ओनिका माहेश्वरी
फाटलेल्या-जुन्या कपड्यांमध्ये, अस्ताव्यस्त दाढी वाढलेला एक माणूस अनवाणी पायांनी रस्त्याच्या कडेला वेड्यासारखा ओरडत होता. त्याच्या डोक्यावर ना छप्पर होते, ना त्याचे स्वतःचे म्हणावे असे कोणी होते. वेगाने धावणाऱ्या जगातील बहुतेक लोक त्याला नेहमीप्रमाणे पागल किंवा भिकारी समजून दुर्लक्ष करत पुढे जात होते. पण शाळेतून घरी परतणारा एक १० वर्षांचा निष्पाप मुलगा ते दृश्य पाहून जागेवरच थबकला.
तो मुलगा त्या लाचार माणसाला कधीही विसरू शकला नाही. तो क्षण त्या मुलाच्या मनात नेहमीसाठी एक अशी वेदनादायक प्रतिमा बनून कोरला गेला, जी त्याच्या आठवणींमध्ये खूप खोलवर रुजली. त्या बेसहारा माणसाकडे गमावण्यासाठी काहीच नव्हते. दुसरीकडे तो छोटा मुलगा जेव्हा आपल्या घरी पोहोचला, तेव्हा तिथे त्याची वाट पाहणारे कुटुंब, स्वच्छ कपडे आणि गरमागरम जेवण तयार होते.
अनेक वर्षांनंतर, बालपणीचा तोच प्रसंग आठवत मुसादिक बशीर यांनी 'आवाज द व्हॉईस'शी बोलताना सांगितले, "एका रात्री जेव्हा मी जेवायला बसलो, तेव्हा रस्त्याच्या कडेला पाहिलेल्या त्या मध्यमवयीन माणसाचाच विचार माझ्या मनात घोळत राहिला. त्याचे कपडे फाटलेले होते आणि दाढी वाढलेली होती. त्याला पाहून त्याचे या जगात कोणीच नसावे असे वाटत होते. तर दुसरीकडे, माझ्याकडे घर, जेवण आणि कुटुंब असे सगळे काही होते. हा विचार माझ्या मनातून कधीच गेला नाही."
बालपणीची पुसटशी प्रतिमा बनली मोठे ध्येय
वेळेचे चक्र फिरत राहिले, वर्षे उलटून गेली, पण मुसादिकच्या मनावर उमटलेली ती प्रतिमा पुसट झाली नाही. वर्ष २०२२ उजाडले. पुलवामा येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षांच्या तरुण मुसादिकला आता रस्त्यावर त्याच्या बालपणी पाहिलेल्या लाचार माणसासारखे अनेक लोक दिसू लागले होते. हे लोक प्रचंड वेदनेत होते आणि समाजाच्या दुर्लक्षामुळे ते अदृश्य झालेले होते. या वेळी मुसादिक केवळ मूकदर्शक बनून राहू शकत नव्हते. त्यांनी रस्त्यांवर फिरणे सुरू केले. पण यावेळी त्यांचा दृष्टिकोन काहीतरी मोठे करण्याचा होता.
मुसादिक यांनी आपली ही अस्वस्थता मित्रांसोबत शेअर केली. जी चर्चा पूर्वी केवळ चहाच्या टपऱ्यांवर गप्पा मारण्यापुरती मर्यादित होती, ती हळूहळू एका अत्यंत संवेदनशील आणि सामायिक ध्येयात बदलली. या तरुणांनी ठरवले की ते मानसिकदृष्ट्या आजारी, बेघर आणि समाजाने नाकारलेल्या बेसहारा लोकांपर्यंत पोहोचतील. त्यांना केवळ जेवण आणि स्वच्छ कपडेच देणार नाहीत, तर प्रेमाचे दोन शब्द बोलतील. शक्य झाले तर त्यांना त्यांच्या घरी परत पाठवण्याचे साधन बनतील.
'काश्मीर यूथ करेज'चा जन्म
हे तरुण जसजसे रस्त्यावर उतरू लागले, तसतसे प्रत्येक भेटीसोबत काहीतरी करून दाखवण्याची त्यांची इच्छा अधिक मजबूत होत गेली. अखेर, मित्रांच्या या छोट्या गटाने आपल्या चिंतेचे कृतीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. ते जेवण, साबण आणि ब्लँकेटचे पॅकेट यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन रस्त्यावर पडू लागले.
सुरुवातीला ज्या बेघरांचा जगावर विश्वास नव्हता, त्यांना या तरुणांचा स्वार्थीपणा नसलेला भाव पाहून हळूहळू विश्वास वाटू लागला. दयाळूपणा आणि आपुलकीच्या याच सुरुवातीच्या पावलांनी एका मोठ्या आंदोलनाला जन्म दिला, ज्याला 'काश्मीर यूथ करेज' (केवायसी) असे नाव देण्यात आले.
मुसादिक बशीर यांनी 'आवाज द व्हॉईस'शी बोलताना सांगितले की, सुरुवातीला आम्ही भाड्याने जागा घेतली होती. पण नंतर आम्ही स्वतःचे शेल्टर होम तयार केले. त्यामध्ये या सर्व गरजू लोकांसाठी राहण्याची आणि इतर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. पण आता आम्हाला व्यावसायिक टीम सदस्यांची गरज आहे. कारण येथील बहुतांश लोक मानसिकदृष्ट्या आजारी आहेत.
सुरुवातीला केवळ २१ सक्रिय आणि समर्पित सदस्यांच्या टीमसह सुरू झालेल्या या मोहिमेने पाहता पाहता संपूर्ण काश्मीरमधील ४५ पेक्षा जास्त लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. यातील काहींची वर्षांपासून ताटातूट झालेल्या त्यांच्या कुटुंबांशी भेट घडवून आणण्यात आली, तर काहींना वर्षानुवर्षांची उपेक्षा आणि अंधारानंतर सुरक्षित आश्रय व मानवी काळजी मिळाली.
काही मित्रांमध्ये सुरू झालेला हा अनौपचारिक प्रयत्न इतक्या वेगाने पुढे गेला की लोकांना याबद्दल माहिती मिळू लागली. लोक त्या बेसहारा लोकांची बदलती परिस्थिती पाहत होते आणि त्या तरुण स्वयंसेवकांचा जज्बाही अनुभवत होते. हे तरुण कोणत्याही भेदभाव, जात किंवा पूर्वग्रहाशिवाय प्रत्येकासाठी मदतीचा हात पुढे करत होते.
पाहता पाहता, आज 'केवायसी'चे हे मानवी नेटवर्क काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात पसरले असून यामध्ये ५०० ते ६०० सदस्य सामील झाले आहेत. आपल्या स्वयंसेवकांच्या या जज्ब्यावर अभिमान व्यक्त करत मुसादिक म्हणतात, "ते हे काम करण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यांना लोकांची मनापासून काळजी आहे."
भाड्याच्या छताखाली रुजलेला विश्वासाचा पाया
आज 'केवायसी' संस्था भाड्याच्या एका अत्यंत साध्या जागेतून आपले काम चालवते. ही जागा या बेघरांसाठी राहण्याचे हक्काचे घरही आहे आणि एक कम्युनिटी सेंटरही आहे. कोणत्याही वेळी या भाड्याच्या शेल्टर होममध्ये साधारण १० ते १५ लोक राहतात. त्यांना तिथे केवळ पोटभर जेवण आणि सुरक्षितता मिळत नाही, तर ती आपुलकी मिळते ज्यासाठी ते वर्षांपासून तरसले होते.
दररोज या तरुणांची टोळी रस्त्यावर निघते आणि अशा चेहऱ्यांचा शोध घेते ज्यांना या समाजाने जिवंतपणीच विसरून दिले आहे. यामध्ये गंभीर मानसिक आजाराशी झुंजणारे लोक, स्वतःच्याच लोकांनी निर्दयीपणे सोडून दिलेले लोक किंवा जे रस्ता भटकून कुठेतरी हरवले आहेत अशा लोकांचा समावेश असतो.
या संपूर्ण मोहिमेचा सर्वात कठीण आणि संवेदनशील भाग म्हणजे 'विश्वास जिंकणे'. रस्त्यावर राहणाऱ्या या लोकांनी वर्षानुवर्षे लोकांचा केवळ तिरस्कार, संशय, शिव्या आणि वाईट वागणूकच सोसली आहे, हे 'केवायसी'ची टीम चांगली जाणून आहे. म्हणूनच हे तरुण त्यांच्यावर कोणताही नियम लादत नाहीत, तर फक्त त्यांच्याजवळ जाऊन गप्पपणे बसतात. मुसादिक या जादूई बदलाविषयी सांगतात, "बऱ्याच लोकांना आमच्याकडून रागाची किंवा गैरवर्तणुकीची अपेक्षा असते. पण जेव्हा आम्ही दयाळूपणा दाखवतो, तेव्हा ते हळूहळू आमच्यावर विश्वास ठेवू लागतात."
संस्थेचे एक सक्रिय स्वयंसेवक यावर रशीद या संपूर्ण प्रक्रियेची संवेदनशीलता स्पष्ट करताना सांगतात की, जेव्हा एखादे त्रस्त कुटुंब त्यांच्याशी संपर्क साधते, तेव्हा ते कसे पाऊल उचलतात: "आम्ही त्या व्यक्तीच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आधी एक फोटो मागतो. मग आम्ही हळूहळू त्यांच्याजवळ जाण्याचा आणि त्यांना आमच्यासोबत येण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करतो. या कामात खूप वेळ आणि संयमाची गरज असते."
जेव्हा आरशात स्वतःला पाहून रडला डिप्रेशनमध्ये गेलेला बिझनेसमैन
रस्त्यावरून या लोकांना रेस्क्यू करणे कधीही सोपे नसते. अनेकदा स्वयंसेवकांना हिंसक विरोध आणि तीव्र मानसिक धक्क्याचा सामना करावा लागतो. असाच एक मनाला चटका लावून जाणारा प्रसंग श्रीनगरमधील एका नामांकित बिझनेसमैनचा होता. त्यांनी नेपाळमध्ये एक व्यापार सुरू केला होता, ज्यामध्ये त्यांना २० ते ३० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले. या आर्थिक धक्क्याने त्यांना तीव्र डिप्रेशनच्या गर्तेत ढकलले. मानसिक संतुलन इतके बिघडले की त्यांनी आपल्या हसत्याखेळत्या कुटुंबाशी सर्व नातेसंबंध तोडले आणि रस्त्यावर कंगाल व एकटेपणाचे आयुष्य जगू लागले.
मुसादिक त्या अंगावर काटा आणणाऱ्या रेस्क्यूच्या आठवणी सांगताना म्हणतात, "जेव्हा ते आम्हाला मिळाले, तेव्हा ते खूप रागात होते आणि घाबरलेले होते. ते त्यांच्या पत्नीचे नाव घेऊन ओरडत होते. कोणी त्यांना हात लावलेला किंवा त्यांच्याशी बोललेले त्यांना चालत नव्हते. पण आम्ही त्यांच्यासोबतच थांबून राहिलो."
स्वयंसेवकांनी त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. त्यांना थोडा वेळ आणि स्वतःची जागा दिली, मग हळूहळू मदतीचा हात पुढे केला. त्यांचे केस कापण्यात आले, त्यांची दाढी स्वच्छ केली गेली, त्यांना सुरक्षितपणे आंघोळ घातली गेली आणि स्वच्छ कपडे घालण्यात आले. यानंतर जेव्हा त्यांच्यासमोर एक आरसा ठेवण्यात आला, तेव्हाचा प्रसंग सांगताना मुसादिक भावूक होतात, "जेव्हा त्यांनी स्वतःला पाहिले, तेव्हा त्यांच्यात काहीतरी बदलले. कोणीतरी आपली काळजी घेतल्यावर कसे वाटते, याची जणू त्यांना पुन्हा आठवण झाली."
समाजाची बदलती विचारसरणी
सुरुवातीला जेव्हा या कमी वयाच्या मुलांनी हे काम सुरू केले, तेव्हा समाजातील लोक गोंधळात पडले. काही लोकांनी तिखट सवाल केले की, अखेर ही तरुण मुले अशा प्रकरणांमध्ये का लक्ष घालत आहेत जी त्यांची जबाबदारीच नाही? काहींना यावरही संशय होता की, मूठभर मुलांच्या या कामाने समाजात काही मोठा बदल घडू शकतो का? पण जसजसे एक-एक करून मानवी आयुष्य सुधारू लागले, तसतशा यांच्या कहाण्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. हा बदल केवळ सोशल मीडियावरच राहिला नाही, तर गल्लीबोळात, दुकानदार, शेजारी आणि सामान्य कुटुंबांच्या रोजच्या संभाषणाचा भाग बनला.
या बदलाची ग्वाही देताना श्रीनगरचे एक सामान्य रहिवासी म्हणतात, "पूर्वी आम्ही बेघर लोकांना पाहून दुर्लक्ष करत होतो. आता आम्ही त्यांच्याकडे मदतीची गरज असलेले लोक म्हणून पाहतो." तर पुलवामा येथील एक स्थानिक दुकानदार भावूक होऊन सांगतात की त्यांनी आपल्या डोळ्यांनी या तरुणांना बदलताना पाहिले आहे, "ते केवळ बदलाच्या गप्पा मारत नाहीत. ते प्रत्यक्षात जमिनीवर काम करतात." हे दुकानदार अनेकदा या स्वयंसेवकांना बेघर लोकांसाठी स्वतःच्या खिशातील पैशांनी नियमितपणे जेवण खरेदी करताना पाहत असत.
लोकांच्या विचारसरणीत आलेला हाच बदल या संस्थेचा सर्वात मोठा विजय आहे. आता समाज त्यांच्याकडे संशयाने पाहत नाही. लोक स्वतःहून पुढे येऊन कपडे, जेवण आणि रेशन दान करत आहेत. दुकानदारांनी या तरुणांसाठी साहित्यावर सवलत देण्यास सुरुवात केली आहे. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते नोकरीपेशा लोकांपर्यंत सर्वजण आपला वेळ काढून स्वयंसेवक बनण्यासाठी रांगेत उभे आहेत. ज्या सुरुवातीची तुलना एका छोट्या लावेशी केली जाऊ शकते, ती आज काश्मीरमध्ये एका मोठ्या जनआंदोलनात बदलली आहे.
आयुष्याची दुसरी संधी
'काश्मीर यूथ करेज'चा उद्देश केवळ एखाद्याला एका वेळचे जेवण देऊन आपली जबाबदारी संपवणे हा नाही. त्यांचे अंतिम ध्येय या भटकलेल्या लोकांना त्यांची हरवलेली मानवी प्रतिष्ठा परत मिळवून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. संस्थेचे पहिले प्राधान्य त्यांना त्यांच्या कुटुंबाशी मिळवून देणे हे असते. पण जे लोक एखाद्या मानसिक धक्क्यामुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे घरी परत येऊ शकत नाहीत किंवा येऊ इच्छित नाही, 'केवायसी' त्यांना केवळ छप्पर देत नाही, तर जगण्याचे एक नवीन ध्येयही देते.
याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मध्यमवयीन 'समीर' (बदललेले नाव) आहेत. ते स्किझोफ्रेनिया (एक गंभीर मानसिक आजार) या आजाराने ग्रस्त आहेत. जेव्हा आजार वाढला, तेव्हा त्यांच्या सख्ख्या कुटुंबाने त्यांना बेसहारा सोडून दिले. जेव्हा 'केवायसी'च्या टीमला समीर रस्त्याच्या कडेला मिळाले, तेव्हा ते खूप घाबरलेले आणि आक्रमक होते. ही मुले आपल्यासोबत काय करू इच्छितात, हे त्यांना समजत नव्हते. पण तरुणांनी हार मानली नाही.
