मुस्लिमांनी आदर गमावला, म्हणूनच द्वेष वाढला - मौलाना साद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
मौलाना साद
मौलाना साद

 

भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये असलेल्या पूर्वग्रहाचे कारण म्हणजे, अनेक मुस्लिमांनी आपल्या देशबांधवांप्रती आदराची भावना गमावली आहे - ही तीच भावना आहे जी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इतरांप्रती दाखवली होती, असे मत तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मुहम्मद साद कंधलवी यांनी एका अलीकडील भाषणात व्यक्त केले.

नुकतेच मेवातमध्ये आयोजित एका विशाल तबलिगी 'इज्तेमा'मध्ये (धार्मिक मेळावा) त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित होते आणि वृत्तानुसार, हे आयोजन अत्यंत अनुकरणीय आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमातील मौलाना साद यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ तेव्हापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

यावेळी मौलाना साद म्हणाले, "मुस्लिम आपल्या देशबांधवांचा आदर कसा करायचा हे विसरले आहेत. परस्पर आदराची वृत्ती नाहीशी होत आहे, वास्तविक पाहता इस्लाम आपल्याला इतर धर्मांच्या आपल्या बंधू-भगिनींप्रती आदर दाखवण्यास शिकवतो."

 

त्यांनी धार्मिक धर्मांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केले, आणि स्पष्ट केले की इस्लाम श्रद्धेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा फसवणूक करण्याची परवानगी देत नाही. "इस्लाम आदराची शिकवण देतो. तो तुम्हाला कोणालाही जबरदस्तीने धर्मांतरित करण्याची, त्यांना धमकावण्याची किंवा आमिष दाखवून इस्लाममध्ये आणण्याची परवानगी देत नाही. धर्मात कोणतीही जबरदस्ती नाही. इस्लाम हा शांतीचा धर्म आहे आणि प्रत्येकाला त्यांनी निवडलेला मार्ग अवलंबण्याची परवानगी देतो," असे ते म्हणाले.

मौलाना साद यांनी पुढे स्पष्ट केले की, इस्लाममधील जबरदस्ती ही मुस्लिमांवरच लागू होते, ती पण जेव्हा प्रार्थनेचा (नमाजचा) प्रश्न येतो: "जर एखाद्या मुस्लिमाने नमाजकडे दुर्लक्ष केले, तर त्याला आठवण करून दिली पाहिजे आणि प्रोत्साहित केले पाहिजे - पण हा नियम गैर-मुस्लिमांना लागू होत नाही."

या वर्षीचा मेवात इज्तेमा आणखी एका कारणासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. हा सोहळा हिंदू-मुस्लिम सलोख्याचे प्रतीक बनला. मुस्लिम स्वयंसेवकांसोबतच, अनेक स्थानिक हिंदूंनीही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. काहींनी चहाचे स्टॉल लावले, तर काहींनी शाकाहारी बिर्याणीची व्यवस्था केली किंवा इतर प्रकारची सेवा देऊ केली.

हे सहकार्य आणि परस्पर आदर पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. त्यातून एकतेची एक हृदयस्पर्शी प्रतिमा सादर केली. मुस्लिमांचा हा प्रचंड मोठा मेळावा कोणताही गोंगाट, गोंधळ किंवा कोणताही अडथळा न येता शांततेत पार पडला. सहभागी शांतपणे आले आणि शांतपणे निघून गेले, मात्र मागे शांतता आणि सहअस्तित्वाचा संदेश ठेवून!


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter