अल्लामा इक्बालांनी असा केला श्रीकृष्णाचा गौरव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
अल्लामा इक्बाल
अल्लामा इक्बाल

 

गौस सिवानी

शायर-ए-इस्लाम अल्लामा इक्बाल यांच्या नजरेत श्रीकृष्ण कन्हैयाला एक अत्यंत मानाचे आणि खास स्थान होते. ज्या विचारवंताने आपल्या लेखनातून इस्लामिक तत्त्वज्ञानाला घराघरात पोहोचवले, त्याच इक्बाल यांच्या मनावर, बुद्धीवर आणि कवितेवर श्रीकृष्णाची गढूळ नव्हे, तर अतिशय सखोल छाप होती. अल्लामा इक्बाल यांनी प्रभू श्रीरामांना इमाम-ए-हिंद म्हटले, तर श्रीकृष्णाच्या बासरीच्या सुरांना सरूद-ए-रब्बानी म्हणजेच ईश्वरीय संगीत अशी उपमा दिली.

अल्लामा इक्बाल यांनी आपल्या साहित्यातून इस्लामचे प्रतिनिधित्व केले असले, तरी ते एका विशिष्ट चौकटीत अडकलेले कवी नव्हते. विविध धर्म, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. जिथे जिथे त्यांना मानवता, अध्यात्म आणि सत्याचा प्रकाश दिसला, तिथे त्यांनी डोके टेकवले. याच उदार दृष्टिकोनातून त्यांनी हिंदू धर्मातील महान विभूतींचा आदरपूर्वक उल्लेख केला. त्यामध्ये श्रीकृष्ण हे नाव सर्वात आघाडीवर दिसते.

श्रीकृष्ण : भारतीय संस्कृतीचा अविभाज्य आत्मा
श्रीकृष्ण हे हिंदू परंपरेतील अत्यंत प्रिय आणि मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व. भगवान विष्णूंचे आठवे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णांनी भारतीय संस्कृती, साहित्य, संगीत आणि तत्त्वज्ञानावर एक वेगळीच मोहिनी घातली आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी मथुरा नगरीत देवकी आणि वसुदेवाच्या पोटी त्यांचा जन्म झाला.

त्यांच्या बाललीला, बासरीची धुन, राधा आणि गोपिकांचे निष्पाप प्रेम हे भारतीय लोकसंस्कृतीचे हृदय आहे. हे केवळ कथा-प्रसंग नसून त्यामागे आत्मा आणि परमात्म्याचे गूढ आध्यात्मिक नाते दडले आहे.

महाभारताच्या युद्धात अर्जुनाचे सारथी बनून त्यांनी शस्त्र न उचलता दिलेला जीवन जगण्याचा धडा म्हणजेच 'भगवद्गीता'. आज जगभरात गीता हा एक महान तत्त्वज्ञानग्रंथ म्हणून पूजला जातो. केवळ भारतच नव्हे, तर नेपाळ, बांगलादेश, मॉरिशसपासून ते अमेरिका आणि ब्रिटनपर्यंत श्रीकृष्णांचे विचार मानणारा मोठा वर्ग पसरलेला आहे.

सरूद-ए-रब्बानी
इक्बाल यांनी श्रीकृष्णांकडे केवळ एका धर्माचे दैवत म्हणून पाहिले नाही. त्यांनी श्रीकृष्णांना संपूर्ण मानवतेचा मार्गदर्शक, महान ज्ञानी आणि आध्यात्मिक शिक्षक मानले.

आपल्या 'बांग-ए-दरा' या प्रसिद्ध काव्यसंग्रहातील "सरगुज़श्त-ए-आदम" या कवितेत इक्बाल यांनी श्रीकृष्णाच्या शिक्षा अन् विचारांचा गौरव केला आहे. श्रीकृष्णाच्या बासरीतून निघणारे सूर म्हणजे साक्षात ईश्वरी संदेश (सरूद-ए-रब्बानी) आहे, ज्याने संपूर्ण भारताला एकतेचा आणि ईश्वराचा मार्ग दाखवला.

इक्बाल लिहितात,

"सुनाया हिंद में आकर सरोद-ए-रब्बानी"

म्हणजेच, श्रीकृष्णांनी भारतात येऊन ईश्वरी संगीताचा, म्हणजेच सत्याचा आणि प्रेमाचा संदेश ऐकवला. एकाच ओळीत इक्बाल यांनी भारताचा शेकडो वर्षांचा आध्यात्मिक इतिहास सामावून घेतला आहे.
 

कर्मयोगाचे महान पुरस्कर्ते
अल्लामा इक्बाल यांच्या 'अस्रार-ए-खुदी' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत श्रीकृष्णांच्या विचारांचे सखोल विश्लेषण आढळते. ते लिहितात, "श्रीकृष्णाचे नाव नेहमी अत्यंत आदराने आणि सन्मानाने घेतले जाईल. या महान पुरुषाने अत्यंत आकर्षक शैलीत आपल्या देशातील तत्त्वज्ञानाची पुनर्रचना केली. कर्म सोडणे म्हणजे संन्यास नव्हे, तर कर्माच्या फळाची आसक्ती सोडणे हाच खरा संन्यास आहे, हा महान सत्यविचार त्यांनी जगाला दिला."

इक्बाल यांच्या मते, श्रीराम, श्रीकृष्ण आणि रामानुजाचार्य यांनी माणसाला कर्म, प्रेम आणि ईश्वराशी जोडणारा जिवंत मार्ग दाखवला. पण नंतरच्या काळात कोरड्या दार्शनिक चर्चांमध्ये हा मूळ संदेश कुठेतरी झाकोळला गेला. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला कर्माचा संदेश हा मानवी आत्म्याला जागे करणारा मुख्य स्त्रोत होता.

कृष्ण आणि प्रेमाचा वैश्विक संदेश
इक्बाल यांच्या विचारांचा पाया म्हणजे 'खुदी' (आत्मज्ञान) आणि 'कर्म'. श्रीकृष्णाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांनी दिलेला प्रेमाचा संदेश. प्रेम हीच ती शक्ती आहे जी माणसाला ईश्वराच्या जवळ नेते आणि समाजातील द्वेष मिटवते. म्हणूनच इक्बाल यांनी श्रीकृष्णांना एका धर्मापुरते मर्यादित न ठेवता प्रेमाचा आणि अध्यात्माचा जगज्जेता संदेशवाहक मानले.

श्रीकृष्णाच्या विचारांबद्दल इक्बाल यांना इतका आदर होता की, ११ ऑक्टोबर १९२१ रोजी महाराजा किशन प्रसाद 'शाद' यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी भगवद्गीतेचा उर्दू भाषेत अनुवाद करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती.

वर्तमान काळासाठी महत्त्वाचा धडा
इक्बाल यांनी केवळ श्रीकृष्णांचाच नाही, तर प्रभू श्रीराम, गुरु नानक, स्वामी रामतीर्थ, गौतम बुद्ध आणि आदि शंकराचार्य यांच्याबद्दलही नेहमी आदराची भावना ठेवली. स्वतःच्या धर्मावर ठाम राहून दुसऱ्या धर्मपरंपरेतील चांगल्या गोष्टींचा स्वीकार कसा करावा, याचे उत्तम उदाहरण इक्बाल यांनी आपल्या साहित्यातून घालून दिले आहे. 

आजच्या काळात, जेव्हा धार्मिक मुद्द्यांवरून समाज विभागला जात आहे, तेव्हा इक्बाल यांचा हा दृष्टिकोन अत्यंत मार्गदर्शक ठरतो. स्वतःच्या श्रद्धेशी प्रामाणिक राहून इतर संस्कृतींमधील महान विचारांचा आदर करणे, हीच खरी वैचारिक प्रगल्भता आहे. इक्बाल यांच्या नजरेतील श्रीकृष्ण हे भारतभूमीचे असेच एक अलौकिक आणि अमर प्रतीक आहेत. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News