नवी दिल्ली
पाकिस्तानच्या कारागृहात असलेले माजी पंतप्रधान आणि १९९२ चे विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांना मूलभूत मानवी सुविधा आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी आक्रमक आणि मानवतावादी भूमिका भारताचे महान कर्णधार कपिल देव यांनी घेतली आहे. जगातील २२ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधार्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत दुसरे पत्र पाठवल्यानंतर कपिल देव यांनी हे वक्तव्य केले.
नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना कपिल देव म्हणाले, "आम्हाला त्या देशाचे कायदे काय आहेत हे माहीत नाही, पण कोणतीही व्यक्ती कैदी असली तरी तिला मूलभूत सुविधा आणि मानवी वागणूक मिळायला हवी. इम्रान हे त्या देशाचे माजी पंतप्रधान आणि जगातील महान क्रिकेटपटू राहिले आहेत. आम्ही पाकिस्तान सरकारकडून कोणतीही उत्तरे मागत नसून, केवळ आमच्या मित्राला योग्य उपचार मिळावेत अशी विनंती करत आहोत." इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार वैद्यकीय तपासणी पूर्ण व्हावी, असा आग्रह या २२ माजी कर्णधारांनी धरला आहे.
दरम्यान, कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात झालेल्या वादावरही कपिल देव यांनी भाष्य केले. मैदानावर अशा घटना घडत असतात, मात्र खेळाडूंनी आक्रमकतेची सीमा ओलांडू नये यासाठी क्रिकेट बोर्डाने लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. या घटनेनंतर आयसीसीने (ICC) आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जयस्वाल आणि फर्नांडो या दोघांच्याही सामना मानधनातून २५ टक्के कपात केली आहे.