अर्जुन पुरस्कार विजेता ॲथलीट मोहम्मद अजमलची प्रेरणादायी कहाणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
मुहम्मद अजमल वरियाथोडी यांना अर्जुन पुरस्कार
मुहम्मद अजमल वरियाथोडी यांना अर्जुन पुरस्कार

 

मलिक असगर हाशमी

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील २८ वर्षांचा धावपटू मोहम्मद अजमल वरियाथोडी. यावर्षी ज्या १७ नामांकित खेळाडूंना देशाचा प्रतिष्ठित 'अर्जुन पुरस्कार' जाहीर झाला, त्यात अजमलचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले.

भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या अजमलने आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपच्या रिले स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा उंचवला. २०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ४x४०० मीटर रिले शर्यतीत आशियाई रेकॉर्ड मोडीत काढून फायनल गाठणे ही त्याची कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी मानली जाते.

यशाचा डंका अन् अनपेक्षित शांतता!
एवढ्या मोठ्या राष्ट्रीय बहुमानानंतर या खेळाडूवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होईल, अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. भारतीय क्रीडा क्षेत्रात अर्जुन पुरस्कार म्हणजे खेळाडूच्या कष्टाचे चीज होणे! आजवर देशातील ३५ हून अधिक मुस्लिम खेळाडूंनी हा सर्वोच्च सन्मान पटकावला आहे.

सीमेवर लढणारा सैनिक आणि मैदानावर उतरणारा खेळाडू, दोघांचेही ध्येय एकच असते— देश! खेळाला आणि खेळाडूला कुठलाही धर्म नसतो. तसे असते तर मोहम्मद अझरुद्दीन, सानिया मिर्झा किंवा निखत झरीन यांच्या चाहत्यांमध्ये फक्त एकाच समुदायाचे लोक दिसले नसते. भारतात खेळाडूंना सीमेच्या सीमा ओलांडून संपूर्ण देशाचे प्रेम मिळते. पण अशा वेळी आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचीही एक नैतिक जबाबदारी बनते की आपल्या हिऱ्याचे कौतुक उघड्या डोळ्यांनी अन् मोकळ्या मनाने व्हावे.

सामाजिक संस्थांची अनास्था का?
भारतीय समाजात जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावतो, तेव्हा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्याचा सत्कार करायला हवा. यामुळे येणाऱ्या पिढीला लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा मिळते.

पण दुर्दैवाने जमीयत उलेमा-ए-हिंद, जमात-ए-इस्लामी हिंद किंवा वक्फ बोर्डासारख्या मोठ्या मुस्लिम संस्थांच्या मंचावर अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा कौतुक सोहळा कधीच पाहायला मिळत नाही.

खेळ : गरिबी मिटवण्याचे अमोघ शस्त्र
खेळ हे नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध सुधारण्याचे एक प्रभावी माध्यम राहिले आहे. खेळाच्या जोरावर जगातील मोठे राजकीय तणाव निवळले आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी देशही मैदानावर खिलाडूवृत्तीने समोरासमोर येतात.

असे असूनही अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांना खेळाचे हे अनन्यसाधारण महत्त्व समजलेलेच नाही. उलटपक्षी, जेव्हा एखादी महिला खेळाडू अथांग कष्ट उपसून पुढे येते, तेव्हा तिच्या खेळाचे कौतुक करण्याऐवजी तिच्या कपड्यांवरून अन् राहणीमानावरून वाद निर्माण केले जातात. सानिया मिर्झा आणि निखत झरीनच्या बाबतीत समाजाने हे संकुचित रूप आधीही पाहिले आहे.

मुस्लिम संस्था जर सामाजिक कार्यात सक्रिय असतील, तर त्यांचा पूर्ण भर फक्त पारंपरिक शिक्षण आणि धर्मादाय कामांपुरता मर्यादित राहतो. वास्तविक पाहता, खेळ हे एक असे क्षेत्र आहे जे एखाद्या गरीब कुटुंबाची संपूर्ण तकदीर बदलून टाकू शकते. एखादा ॲथलीट जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतो, तेव्हा त्याला सन्मानाची सरकारी नोकरी आणि आर्थिक स्थैर्य मिळते. यामुळे फक्त तो खेळाडूच नाही, तर त्याचा संपूर्ण परिसर प्रगतीच्या वाटेवर धावू लागतो.

मदरसे अन् नव्या प्रतिभेचा शोध
या संपूर्ण प्रवासात मदरशांची भूमिका अत्यंत मोलाची ठरू शकते. मदरशांमध्ये शिकणारी बहुतांश मुले ही अत्यंत सामान्य किंवा गरीब घरातून आलेली असतात. देशातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा विभागाचे अधिकृत कोच तैनात आहेत.

जर या संस्थांनी पुढाकार घेऊन अशा मुलांना खेळाच्या मैदानापर्यंत पोहोचायला मदत केली, तर गल्लीबोळात दडलेली कित्येक नवी रत्ने देशासमोर येतील. जगात अशी हजारो उदाहरणे आहेत जिथे तरुणांनी जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर गरिबीची भिंत पाडून क्रीडा जगतात इतिहास रचला आहे.

'आवाज द व्हॉईस'चा नवा ध्यास
हीच गरज आणि विचार मनात ठेवून 'आवाज द व्हॉईस'च्या वतीने ओनिका माहेश्वरी एक खास नवी मालिका घेऊन येत आहेत. या विशेष मालिकेत आजवर अर्जुन पुरस्कार मिळवलेल्या मुस्लिम खेळाडूंच्या संघर्षाची आणि यशाची प्रेरणादायी 'एक कहाणी' मांडली जाईल.

समाजाचे आणि धार्मिक संस्थांचे लक्ष खेळाच्या मैदानाकडे वेधून घेणे, हाच या मालिकेचा मुख्य उद्देश आहे; जेणेकरून आपल्या नव्या पिढीला यशाचा आणि प्रगतीचा एक नवा, उज्वल रस्ता सापडेल.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter