महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) बारामती येथे विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "अजित पवार हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेते होते आणि त्यांची तळागाळातील लोकांशी घट्ट नाळ जोडलेली होती," अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, "अजित पवार जी हे महाराष्ट्र राज्याच्या सेवेसाठी नेहमीच अग्रभागी राहणारे एक कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. प्रशासकीय बाबींची त्यांची जाण आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी असलेली त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी होती. त्यांचे असे अकाली जाणे अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती."
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2026
अजित पवार (६६) हे ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. 'फ्लाइटरडार'च्या माहितीनुसार, त्यांच्या विमानाने सकाळी ८.१० वाजता मुंबईतून उड्डाण केले आणि ८.४५ च्या सुमारास रडारवरून ते गायब झाले. बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना खराब दृश्यमानतेमुळे (Poor Visibility) विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.
राजकीय कारकीर्द आणि वारसा
अजित पवार हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पदावर राहणारे नेते होते. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा विविध मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात एकूण सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकार पूर्णपणे संपर्कात असून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार, तसेच पार्थ आणि जय हे दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कामाचा प्रचंड उरक असलेले नेतृत्व हरपले आहे.