तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; रमजाननिमित्त मुस्लीम कर्मचाऱ्यांना कामातून लवकर सुट्टी, शाळांच्या वेळेतही बदल!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने राज्यातील मुस्लीम समुदायातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रमजानच्या काळात मुस्लीम कर्मचाऱ्यांना आपले धार्मिक विधी आणि उपवास (रोजा) योग्य वेळेत सोडता यावेत, यासाठी कार्यालयीन वेळेत सवलत देण्याचा अधिकृत आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. या निर्णयानुसार, मुस्लीम कर्मचारी आता या महिनाभरात त्यांच्या नियोजित वेळेच्या आधी, म्हणजेच दुपारी ४:०० वाजता कार्यालयातून घरी जाऊ शकतील.

अधिकृत शासन निर्णय 

मुख्य सचिव के. रामकृष्ण राव यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. यानुसार तेलंगणा सरकारच्या वतीने १७ फेब्रुवारीला 'मेमो क्रमांक ६७७/पोल.बी/२६' द्वारे हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. ही सवलत केवळ नियमित सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून तिची व्याप्ती मोठी आहे. राज्यातील सर्व मुस्लीम शासकीय कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना ही सुविधा लागू असेल. तसेच विविध सरकारी मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSUs) कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ घेता येईल. या सर्व कर्मचाऱ्यांना शाळा आणि कार्यालयांमधून दुपारी ४:०० वाजता बाहेर पडण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.

शाळांसाठीही नियमावली लागू 

१९ फेब्रुवारी ते २० मार्च या काळात सर्व उर्दू माध्यमाच्या सरकारी आणि अनुदानित शाळा, समांतर माध्यमाच्या शाळांमधील उर्दू माध्यम विभाग आणि डीआयईटी (DIET) महाविद्यालये सकाळी ८:०० ते दुपारी १:३० या वेळेत सुरू राहतील. कमी झालेल्या तासांची भरपाई करण्यासाठी उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना एक अतिरिक्त दिवस काम करावे लागेल. तसेच प्राथमिक शाळांना दोन कामकाजाच्या दिवशी त्यांचे वेळापत्रक ३० मिनिटांनी वाढवावे लागणार आहे. प्रादेशिक आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना प्रस्थापित पद्धतीनुसार सुधारित वेळा आणि भरपाईच्या व्यवस्थेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय

आंध्र प्रदेश सरकारनेही अशाच प्रकारचे आदेश जारी केले असून सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमधील मुस्लीम कर्मचाऱ्यांना रमजानच्या काळात कामावरून एक तास लवकर घरी जाण्याची परवानगी दिली आहे. आंध्र प्रदेशातील अल्पसंख्याक कल्याण मंत्री एन.एम.डी. फारुख यांनी सांगितले की, ही सवलत १८ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत लागू असेल. उपवासाच्या महिन्यात धार्मिक प्रथांचे पालन करणे सोपे व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती वगळता सर्व विभागांना या नियमाची एकसमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

धार्मिक विधींसाठी विशेष तरतूद

रमजान हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लीम बांधव पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत कडक उपवास पाळतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी उपवास सोडण्याची (इफ्तार) वेळ असते. या वेळेत कर्मचाऱ्यांना घरी पोहोचून कुटुंबासोबत सहभागी होता यावे आणि सायंकाळच्या विशेष प्रार्थनांमध्ये व्यत्यय येऊ नये, या दृष्टिकोनातून सरकारने हा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना धार्मिक कर्तव्यांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, हा या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter