आसामचे शिंपी पियार अली : तिरंग्यावरील प्रेमापोटी विनामूल्य शिवतात शेकडो ध्वज

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
आसामचे शिंपी पियार अली माध्यमांशी संवाद साधताना
आसामचे शिंपी पियार अली माध्यमांशी संवाद साधताना

 

आरिफुल इस्लाम, गुवाहाटी

पियार अली हे व्यवसायाने शिंपी आहेत, पण जेव्हा स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन जवळ येतो, तेव्हा त्यांच्यातील एक कट्टर राष्ट्रप्रेमी भारतीय जागा होतो. देशाप्रती असलेले प्रेम, आपुलकी आणि आदर व्यक्त करण्यासाठी पियार अली दरवर्षी राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने शेकडो राष्ट्रध्वज स्वतःच्या हाताने शिवतात आणि विशेष म्हणजे त्यासाठी ते एक रुपयाही शिलाई घेत नाहीत.

गेल्या जवळपास तीन दशकांपासून प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचे दुकान राष्ट्रध्वजांनी भरून जाते. पियार अली अत्यंत तन्मयतेने आणि अचूकतेने तिरंगा शिवतात. त्यांच्या हाताने शिवलेला प्रत्येक ध्वज हा अभिमान आणि एकात्मतेचे प्रतीक ठरेल, याची ते विशेष काळजी घेतात.

सुरुवातीला ते मोजकेच ध्वज शिवत असत, परंतु काळानुसार जसा २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट जवळ येऊ लागला, तसे पियार अली राष्ट्रध्वज बनवण्याच्या कामात पूर्णपणे मग्न होऊ लागले. हळूहळू मागणी वाढत गेली आणि त्यांनी उत्पादनही वाढवले.

"मी गेल्या ३० वर्षांपासून शिंपी म्हणून काम करत आहे. दुकान सुरू केल्यापासून म्हणजेच गेल्या २९ वर्षांपासून मी राष्ट्रध्वज शिवतोय. मला आपल्या तिरंग्याबद्दल अपार प्रेम आहे, कारण तो आपल्या थोर देशाचे प्रतिनिधित्व करतो. बालपणी आम्ही आसामी भाषेत एक कविता म्हणायचो— 'तिनी बरणिया जातिया पताका नील आकाशोत नाचे...' (तीन रंगांचा आमचा राष्ट्रध्वज निळ्या आकाशात डोलतो...). या कवितेचा माझ्या मनावर कायमचा ठसा उमटला आणि तिथूनच तिरंग्याप्रती माझ्या मनात आदराची भावना निर्माण झाली," असे पियार अली सांगतात.

ते पुढे म्हणतात, "मी विशेषतः २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टसाठी ध्वज शिवतो. इतर वेळी मी इतर शिंप्यांप्रमाणे कपडे शिवण्याचे काम करतो. मी माझे ध्वज शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना देतो. मी शिलाईसाठी काहीही शुल्क घेत नाही. मी फक्त कापडाची किंमत घेतो, जेणेकरून प्रत्येकाला कमी किमतीत दर्जेदार तिरंगा फडकवता येईल. प्रत्येकाने राष्ट्रध्वज फडकवावा आणि त्याचा सन्मान करावा, हाच माझा एकमेव उद्देश आहे."

पियार अलींचे दुकान पश्चिम आसाममधील दुर्गम भाग असलेल्या कलगाछिया परिसरात आहे. २६ जानेवारीला देश ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज होत असताना, पियार अलींच्या दुकानात आतापासूनच लोकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यांच्या शेजारीच व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याने सांगितले की, "मी गेल्या २६ वर्षांपासून पियार अलींना बघतोय. जेव्हा राष्ट्रीय सण जवळ येतात, तेव्हा ते रात्रंदिवस ध्वज शिवण्यात व्यस्त असतात. एकदा मी त्यांना ध्वजाच्या किमतीबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले की, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्यांच्यासाठी माझी ही सेवा समर्पित आहे."

एका छोट्या प्रयत्नातून सुरू झालेले हे काम आता मोठ्या मोहिमेत बदलले आहे. पियार अलींनी बनवलेले ध्वज आता केवळ कलगाछियाच नव्हे, तर बरपेटा, बर्भिता, मयनाबारी, जयपूर, तारकंडी, बाघबर, गोलपारा आणि बंगाईगाव यांसारख्या आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहेत. प्रत्येक ध्वजाप्रती ते दाखवत असलेले प्रेम आणि आदर पाहून सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत.