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांची तपासणी आणि निदान करतात. जनऔषधी केंद्रांमुळे कमी किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध होतात. यामुळे सामान्य माणसाचा वैद्यकीय खर्च कमी झाला आहे.

तंत्रज्ञानाच्या वापराने भारताने आरोग्यसेवा अधिक सुलभ केल्या आहेत. गर्भवती महिला आणि मुलांच्या लसीकरणाचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल व्यासपीठ आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र डिजिटल आरोग्य ओळख मिळाली आहे. यामुळे वैद्यकीय माहिती आणि विमा एकत्रित करणे सोपे झाले. मोफत टेलिमेडिसिन सेवेने 34 कोटींहून अधिक लोकांना डॉक्टरांचा सल्ला मिळत असून यामुळे ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होतात.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारताच्या आरोग्य उपक्रमांमुळे खिशातून होणारा खर्च कमी झाला आहे. त्याचवेळी सरकारी आरोग्य खर्चात वाढ झाली आहे. भारताचा हा दृष्टिकोन ग्लोबल साउथमधील देशांसाठी प्रेरणादायी आहे. आरोग्य आव्हानांचा सामना करणाऱ्या या देशांना भारत आपले अनुभव आणि उत्तम पद्धती सामायिक करू इच्छितो.

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचाही उल्लेख केला. यंदा ११ वा योग दिन २१ जूनला ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या थीमने साजरा होईल. त्यांनी सर्व देशांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. योगाने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. भारताने जगाला दिलेली ही देणगी आता जागतिक स्तरावर स्वीकारली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने INB करार यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले. हा करार भविष्यातील साथीच्या आजारांशी लढण्यासाठी जागतिक सहकार्याचे प्रतीक आहे. त्यांनी वेदांमधील प्राचीन श्लोकाने भाषणाचा समारोप केला:

सर्वं सुखिनः संतु, सर्वं संतु निरामयः।
सर्वं भद्राणि पश्यंतु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।

हा श्लोक म्हणजे सर्वजण सुखी, निरोगी आणि आनंदी राहावेत अशी प्रार्थना आहे. भारताचा हा दृष्टिकोन जागतिक एकतेची प्रेरणा देतो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter