इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि निषेद मोर्चे काढण्यात आले. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौक पूर्णपणे सील केला आहे. रविवारी झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर, सोमवारी खोऱ्यातील अनेक भागांत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
नागरी विमान वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल चौक आणि आसपासच्या संवेदनशील भागांत पोलीस आणि निमलष्करी दलाचे (CRPF) जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. जिल्हांतर्गत प्रवासावरही बंदी घालण्यात आली असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. निदर्शकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. तथापि, इमाम वाड्यांमध्ये शोक व्यक्त करण्यास मुभा देण्यात आली आहे.
या निर्बंधांमुळे राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. श्रीनगरचे खासदार आगा रुहुल्ला मेहदी यांनी लाल चौक सील करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. "घंटाघर (लाल चौक) बंद करणे ही लज्जास्पद बाब आहे. जेव्हा लोक शांततेत शोक व्यक्त करण्यासाठी बाहेर येतात, तेव्हा त्याला कायदा-सुव्यवस्थेची समस्या मानून लोकांच्या भावनांचा अपमान करू नका," असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तन्वीर सादिक यांनीही या निर्बंधांचा निषेध केला असून, लोकांना शांततेत शोक व्यक्त करू देण्याची विनंती केली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने काश्मीरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, काही भागांतील इंटरनेटचा वेगही कमी करण्यात आला आहे. धार्मिक संघटनांच्या महासंघाने (Mutahida Majlis-e-Ulama) सोमवारी शांततापूर्ण बंद पाळण्याचे आवाहन केले असून, मिरवाईज उमर फारुख यांनीही खामेनी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
इराणच्या सर्वोच्च नेत्याचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही जागतिक मुस्लिम समुदायासाठी धक्कादायक घटना मानली जात आहे. काश्मीरमधील लोकांचे इराणशी असलेले धार्मिक ऋणानुबंध लक्षात घेता, प्रशासनाकडून अत्यंत सावधगिरीने पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही जनतेला शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.