उत्तराखंडच्या धर्तीवर देशभर समान नागरी कायदा हवा - सरसंघचालक मोहन भागवत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तराखंडच्या धर्तीवर देशभरात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याचे समर्थन केले आहे. संघाच्या १०० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित माजी सैनिकांच्या संवाद मेळाव्यात भागवत म्हणाले, "समान नागरी कायदा लागू झाला तर ती अतिशय चांगली गोष्ट असेल... हे संपूर्ण देशात घडल्यास उत्तम ठरेल, मात्र तो उत्तराखंडप्रमाणेच लागू व्हायला हवा असे माझे मत आहे." 

गेल्या वर्षी २७ जानेवारी रोजी समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले होते. सरसंघचालकांनी समान नागरी कायद्याचे कौतुक करताना म्हटले की, समाजाला एकत्र जोडण्यासाठी हे आवश्यक आहे. उत्तराखंडमध्ये या कायद्याचा मसुदा तयार केल्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी ठेवला गेला होता. त्यानंतर ३ लाख लोकांकडून सूचना प्राप्त झाल्या, ज्यांचा विचार करून त्यांचा स्वीकार करण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मुद्द्यावर भाष्य करण्यास नकार देताना भागवत म्हणाले की, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

लष्करी आणि निमलष्करी दलातील निवृत्त जवान व अधिकारी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात सरसंघचालक म्हणाले की, देश स्वतंत्र असला तरी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी संरक्षण दलांची गरज नेहमीच राहणार आहे. संघाची स्थापना कोणत्याही बाह्य संसाधनांशिवाय झाली आणि दोनदा कडक निर्बंध लादले जाऊनही समाजाच्या आत्मविश्वासाच्या बळावर संघाने प्रगती सुरू ठेवली, असे त्यांनी सांगितले.

स्वयंसेवकांचे समर्पित कार्य पाहण्यासाठी माजी सैनिकांनी संघाच्या शिबिरांना आणि कार्यक्रमांना उपस्थित राहावे, तसेच आपल्या आवड व क्षमतेनुसार सेवा कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही भागवत यांनी यावेळी केले.