महाराष्ट्रावर शोककळा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी २०२६) सकाळी पुण्यातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या विमानात त्यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक, एक सहायक आणि दोन वैमानिक असे एकूण पाच जण होते. या भीषण अपघातात विमानातील कोणाचेही प्राण वाचू शकले नाहीत.

घटनेचा तपशील

अजित पवार हे मुंबईहून बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या जाहीर सभेसाठी निघाले होते. सकाळी ८.४५ च्या सुमारास त्यांचे 'लिअरजेट ४५' (Learjet 45) हे विमान बारामती विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान जमिनीवर आदळताच त्याचा मोठा स्फोट झाला आणि विमानाने भीषण पेट घेतला. स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की कोणालाही बाहेर काढणे शक्य झाले नाही.

राजकीय क्षेत्रातून शोकसंवेदना

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, "अजित पवार हे आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहिले. त्यांच्या निधनाने राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे". शिवसेनेच्या (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत यांनीही अजित पवारांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

एक झंझावाती राजकीय प्रवास

१९८२ मध्ये सहकारी साखर कारखान्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या अजित पवारांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे स्थान निर्माण केले होते. बारामती विधानसभा मतदारसंघातून ते सातवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्राच्या प्रशासनावर त्यांची असलेली पकड आणि बारामतीच्या विकासातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ व जय हे दोन पुत्र असा परिवार आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.