ओनिका माहेश्वरी
बिहारच्या हाजीपूरमधील एका लेकीची गोष्ट सध्या सर्वांच्या हृदयाला भिडत आहे. ही गोष्ट संघर्षाची, स्वप्नांची आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या जिद्दीची आहे. सामान्य कुटुंब, मर्यादित साधने आणि गावचे वातावरण अशा परिस्थितीत वाढलेल्या या विद्यार्थिनीने आपल्या मेहनतीने संपूर्ण राज्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. तिचे हे यश केवळ एक यशोगाथा नसून कठीण परिस्थितीतही मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा आहे.
हाजीपूरमधून समोर आलेल्या या बातमीने केवळ वैशाली जिल्हाच नव्हे तर पूर्ण बिहारची मान अभिमानाने उंचावली आहे. वैशाली जिल्ह्यातील चेहरा कला प्रखंडातील छौराही या छोट्याशा गावातील शाबरीन परवीनने आपल्या शिस्तीच्या आणि मजबूत इच्छाशक्तीच्या जोरावर 'बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्ड'च्या (BSEB) २०२६ च्या मॅट्रिक परीक्षेत ४९२ गुण म्हणजेच ९८.४ टक्के मिळवून इतिहास रचला आहे.
शबरीनच्या या यशाने हे सिद्ध केले की, जर इरादे पक्के असतील आणि मेहनत प्रामाणिक असेल तर आर्थिक संकटे कधीही यशाचा मार्ग रोखू शकत नाहीत. तिने केवळ तिच्या कुटुंबाचेच नाही तर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. निकाल जाहीर होताच गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी मिठाई वाटून या सुवर्णक्षणाचा आनंद साजरा केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शबरीन म्हणाली, “मला ४९२ गुण मिळाले आहेत. मी शाळेत आणि यूट्यूबच्या मदतीने अभ्यास केला. माझ्या भावानेही मला अभ्यासात खूप मदत केली. माझे डॉक्टर बनण्याचे स्वप्न असून मी आता 'नीट'ची (NEET) तयारी करणार आहे.” तिचे हे बोल तिच्या भविष्यातील स्पष्ट ध्येयाची साक्ष देतात.
विशेष म्हणजे शबरीनने तिचे पूर्ण शिक्षण गावात राहूनच पूर्ण केले. आजच्या काळात चांगल्या शिक्षणासाठी लोक शहरांकडे धाव घेतात, पण शबरीनने दाखवून दिले की जिद्द असेल तर गावात राहूनही मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. तिने शाळेच्या अभ्यासासोबतच यूट्यूबसारख्या डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर केला.
तिचे वडील मोहम्मद सज्जाद आलम पश्चिम बंगालमधील रामपुरहाट येथे टायरचे छोटे दुकान चालवतात. त्या उत्पन्नातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परिस्थिती बेताची असूनही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. शबरीनची आई गृहिणी असून ती घराची जबाबदारी सांभाळून मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देते. तीन भावंडांमध्ये सर्वात मोठी असलेली शबरीन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती.
मुलीच्या या निकालानंतर पूर्ण कुटुंब आनंदात आहे. घरामध्ये शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाली आहे. कठीण परिस्थितीतही मुलीने कधी हार मानली नाही आणि सतत मेहनत घेतली, असे तिच्या वडिलांनी सांगितले. यावर्षी बिहार बोर्डाच्या परीक्षेत मुलींचा दबदबा दिसून आला. जमुई जिल्ह्यातील सिमुलतला येथील पुष्पांजली कुमारीने देखील ४९२ गुण मिळवून शाबरीनसोबत संयुक्तपणे राज्यात पहिले स्थान पटकावले आहे.
यावर्षी १५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १७६२ केंद्रांवर ही परीक्षा झाली. एकूण १२ लाख ३५ हजार ७४३ विद्यार्थी यशस्वी झाले असून राज्याचा निकाल ८१.७९% लागला आहे. बिहारचे शिक्षण मंत्री सुनील कुमार यांनी हा निकाल जाहीर केला. यावेळी बोर्डाचे अध्यक्ष आनंद किशोर देखील उपस्थित होते.
शबरीन परवीनचे यश हे केवळ तिचे वैयक्तिक यश नसून मर्यादित साधनांमध्ये स्वप्ने पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणा बनली आहे. तिची गोष्ट सांगते की जर लक्ष्य स्पष्ट असेल आणि आत्मविश्वास मजबूत असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. आज शाबरीन केवळ तिच्या कुटुंबाची शान नसून पूर्ण बिहारच्या मुलींसाठी एक आदर्श ठरली आहे.