ठाणे
महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे गुरुवारी रात्री उशिरा एक चार मजली जुनी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून, अजूनही ४ ते ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
पावरलूम शहर असलेल्या भिवंडीतील बालाजी नगर परिसरातील कोहिनूर इमारतीचा एक भाग गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक पत्त्याच्या महालाप्रमाणे कोसळला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीतून काही आवाज आल्यामुळे काही स्थानिक रहिवाशांनी सतर्कता दाखवून अनेकांना बाहेर काढले होते, मात्र तरीही काही लोक आत अडकले.
या इमारतीत एकूण ४८ खोल्या होत्या, ज्या महापालिकेने यापूर्वीच धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या. इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच हा अनर्थ घडला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती दल (NDRF), ठाणे आपत्ती दल (TDRF) आणि स्थानिक अग्निशामक दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. चार फायर इंजिन, दोन रुग्णवाहिका आणि डोग स्कॉडच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. या चालू मान्सूनमध्ये ठाणे जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे.