अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राचा लोकनेता हरपला!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार

 

आवाज द व्हॉईस ब्युरो, महाराष्ट्र

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (६६) यांचे आज सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या जाहीर सभेसाठी जात असताना हे 'लिअरजेट ४५' विमान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या विमानात अजित पवारांसह त्यांचे दोन कर्मचारी आणि दोन वैमानिक होते. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की विमानातील कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा: राज्यात तीन दिवसांचा दुखवटा

या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच बारामतीमध्ये सरकारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. अत्यंत जड अंतःकरणाने मुख्यमंत्री म्हणाले की, "आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण आहे. वैयक्तिकरित्या सांगायचे तर, मी आज माझा एक अत्यंत खंबीर मित्र गमावला आहे. मी पंतप्रधानांशी बोललो असून त्यांनीही आपले मोठे दुःख व्यक्त केले आहे. संपूर्ण देश आज या हानीमुळे शोकाकुल आहे. मी सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशीही संवाद साधला असून, मी आणि एकनाथ शिंदे तातडीने बारामतीकडे रवाना होत आहोत. पवार कुटुंब बारामतीत पोहोचल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील."

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून 'लोकनेत्याला' मानवंदना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले की, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांच्या निधनाचे वृत्त अत्यंत हृदयद्रावक आहे. अजित पवार यांचे निधन ही एक अपूरणीय हानी असून महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, "अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले आणि तळागाळाशी मजबूत नाळ जोडलेले खरे लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती आणि गरीब व वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन धक्कादायक असून संपूर्ण देश पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे."

सर्वपक्षीय नेत्यांकडून शोकसंवेदना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, गेल्या साडेतीन दशकांपासून अजित पवार यांनी स्वतःला महाराष्ट्राच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. त्यांचे जाणे हे केवळ एनडीए कुटुंबाचेच नव्हे, तर माझे वैयक्तिक नुकसान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, हा अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी प्रसंग असून कोणाच्या स्वप्नातही अशी दुर्घटना आली नसेल. अजित दादांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती आणि ते अत्यंत अभ्यासू नेते होते.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना म्हटले की, अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत हृदयद्रावक आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अजित पवारांना 'अनुभवी नेते' संबोधून श्रद्धांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, नितीन गडकरी, आणि जेपी नड्डा यांनीही त्यांच्या जनसेवेचा गौरव केला आहे.

याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण, तेजस्वी यादव, मायावती, ओमर अब्दुल्ला आणि सिद्धरामय्या यांनीही अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. संजय राऊत यांनी या दिवसाला महाराष्ट्रासाठी 'काळा दिवस' म्हटले असून प्रकाश आंबेडकर यांनी अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. इम्तियाज जलील यांनी त्यांना सर्वात कार्यक्षम प्रशासक संबोधले आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही अजित दादांच्या कामाच्या उरकाचा आणि दिलदार स्वभावाचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अपघाताचा तपास सुरू

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला असून, खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली, याचा शोध घेतला जात आहे.

झंझावाती पर्वाचा अकाली अंत

अजित पवारांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार, मुलगे पार्थ आणि जय असा परिवार आहे. उद्या बारामती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावाती पर्वाचा अकाली अंत झाला आहे. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter