संगीताचा वारसा सांभाळणे हे मोठे जबाबदारीचे कार्य - उस्ताद अमजद अली खाँ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
उस्ताद अमजद अली खाँ यांना 'पुठोत्सव जीवनगौरव सन्मान' प्रदान करण्यात आला.
उस्ताद अमजद अली खाँ यांना 'पुठोत्सव जीवनगौरव सन्मान' प्रदान करण्यात आला.

 

शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करताना पुनरावृत्ती टाळता यायला हवी. एक राग किती वेळ सादर करायचा, याचे प्रमाण ठरवले पाहिजे. रूढ रचना आपल्या पद्धतीने सादर करणे महत्त्वाचे आहेच; मात्र संगीतात त्यापेक्षा नवनिर्मितीला सर्वाधिक महत्त्व आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी मंगळवारी व्यक्त केले.

'ग्लोबल पुलोत्सव' निमित्त देण्यात येणारा 'पुलोत्सव जीवनगौरव सन्मान' डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते उस्ताद अमजद अली खाँ यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, बेलवलकर हाउसिंगचे समीर बेलवलकर, संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर उस्ताद अमजद अली खाँ यांच्याशी मकरंद ब्रहो यांनी संवाद साधला. ते म्हणाले, "संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात जन्म होणे, हे भाग्याचे असले तरी ती मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी सांभाळता न आल्यामुळे अनेक कुटुंबांचा वारसा न टिकल्याचीही उदाहरणे पाहायला मिळतात, फुकट मिळणाऱ्या गोष्टींचे भविष्य नेहमीच अंधकारमय असते. त्यामुळे कलाकारांचा आणि कलेचा आदर म्हणून मैफिलीला तिकीट ठेवलेच पाहिजे."

डॉ. अभ्यंकर म्हणाले, "सरोद है अत्यंत गंभीर वाद्य आहे, मात्र उस्ताद अमजद अली खाँ यांनी त्यामध्ये जीव आणि प्राण ओतले. त्यांचे वादन रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे असते. उस्ताद अमजद अली खाँ हे एक चिंतनशील वादक आहेत. सरोदला जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आणि ओळख देण्याचे श्रेय त्यांचे आहे." अनुपम जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

वडिलांची राष्ट्रपतींकडे भाबडी मागणी
उस्ताद अमजद अली खाँ यांनी एका आठवणीला उजाळा दिला. 'माझे वडील हाफीज अली खाँ यांना १९६० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार वितरणानंतर राष्ट्रपती भवनात चहापानाचा कार्यक्रम होता. तेथे राष्ट्रपतींनी वडिलांना 'आपल्याला काही हवे असल्यास सांगा', असे विचारले होते. तेव्हा वडिलांनी त्यांच्याकडे 'हल्ली दरबारी राग शुद्ध स्वरूपात सादर केला जात नाही. तुम्ही कृपया त्याचे पावित्र्य जपा', अशी भावना व्यक्त केली होती. यात त्यांचा भाबडेपणा असला तरी ते शास्त्रीय संगीतावरील त्यांचे निखळ प्रेम होते,' असे त्यांनी सांगितले. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter