बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात राजस्थानच्या मुस्लिम संघटनांकडून तीव्र निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
राजस्थानमधील मुस्लीम विचारवंत
राजस्थानमधील मुस्लीम विचारवंत

 

फरहान इसराइली

बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर झालेला हिंसाचार, हत्या आणि कथित मॉब लिंचिंगच्या घटनांनी केवळ शेजारी देशासच नव्हे, तर संपूर्ण उपखंडाच्या सदसद्विवेकबुद्धीला हादरवून सोडले आहे. या अमानवीय घटनांबाबत राजस्थानमध्ये व्यापक आणि तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. राज्यातील मुस्लिम संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधींनी एकमुखाने या घटनांचा कडक शब्दांत निषेध केला आहे. धर्माच्या नावाखाली कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर अत्याचार करणे इस्लाममध्ये मान्य नाही आणि कोणत्याही सभ्य समाजात ते स्वीकारार्ह नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजस्थानच्या भूमीतून उठलेला हा आवाज हेच सिद्ध करतो की माणुसकी, न्याय आणि मानवाधिकार ही कोण्या एका धर्माची किंवा समुदायाची मक्तेदारी नाही. ही मूल्ये सर्वांच्या सामायिक भावनांचे प्रतिनिधित्व करतात. बांगलादेशात घडलेला प्रकार हा केवळ अल्पसंख्याकांच्या अधिकारांवरील हल्ला नाही, तर तो धर्माच्या मूळ शिकवणीचाही अपमान आहे, असे वक्त्यांनी सांगितले.

मुस्लिम प्रोग्रेसिव्ह फेडरेशन राजस्थानचे संयोजक अब्दुल सलाम जोहर यांनी बांगलादेशातील हिंदू समुदायावर झालेला अत्याचार आणि हत्यांच्या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला. या घटना इस्लामची शिकवण, मानवी हक्क आणि मूळ मानवी मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही धर्म निर्दोषांची हत्या आणि अत्याचाराची परवानगी देत नाही, असे ते म्हणाले. बांगलादेश सरकारने अशा हल्ल्यांना तात्काळ रोखावे आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोहर यांनी केली. तसेच, भारत सरकारने राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलून तेथील अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जयपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि कला संवर्धन तज्ज्ञ मैमुना नर्गिस यांनी या मुद्द्याला व्यापक सामाजिक संदर्भात मांडले. इस्लाम आपल्या धर्माचे पालन करण्यास सांगतो, पण इतरांच्या धर्माचा अपमान करू नये अशी स्पष्ट शिकवण देतो, असे त्या म्हणाल्या. बांगलादेशातील हत्या आणि मॉब लिंचिंगचा निषेध करत त्यांनी या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्यांनी प्रसारमाध्यमे आणि समाजाच्या दुहेरी भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हिंसा कोठेही झाली तरी ती हिंसाच असते आणि नाव किंवा ओळख बदलल्याने तिचा अर्थ बदलत नाही, असे त्या म्हणाल्या. भारतात घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवरही तितक्याच संवेदनशीलतेने आणि कठोरपणे आवाज उठवला जावा, अशी मागणी त्यांनी केली.

राजकारणी आणि समाजसेवक अमीन पठाण यांनी बांगलादेशात ईशनिंदेच्या नावाखाली झालेल्या क्रूर हत्येचा निषेध केला. इस्लाम हा शांतता, दया आणि न्यायाचा धर्म आहे, हिंसा आणि द्वेषाचा नाही, असे त्यांनी सांगितले. गुन्हेगारांना धर्माच्या नावाखाली पाठीशी घालू नये, कारण अशा घटनांमुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडले. त्यांच्या मते, सर्व प्रकारच्या हिंसेविरोधात उभे राहणे हीच खरी माणुसकी आहे.

मानवाधिकार कार्यकर्त्या आणि लेखिका रुबी खान यांनी बांगलादेशातील ही घटना संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे सांगितले. कोणत्याही धर्मात अशा हिंसेला स्थान नाही, यावर त्यांनी भर दिला. धर्माच्या नावाखाली होणारा अत्याचार हा केवळ धार्मिक शिकवणीचा अपमान नाही, तर तो समाज तोडणाऱ्या विचारांना खतपाणी घालतो. जगभरातील मुस्लिम अशा घटनांचा निषेध करतात आणि माणुसकीपेक्षा कोणताही मोठा धर्म नाही, असे मानतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रांतीय मुस्लिम तेली महापंचायतचे अध्यक्ष अब्दुल लतीफ आर्को यांनी प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावर प्रश्न उपस्थित केले. पूर्ण चौकशी आणि ठोस तथ्यांशिवाय जातीय निष्कर्ष काढणे धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही हिंदूची हत्या झाली असल्यास ती निंदनीय आहे आणि त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अफवा आणि तोडमोड केलेल्या तथ्यांच्या आधारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न देशहिताचा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

नॅशनल मुस्लिम वुमेन वेलफेअर सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा निशात हुसैन यांनी बांगलादेशातील एका हिंदू तरुणाच्या निर्घृण हत्येवर तीव्र दुःख व्यक्त केले. धर्माच्या नावावर कोणत्याही निर्दोषाची हत्या करणे ही बहादुरी नाही आणि ती कोणत्याही धर्माची शिकवणही नाही, असे त्या म्हणाल्या. बांगलादेश सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अल्पसंख्याकांची सुरक्षा निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पीडित कुटुंबाप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केली.

वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाच्या जयपूर जिल्हाध्यक्षांनी, फिरोजउद्दीन यांनीही या घटनांचा तीव्र निषेध केला. हिंसा आणि द्वेषाचा कोणत्याही धर्माशी संबंध असू शकत नाही, असे ते म्हणाले. समाजात शांतता आणि बंधुभाव टिकवून ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

शिक्षणतज्ज्ञ डॉ. मोहम्मद शोएब यांनी सांगितले की, ईशनिंदेच्या नावाखाली केलेली कोणतीही हत्या इस्लाममध्ये मान्य नाही आणि कोणत्याही सभ्य समाजातही ती स्वीकारली जात नाही. शांतता आणि बंधुभावासाठी हिंसेच्या प्रत्येक रूपाविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

एकूणच, राजस्थानमधून उमटलेले हे आवाज स्पष्ट संदेश देतात की, धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेविरोधात समाजाचा विवेक आजही जिवंत आहे. हा सामूहिक आवाज केवळ बांगलादेश सरकारकडे न्यायाची मागणी करत नाही, तर संपूर्ण क्षेत्रात शांतता, सहजीवन आणि माणुसकी पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही करतो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter