सानिया बेगम : आसामच्या ६०० वर्षे जुन्या मोरिया समुदायातील पहिली महिला डॉक्टर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 19 h ago
डॉ. सानिया बेगम
डॉ. सानिया बेगम

 

आसाम राज्यामध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी आपली एमबीबीएसची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करून वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करतात. २०२६ या वर्षामध्ये डॉक्टर बनण्याच्या तयारीत असलेल्यांमध्ये मध्य आसामच्या नगाव जिल्ह्यातील कालियाबोर येथील एका अत्यंत हुशार तरुणीचा समावेश आहे. या तरुणीने आपल्या संपूर्ण समाजासाठी एक नवा इतिहास रचला आहे.

माजी लष्करी अधिकारी अल्हाज बदीरत अली आणि रुज्ना बेगम यांची कन्या सानिया बेगम ही आसाममधील स्थानिक आसामी मुस्लीम 'मोरिया' समुदायातील पहिली महिला डॉक्टर बनली आहे. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण आसाममधील मोरिया समुदायाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
 

कालियाबोर येथील मोरिया गाव (जैनतीपूर) येथील रहिवासी असलेल्या सानियाने यंदा दिब्रूगडच्या 'आसाम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल'मधून विशेष प्राविण्यासह आपली एमबीबीएसची पदवी पूर्ण केली. सध्या ती याच नामांकित संस्थेमध्ये आपली इंटर्नशिप पूर्ण करत आहे.

सानियाने आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कालियाबोर येथील 'शिशू विद्यापीठ कुवारीटोल' उच्च माध्यमिक विद्यालयातून केली. तिने दहावीची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली होती. त्यानंतर तिने उच्च माध्यमिक शिक्षणासाठी 'अजमल सुपर-४०' मध्ये प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने पहिल्याच प्रयत्नात 'नीट' परीक्षा उत्तीर्ण केली आणि दिब्रूगडच्या आसाम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.

पुढील वाटचाल आणि सामाजिक जाणीव
एका मुलाखती दरम्यान सानियाने तिच्या भविष्यातील योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. "सध्या माझी इंटर्नशिप सुरू आहे. यानंतर मला ग्रामीण भागात जाऊन एक वर्ष रुग्णांची सेवा करावी लागेल. त्यानंतर मी 'नीट-पीजी' परीक्षा देणार असून या परीक्षेतील गुणांच्या आधारेच मी पुढील शिक्षणासाठी वैद्यकीय शाखा निवडणार आहे," असे तिने सांगितले.

सानियाच्या या ऐतिहासिक कामगिरीचा आसाममधील मोरिया समुदायाच्या नागरिकांनी मोठा उत्सव साजरा केला आहे. तिला मिळालेल्या या अफाट प्रेमाबद्दल बोलताना ती म्हणाली, "विविध संस्था आणि संघटनांनी माझा विशेष सत्कार केला. स्थानिक लोकांनी माझ्यावर अपार प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला. आमच्या ६०० वर्षे जुन्या समाजातील पहिली महिला डॉक्टर असल्याचा मला मनापासून अभिमान वाटतो."

आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा सानियाचा दृढनिश्चय आहे. गरजू लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याची तिची इच्छा आहे. यासोबतच तिने आजच्या तरुण पिढीला एक मोलाचा संदेश दिला आहे.

"तरुण पिढीने आपले लक्ष केंद्रित ठेवल्यास आणि पूर्ण समर्पणाने काम केल्यास ती काहीही साध्य करू शकते. तरुणांनी कधीही आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नये. आमचा मोरिया समुदाय शिक्षण आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत अजूनही बराच मागे आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी अधिक प्रयत्न, दृढनिश्चय आणि जनजागृतीची मोठी गरज आहे," असे सानियाने स्पष्ट केले.

सानियाचे समर्पण, चिकाटी आणि कठोर कष्टाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिचे हे यश समाजासाठी एक अभिमानास्पद टप्पा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचा मोठा स्त्रोत असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

वडिलांनी व्यक्त केली कृतज्ञता
सानियाचे वडील अल्हाज बदीरत अली यांनी अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली आहे. "सर्वात आधी मी शिशू विद्यापीठ कुवारीटोल शाळेच्या शिक्षकांचे मनापासून आभार मानतो. माझ्या मुलीला योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी अजमल सुपर-४० च्या अधिकार्‍यांचे, विशेषतः एच. आझाद आणि प्रोजेक्ट हेड अब्दुल कादिर यांचा अत्यंत ऋणी आहे," असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "आमचा ६०० वर्षे जुना मोरिया समुदाय शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या अजूनही खूप मागासलेला आहे. अशा समाजातून पुढे येऊन माझ्या मुलीने पहिली महिला डॉक्टर बनणे हा माझ्यासाठी शब्दातीत आनंद आहे."
 

मूर्ती आणि धातूकामाचा ऐतिहासिक वारसा
मोरिया मुस्लिमांच्या इतिहासाबद्दल बोलताना बदीरत अली यांनी त्यांच्या समाजातील एका जुन्या मौखिक परंपरेचा संदर्भ दिला. या परंपरेनुसार, इसवी सन १५२७ मध्ये आसामवर मुघलांनी आक्रमण केले होते. त्यावेळी कालियाबोरमधील शिलघाट येथे मुघल आणि अहोम राज्यामध्ये मोठे युद्ध झाले. या लढाईत साधारण ९०० मुघल सैनिकांना बंदी बनवण्यात आले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना मायदेशी पाठवण्याऐवजी आसाममध्येच स्थायिक होण्याची परवानगी दिली गेली. आजचा मोरिया समुदाय हा त्याच स्थायिक लोकांचे वंशज असल्याचे मानले जाते.

स्थानिक परंपरेनुसार, पकडलेले हे बहुतांश पुरुष योद्धे नव्हते, तर ते कुशल तंत्रज्ञ आणि कारागीर होते. धातूकामातील त्यांच्या कौशल्यासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. यामध्ये पितळेची भांडी बनवणे, मशीद आणि मंदिरांसाठी आकर्षक कळस तयार करणे आणि इतर कल्पक कामांचा समावेश होता. आजही कालियाबोरमधील छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही मशिदींच्या छतावर मंदिर शैलीतील कळस पाहायला मिळतात. हा त्यांच्या अनोख्या ऐतिहासिक वारशाचा जिवंत पुरावा आहे.

आजच्या घडीला संपूर्ण आसाममध्ये मोरिया समुदाय जवळपास १२० गावांमध्ये पसरलेला असून त्यांची अंदाजे लोकसंख्या सुमारे ५ लाख आहे. त्यांचा इतिहास अत्यंत समृद्ध असला तरी या समाजातील साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. एकूण साक्षरता केवळ २ ते ३ टक्के असून महिला साक्षरतेचे प्रमाण साधारण फक्त १ टक्का आहे.

अशा अत्यंत आव्हानात्मक पार्श्वभूमीवर सानिया बेगमचे हे ऐतिहासिक यश आशेचा आणि प्रगतीचा एक मोठा किरण बनून समोर आले आहे. तिच्या या यशामुळे मोरिया समुदायातील असंख्य तरुण मुले आणि मुलींना शिक्षण घेण्याची आणि भविष्यात मोठ्या संधी शोधण्याची मोठी प्रेरणा मिळेल, यात शंका नाही.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter