कब्रस्तानमध्ये हुल्लडबाजी नको! शब-ए-बरातसाठी इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे कडक नियम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
इस्लामिक विद्वान आणि ऐशबाग ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महली
इस्लामिक विद्वान आणि ऐशबाग ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महली

 

पवित्र 'शब-ए-बरात'च्या पार्श्वभूमीवर इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया (ICI) ने मुस्लीम समुदायासाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्रसिद्ध इस्लामिक विद्वान आणि ऐशबाग ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी या रात्रीचे पावित्र्य राखण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

प्रार्थना आणि इबादतीची रात्र
मौलाना खालिद रशीद यांनी सांगितले की, शब-ए-बरात ही रात्र नशिबाचा हिशोब आणि ईश्वरी क्षमेची रात्र आहे. त्यामुळे या रात्री जास्तीत जास्त वेळ मस्जिद आणि घरांमध्ये इबादत (प्रार्थना), कुराण पठण आणि नफिल नमाजमध्ये घालवावा. ही रात्र केवळ दिखाव्यासाठी नसून ती आत्मचिंतनासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्गदर्शक तत्त्वातील महत्त्वाचे मुद्दे:
 * फटाके फोडण्यावर बंदी: शब-ए-बरात ही आनंदाची किंवा आतषबाजीची रात्र नाही. त्यामुळे फटाके फोडून ध्वनिप्रदूषण करू नये आणि इतरांना त्रास देऊ नये.
 * कब्रस्तानमधील शिस्त: आपल्या पूर्वजांच्या थडग्यावर (कब्र) फातिहा पठण करण्यासाठी जाताना तिथे गर्दी करू नये. शांतता राखावी आणि तिथे आरडाओरडा किंवा हुल्लडबाजी होणार नाही याची काळजी घ्यावी.
 * रस्त्यांवर गर्दी टाळा: तरुणांनी दुचाकीवरून स्टंटबाजी करणे किंवा रस्त्यावर विनाकारण गर्दी करणे टाळावे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि समुदायाची प्रतिमा मलिन होते.
 * साधेपणाने साजरी करा: ही रात्र साधेपणाने आणि धार्मिक विधींनुसार साजरी करावी. अनावश्यक खर्च टाळून गरिबांना मदत करावी.

सामाजिक सलोख्याचे आवाहन
इस्लामिक सेंटरने मुस्लीम तरुणांना विशेष आवाहन केले आहे की, त्यांनी या रात्री कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये किंवा पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करू नये. स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, जेणेकरून सण शांततेत पार पडेल.

शब-ए-बरातच्या निमित्ताने सर्व मशिदी आणि कब्रस्तानमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छतेची सोय ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास धार्मिक पावित्र्य राखण्यासोबतच सामाजिक सलोखाही टिकून राहील, असा विश्वास मौलाना फिरंगी महली यांनी व्यक्त केला आहे.

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter