T20 World Cup 2026 : भारतात सामने खेळण्यास बांगलादेशचा नकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

येत्या काळात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान पाठोपाठ आता बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही (बीसीबी) भारतात खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. बांगलादेशने आपले विश्वचषकाचे सामने भारतातून इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे. खेळाडूंची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे कारण बीसीबीने पुढे केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (आयसीसी) नवीन पेच निर्माण झाला आहे.

भारत आणि श्रीलंका हे दोन देश मिळून २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणार आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे बांगलादेशला भारतात खेळणे सुरक्षित वाटत नाही. बीसीबीचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी याबाबत बोर्डाची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याचे संबंध तणावपूर्ण आहेत. अशा वातावरणात खेळाडूंना भारतात पाठवणे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आमचे सामने भारताबाहेर आयोजित करावेत, असा प्रस्ताव बीसीबीने ठेवला आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुरक्षेच्या कारणास्तव भारताचा बांगलादेश दौरा स्थगित केला होता. आता त्याच मुद्द्याचा आधार घेत बांगलादेशनेही भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशातील सत्ताबदलानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम आता क्रिकेटवर होत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार दिला होता. आता बांगलादेशनेही तोच मार्ग अवलंबला आहे. बांगलादेशचे सामने सह-यजमान श्रीलंकेत किंवा एखाद्या त्रयस्थ ठिकाणी हलवले जाण्याची शक्यता आहे. आयसीसी यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, आशियातील दोन प्रमुख संघानी भारतात खेळण्यास नकार दिल्याने आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.