Narmada Boat Tragedy: ४ जणांचे प्राण वाचवणारा मजूर रमजान ठरला देवदूत

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
जबलपूरमध्ये नर्मदा नदीत क्रूझ बुडाल्यानंतर लोकांचे प्राण वाचवणारा रमजान
जबलपूरमध्ये नर्मदा नदीत क्रूझ बुडाल्यानंतर लोकांचे प्राण वाचवणारा रमजान

 

अब्दुल वसीम अंसारी, भोपाळ-जबलपूर :

देशात जेव्हा जातीय तणावाच्या बातम्या चर्चेत असतात, तेव्हाच माणुसकीचे खरे दर्शन घडवणाऱ्या काही घटनाही समोर येतात. नुकतेच उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका मौलवींच्या कथित हत्येमुळे दुःखाचे आणि रागाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एका मजुराची कहाणी समोर आली. या घटनेने भारताची 'गंगा-जमुनी तहजीब' (सर्वधर्मसमभाव) आजही जिवंत असल्याचा मोठा पुरावा दिला आहे.

ही कथा रमजान नावाच्या एका २२ वर्षीय मजुराची आहे. त्याचे मूळ गाव पश्चिम बंगालमध्ये आहे. तो मजुरीचे काम करतो. पण त्याच्या धाडसामुळे लोक त्याला आज खरा नायक मानत आहेत. जबलपूरच्या बरगी धरणामध्ये गुरुवारी संध्याकाळी एक मोठा अपघात झाला. नर्मदा नदीच्या शांत पाण्यात पर्यटनासाठी निघालेले क्रूझ अचानक मृत्यूचा सापळा बनले.

अचानक हवामान बदलले आणि क्रूझ बुडू लागले

या क्रूझमध्ये सुमारे २९ प्रवासी होते. हवामान अचानक बदलले आणि वेगाने वारे वाहू लागले. पाण्यात मोठ्या लाटा उसळल्या. यामुळे क्रूझचे संतुलन बिघडले आणि काही क्षणांतच ते बुडू लागले. पर्यटनाच्या आनंदाचे रूपांतर क्षणार्धात आक्रोश आणि किंकाळ्यांमध्ये झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जीव वाचवण्यासाठी लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या. काही जण पोहून किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न करत होते. अनेक जण मदतीसाठी याचना करत होते. तिथे परिस्थिती अत्यंत भयानक होती. याच वेळी धरण परिसरात पुलाचे बांधकाम सुरू होते. मजुरांची एक टीम तिथे काम करत होती. रमजान याच मजुरांपैकी एक होता. क्रूझ बुडताना पाहताच त्याने एकही क्षण न गमावता थेट नदीकडे धाव घेतली.

२५ फुटांवरून पाण्यात मारली उडी

लोक पाण्यात बुडत असल्याचे दिसल्याचे रमजानने सांगितले. त्यावेळी त्याला काहीही सुचले नाही. आताच उडी मारली नाही तर लोक मरतील, एवढाच विचार त्याच्या मनात आला. त्याने लगेच एक दोरखंड उचलला आणि सुमारे २५ फूट उंचीवरून थेट पाण्यात उडी मारली.

हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. पाणी खूप खोल होते. लाटांचा वेग प्रचंड होता आणि अंधारही वाढत चालला होता. पण रमजानने स्वतःच्या जिवाची पर्वा केली नाही. तो पोहत क्रूझजवळ पोहोचला. तिथे मोठी धावपळ उडाली होती. लोक बुडत होते. त्याने एकापाठोपाठ एक अशा लोकांना पकडायला सुरुवात केली. त्यांना भक्कम आधार दिला आणि दोरीच्या साहाय्याने किनाऱ्यापर्यंत सुखरूप आणले.

४ जणांना दिले जीवदान

रमजानने एकूण सहा जणांना पाण्याबाहेर काढले. यातील चार जणांचे प्राण वाचले. दुर्दैवाने दोन जण वाचू शकले नाहीत. रमजान तिथे नसता, तर मृत्यूचा आकडा नक्कीच आणखी वाढला असता. त्याच्या इतर सहकारी मजुरांनीही मोठी मदत केली. बिहारचा राजकुमार आणि गोरखपूरचा शिवनाथ या मजुरांनीही पाण्यात उतरून बचावकार्यात भाग घेतला. सर्वांनी मिळून अनेक लोकांना सुरक्षित बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने पावले उचलली. स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (SDRF) टीम घटनास्थळी पोहोचली. रात्रभर हे बचावकार्य सुरू होते. अंधार आणि खोल पाण्यामुळे मदत कार्यात अनेक अडथळे आले. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. अनेक लोक जखमी आहेत. काहींना जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. काही जण बेपत्ता असल्याचीही माहिती मिळतेय. जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी हजर झाले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

रमजानवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

या अपघातानंतर सोशल मीडियावर रमजानच्या धाडसाचे प्रचंड कौतुक होत आहे. लोक त्याला माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण मानत आहेत. धर्मापेक्षा माणुसकीला सर्वोच्च स्थान देणारा हाच खरा भारत आहे, असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही रमजानच्या शौर्याची दखल घेत त्याला ५१ हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

पण आता सोशल मीडियावर एक नवीन मागणी जोर धरू लागली आहे. क्रिकेटपटूंना करोडो रुपये मिळतात. मग चार जणांचे प्राण वाचवणाऱ्या रमजानलाही तितकाच मोठा सन्मान आणि मोठे बक्षीस मिळायला हवे, असा मुद्दा नेटकरी मांडत आहेत. काहींनी तर त्याला थेट सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

या घटनेने समाजातील खरा नायक कोण, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. आपण हे कृत्य केवळ माणुसकीच्या नात्याने केल्याचे रमजानने अगदी साधेपणाने सांगितले. पुन्हा अशी वेळ आली तर आपण नक्कीच मदतीसाठी उडी मारू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. त्याच्या या उत्तरातच त्याची खरी ओळख दडलेली आहे. एका बाजूला द्वेषाच्या बातम्या पसरत असताना, रमजानसारखे लोक कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांचे प्राण वाचवत आहेत. जबलपूरचा हा अपघात अत्यंत दुःखद आहे. पण याच दुःखात मनाला दिलासा देणारी ही शौर्याची कथा समोर आली आहे. ही हिमतीची आणि माणुसकीची कथा आहे. आणि हाच तो भारत आहे, जो आजही जिवंत आहे.