कोणताही दबाव न आणता, केवळ प्रेम, संयम आणि आपुलकीच्या जोरावर हळूहळू समीरचे मन जिंकले गेले. आज समीर केवळ पूर्णपणे सुरक्षित अनुभवत नाहीत, तर ते या संस्थेचे सर्वात समर्पित आणि कष्टाळू स्वयंसेवक बनले आहेत. समीरच्या डोळ्यांत आज एक नवीन चमक आहे, ते हसत म्हणतात, "पुन्हा एकदा स्वतःला कोणत्या तरी कामासाठी उपयुक्त समजणे खूप छान वाटते. त्यांनी मला जगण्याची दुसरी संधी दिली आहे."
"आता नजर फिरवून घेणे हा पर्याय नाही"
मुसादिक बशीर यांचे मानणे आहे की, ही मानवी वेदना आणि हा प्रयत्न कोणत्याही एका संस्थेपुरता, जिल्ह्यापुरता वा राज्यापुरता मर्यादित राहू नये. 'केवायसी'चे हे निस्वार्थी मॉडेल देशाच्या कानाकोपऱ्यात राबवले जावे अशी त्यांची इच्छा आहे, कारण ही समस्या केवळ काश्मीरची नाही. ते म्हणतात, "ही केवळ एका जागेची गोष्ट नाही. प्रत्येक ठिकाणी असे लोक आहेत ज्यांना त्यांच्या कुटुंबाने सोडून दिले आहे. जर आम्ही इथे मदत करू शकतो, तर इतर लोक दुसऱ्या ठिकाणी मदत करू शकतात."
तथापि, या चांगल्या मार्गावर अडचणींची कमतरता नाही. आजही ही संस्था अत्यंत मर्यादित संसाधनांच्या जोरावर काम करत आहे. त्यांच्या शेल्टर होममध्ये जागा खूप लहान आहे. बेघरांच्या संख्येच्या मानाने वैद्यकीय पुरवठा आणि औषधे मिळवणे अनेकदा मोठे आव्हान ठरते. ही संपूर्ण संस्था कोणत्याही सरकारी मदतीवर चालत नाही, तर ती सामान्य जनतेच्या छोट्या-छोट्या ऐच्छिक योगदानावर आणि या तरुणांच्या स्वतःच्या खिशातील पैशांवर टिकून आहे.
संपूर्ण जगाला आवाहन करताना मुसादिक म्हणतात, "छोटेसे योगदानही मोलाचे ठरते. पण जर तुम्ही पैसे देऊ शकत नसाल, तर तुमचा वेळ द्या. या लोकांबद्दल विचार करा. जर तुम्ही कोणाला रस्त्यावर पडलेले पाहिले, तर त्यांना जेवण द्या. तेही आपल्यासारखेच माणूस आहेत."
आजच्या या धावपळीच्या, स्वार्थी जगात जिथे कोणाचे दुःख पाहून डोळे फिरवून घेणे आणि पुढे निघून जाणे सर्वात सोपा मार्ग मानला जातो, तिथे 'काश्मीर यूथ करेज'चे हे तरुण थांबण्याचा, वेदना अनुभवण्याचा आणि जबाबदारी घेण्याचा कठीण मार्ग निवडत आहेत. हे तरुण सिद्ध करत आहेत की पुनर्वसनाचा अर्थ केवळ एखाद्याच्या शरीराला कपडे देणे नव्हे, तर त्याच्या आत्म्याला सन्मान, प्रतिष्ठा आणि जगण्याची नवीन उमेद परत मिळवून देणे हा आहे.
मुसादिक बशीर यांनी 'आवाज द व्हॉईस'शी बोलताना सांगितले की, त्यांना या कार्यात स्थानिक सरकारी प्रशासनाचेही पूर्ण सहकार्य लाभले आहे. पण भविष्यात या योजनेच्या विस्तारासाठी सरकारनेही महत्त्वाची पावले उचलणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटते. केवळ सोशल मीडिया आणि क्राउड फंडिंगच्या जोरावर आम्ही जास्त काळ अशा प्रकारे काम करू शकणार नाही. मुसादिक यांच्या मनातून आलेली एक अंतिम गोष्ट आज आपल्या सर्वांच्या बंद दारांवर थाप मारते: "जर आपण अशा लोकांची मदत केली नाही ज्यांचे या जगात कोणीच नाही, तर मग कोण करणार?"