‘यामुळे’ सरदार पटेलांचा होता वेगळ्या मुस्लिम मोहोल्यांना विरोध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमवेत राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमवेत राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

 

साकिब सलीम

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे (TISS) प्राध्यापक अब्दुल शबान लिहितात, "दंगलींची भीती, आर्थिक अक्षमता आणि धार्मिक ओळखीमुळे घरांच्या बाजारपेठेतील भेदभाव यामुळे, मुस्लिम मोठ्या प्रमाणावर शहरांच्या जुन्या भागांतील आपल्या एकाकी वस्त्यांमध्ये (ghettoes) अडकून राहिले आहेत. या वस्त्या विकासाचा अभाव आणि इतरांची भीती यांनी ग्रासलेल्या आहेत."

न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांच्या नेतृत्वाखालील समितीने, भारतातील मुस्लिम समुदायाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीवरील आपल्या अहवालात असेही नमूद केले आहे की, "एकाकी वस्त्यांमध्ये राहिल्याने त्यांना त्यांच्या संख्येमुळे सुरक्षिततेची भावना मिळत असली तरी, त्याचा समाजाला फायदा झालेला नाही. असे सुचवले गेले की, मुस्लिम एकत्रित वस्त्यांमध्ये (ऐतिहासिक कारणांमुळे आणि वाढत्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे) एकत्र राहिल्याने ते नगरपालिका आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित होण्याचे सोपे लक्ष्य बनले आहेत. पाणी, स्वच्छता, वीज, शाळा, सार्वजनिक आरोग्य सुविधा, बँकिंग सुविधा, अंगणवाड्या, रेशन दुकाने, रस्ते आणि वाहतूक सुविधा या सर्वांची या भागात कमतरता आहे."

"वाढत्या वस्तीकरणाच्या संदर्भात, या सेवांच्या अनुपस्थितीचा सर्वाधिक परिणाम मुस्लिम महिलांवर होतो, कारण त्या 'सुरक्षित' परिसराच्या बाहेर जाऊन इतर ठिकाणांहून या सुविधा मिळवण्यास कचरतात. समाजाचे वाढते वस्तीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात त्यांच्यासाठी जागा कमी होणे; हा एक अस्वास्थ्यकर ट्रेंड आहे जो जोर पकडत आहे."

विद्वान, विश्लेषक आणि विचारवंत यावर जवळजवळ एकमत आहेत की, मुस्लिमांच्या वस्तीकरणाचा भारतातील या सर्वात मोठ्या धार्मिक अल्पसंख्याकांच्या विकासावर हानिकारक परिणाम झाला आहे. ही प्रक्रिया स्वातंत्र्यापूर्वीच २० व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली, जेव्हा हिंदू-मुस्लिम दंगलींनी लोकांना, विशेषतः शहरी भागांमध्ये, घाबरवायला सुरुवात केली. याच सुमारास, विलगीकरण (segregation) सुरू झाले आणि फाळणीनंतर ते अधिक स्पष्ट झाले. मुस्लिमांना 'आपल्या लोकांमध्ये' राहायचे होते आणि हिंदूंना त्यांच्या भागात 'इतर' नको होते.

जवाहरलाल नेहरूंसह बहुतेक भारतीय राजकारण्यांनी ही एक कायदेशीर इच्छा मानली. त्यांचा विश्वास होता की मुस्लिमांना त्यांचे 'सुरक्षित क्षेत्र' (safe spaces) मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सरदार वल्लभभाई पटेल यांचे मत वेगळे होते. अगदी सुरुवातीपासूनच ते 'एखाद्या समुदायासाठी विशेष जागा' या कल्पनेच्या विरोधात होते. त्यांना दूरदृष्टी होती की, अशा धोरणामुळे एखाद्या समुदायाचे वस्तीकरण होईल आणि ते राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यापासून थांबतील.

फाळणीनंतर, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येची अदलाबदल होत होती, तेव्हा दिल्लीतही निर्वासितांचा मोठा ओघ आला. २१ नोव्हेंबर १९४७ रोजी जवाहरलाल नेहरूंनी सरदार पटेलांना पत्र लिहिले की, मुस्लिमबहुल भागांतील घरे, त्यांच्या मालकांनी पाकिस्तानात स्थलांतर केल्यामुळे, गैर-मुस्लिमांना देऊ नयेत. त्यांचा विश्वास होता की यामुळे समस्या निर्माण होतील आणि मुस्लिमांना गैर-मुस्लिमांसोबत राहणे असुरक्षित वाटेल.

सरदार पटेलांनी उत्तर दिले की, ते शहरात मुस्लिम वस्त्या आणि हिंदू वस्त्या निर्माण करण्याच्या विरोधात आहेत. त्यांच्या मते, यामुळे दोन्ही गटांमधील शत्रुत्व वाढेल आणि त्यांच्यातील संवाद कमी होईल. रिकामी घरे देताना, भोगवटादारांचे चारित्र्य तपासण्याची गरज त्यांनी मान्य केली, परंतु त्यांचा धर्म तपासण्याची नाही.

९ डिसेंबर १९४७ रोजी, सरदार पटेलांनी के.सी. नियोगी यांना त्यांच्या सूचनेवर उत्तर दिले की, निर्वासित आणि दंगल पीडितांशी व्यवहार करण्यासाठी, केवळ त्यांच्याच धर्माचे सरकारी कर्मचारी आणि पोलीस तैनात करावेत. पटेल म्हणाले की, अशा दृष्टिकोनामुळे समाजात आणखी दरी निर्माण होईल. त्यांचा विश्वास होता की अशा दृष्टिकोनामुळे आधीच विभागलेला समाज आणखी विभागला जाईल. किमान सरकार तरी आपल्या धोरणांमध्ये जातीय फूट अधिक दृढ करू शकत नाही.

सरदार पटेलांची धोरणे मुस्लिमविरोधी होती, हा अनेकदा केला जाणारा आरोप टिकत नाही, जर आपण धर्मनिरपेक्ष भारतात हिंदू आणि मुस्लिमांनी एका मिश्र समाजात राहावे, यावरील त्यांच्या विश्वासाप्रती असलेली वचनबद्धता पाहिली. ५ सप्टेंबर १९४७ रोजी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सरदार पटेलांना पत्र लिहिले की, त्यांनी दिल्लीतील मुस्लिम पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी, कारण त्यांच्या उपस्थितीत हिंदू लोकसंख्येला सुरक्षित वाटत नाही. त्यांनी हिंदूंना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देण्यास आणि दिल्लीतील मुस्लिम शस्त्र विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यासही सांगितले.

राजेंद्र प्रसाद हे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते आणि त्यांना नाही म्हणणे कठीण होते. सरदार पटेलांनी त्यांना सांगितले की, हे पोलीस अधिकारी कायमस्वरूपी कर्मचारी आहेत आणि जोपर्यंत ते पाकिस्तानात जाण्याचा पर्याय निवडत नाहीत, तोपर्यंत त्यांना काढता येणार नाही. शस्त्रांबद्दल ते म्हणाले की, ते शस्त्र वितरणासाठी अधिक उदार धोरण तयार करू शकत नाहीत, कारण त्यांना "खात्री नाही की ही शस्त्रे मुस्लिमांविरुद्ध वापरली जाणार नाहीत."

सरदार पटेलांचा असा विश्वास नव्हता की हिंदू आणि मुस्लिमांनी वेगळ्या वस्त्यांमध्ये राहावे किंवा स्वधर्मीयांनीच लोकांची सेवा करावी. त्यांच्या मते, भारत तेव्हाच समृद्ध होऊ शकेल जेव्हा लोक एकत्र राहतील, एकमेकांत मिसळतील आणि एकमेकांची सेवा करतील. हे महात्मा गांधींच्या शिकवणीनुसारच होते, ज्यांनी अनिस किडवाई यांना, त्यांचे पती एका हिंदू जमावाने मारल्यानंतर, हिंदू निर्वासितांची सेवा करण्यास सांगितले होते, कारण त्यांचा विश्वास होता की केवळ आंतर-सामुदायिक संवादातूनच आपण जातीयवादाला पराभूत करू शकू.

मुस्लिमांचे वस्तीकरण हे स्वतः मुस्लिमांसाठीच एक समस्या बनेल, जसे सरदार पटेलांनी १९४७ मध्येच ओळखले होते. त्या वेळी त्यांच्या विचारांना अनेकांनी मुस्लिमविरोधी म्हटले होते.

१९४९ मध्ये सरदार पटेलांनी हैदराबादमध्ये म्हटले होते, “मुस्लिम परके नाहीत. ते आपल्यातूनच आहेत. गांधीजी नेहमीच म्हणत की, जर आपल्याला खरे स्वराज्य हवे असेल, तर आपण अस्पृश्यता संपवली पाहिजे; आपण हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र केले पाहिजे... आपल्या धर्मनिरपेक्ष राज्यात, आम्हीदेखील हा प्रयत्न केला आहे की, मुस्लिमांना समान नागरिक म्हणून त्यांचे सर्व हक्क मिळावेत.”

मिश्र लोकवस्त्या का आहेत गरजेच्या? आतिर खान यांचा 'हा' लेखही जरूर वाचा 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter