'परवाझ' - राजकारणात उंच भरारी घेत बदल घडवणाऱ्या रणरागिणींच्या प्रेरणादायी कथा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
राजकारणातील महिला नेतृत्व
राजकारणातील महिला नेतृत्व

 

जेव्हा महिला राजकारणात पाऊल ठेवतात, तेव्हा त्या केवळ सत्तेची खुर्ची सांभाळत नाहीत. त्या धाडस, समाजसेवा आणि नेतृत्वाची एक नवी व्याख्या तयार करतात. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या विचारधारा आणि वेगवेगळ्या प्रदेशांमधून आलेल्या या महिलांनी जुन्या रूढी-परंपरांना जोरदार धक्का दिला आहे.

त्यांनी विरोधाचा खंबीरपणे सामना केला आणि आपल्या ठाम विश्वासावर आणि माणुसकीच्या जोरावर राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. 'आवाज द व्हॉईस'ची 'परवाझ' (Parwaaz) ही नवी मालिका राजकारणाच्या आखाड्यातून प्रेरणा देणाऱ्या अशाच महिलांच्या कथा एकत्र घेऊन आली आहे. या सर्वांचा प्रवास वेगळा असला, तरी त्यांचे ध्येय मात्र एकच आहे.

दरख्शां अंद्राबी (Darakhshan Andrabi)

दरख्शां अंद्राबी या काश्मीरमधील एक अत्यंत निडर आणि तडजोड न करणाऱ्या नेत्या आहेत. राजकारणातील खऱ्या धाडसाचे त्या उत्तम उदाहरण आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. तसेच त्या जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाच्या पहिल्या आणि एकमेव महिला अध्यक्षा आहेत.

कलम ३७० हटवल्यानंतर मार्च २०२२ मध्ये त्यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांचा राजकीय प्रवास तीन दशकांचा आहे. त्यांनी नेहमीच फुटीरतावादी विचारधारेला कडाडून विरोध केला आहे. वक्फ बोर्डात त्यांनी संगणकीकरण (Digitisation) आणि अनेक सुधारणा करून पारदर्शकता आणली.

प्रशासकीय कामाव्यतिरिक्त, संघर्षग्रस्त काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणे, महिला सक्षमीकरण आणि समाजकल्याणासाठी त्या नेहमीच पुढाकार घेतात. अंद्राबी या उत्तम कवयित्री, प्राध्यापिका आणि माजी संपादिकाही आहेत. काश्मिरी आणि उर्दू साहित्यात त्यांनी दिलेले योगदान त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणखी समृद्ध करते.

डॉ. समीना बेगम (Dr Sameena Begum)

डॉ. समीना बेगम या समाजसेवेवर आधारित शांत आणि कृतीशील नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्या 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) च्या वरिष्ठ नेत्या असून, हैदराबादमधील कुर्मगुडा विभागाच्या नगरसेविका आहेत. एका बाजूला त्या राजकारणात तळागाळातील लोकांसाठी काम करतात, तर दुसऱ्या बाजूला त्या एक डॉक्टर आणि उद्योजिका म्हणूनही आपली जबाबदारी तितक्याच लिलया पार पाडतात.

त्या 'समीना ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स'च्या संस्थापिका आहेत. त्यांनी एका साध्या प्रसूतिगृहाचे रूपांतर एका विश्वासार्ह मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयात केले आहे. सोबतच त्या शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठीही मोठी गुंतवणूक करत आहेत.

कोविड-१९ च्या काळात त्यांनी आघाडीवर राहून काम केले. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणे, यामुळे त्यांनी लोकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. तत्त्वनिष्ठ राजकारणामुळे समाजाचे कसे भले होऊ शकते, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.

इक्रा हसन (Iqra Hasan)

इक्रा हसन या राजकारणातील नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात कुटुंबाकडून मिळालेला राजकीय वारसा, उत्तम तयारी आणि आजच्या काळातील दृष्टिकोन यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. त्या एका राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील मुनव्वर हसन हे पश्चिम उत्तर प्रदेशातील कैरानामधून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाज आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी हे सर्व त्यांनी अगदी जवळून पाहिले आहे.

पण त्यांचा राजकीय प्रवास केवळ कुटुंबाच्या पुण्याईवर आधारित नाही, तर तो त्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि अभ्यासाने घडवला आहे. त्यांनी भारतात आणि परदेशात कायद्याचे शिक्षण घेतले आहे. संविधानाची मूल्ये आणि नागरिकांच्या हक्कांची पक्की जाण घेऊनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

शेतीचे प्रश्न, बेरोजगारी आणि जाती-धर्मावर आधारित राजकारण अशा आव्हानात्मक परिस्थितीत त्या काम करत आहेत. त्यांचे वय आणि अनुभवावर सुरुवातीला अनेकांनी शंका घेतली. पण त्यांनी आक्रमक भाषणे देण्याऐवजी, तळागाळातील लोकांमध्ये मिसळून काम करण्याला पसंती दिली.

संसदेतील एक तरुण मुस्लिम महिला म्हणून त्या अतिशय शांतपणे जुन्या धारणा मोडून काढत आहेत. शिक्षण, रोजगार, शेतकऱ्यांचे कल्याण आणि लोकशाही हक्क यांसारख्या मुद्द्यांवर त्यांचे मुख्य लक्ष आहे. त्यांचा राजकीय प्रवास एका बाजूला कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेतो, तर दुसऱ्या बाजूला नव्या पिढीच्या अपेक्षाही पूर्ण करतो. वारशापेक्षा समज, तयारी आणि ध्येय यावरच खरे नेतृत्व उभे राहते, हे त्यांच्या प्रवासातून स्पष्ट होते.

कौसर जहाँ (Kausar Jahan)

कौसर जहाँ यांचा राजकीय प्रवास वैयक्तिक नुकसान आणि समाजसेवेच्या ध्यासातून तयार झालेल्या त्यांच्या खंबीरपणाचे दर्शन घडवतो. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्या दिल्ली हज समितीच्या केवळ दुसऱ्या महिला अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. त्यांच्या कामात प्रशासकीय निर्णयक्षमता आणि लोकांबद्दलची सहानुभूती यांचा सुरेख मेळ दिसतो.

कोविडच्या काळात त्यांनी आपले आई-वडील गमावले. परदेशात जाण्याची संधी असूनही त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय, समाजसेवा आणि 'संपूर्ण'सारख्या उपक्रमांद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या नेहमीच झटत आहेत.

सध्या त्या भारतीय जनता पक्षासोबत काम करत आहेत. त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन, मनमिळाऊ स्वभाव आणि प्रबळ राष्ट्रीय विचार त्यांना सामाजिक सलोखा आणि सेवेला वाहिलेली नव्या पिढीची नेत्या बनवतात.

मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti)

जम्मू-काश्मीरच्या अशांत राजकीय वातावरणातील मेहबुबा मुफ्ती या एक अत्यंत महत्त्वाच्या नेत्या आहेत. दहशतवाद जेव्हा शिगेला पोहोचला होता आणि मुख्य प्रवाहातील राजकारणच धोक्यात आले होते, तेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९६ मध्ये त्यांनी सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवले. पुढे जाऊन त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यांनी २०१६ ते २०१८ या काळात मुख्यमंत्रिपद भूषवले.

त्या 'पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी'च्या (PDP) सह-संस्थापिका आहेत. आघाडी सरकारे, संसदेतील भूमिका आणि सातत्याने मांडलेली भूमिका यातून त्यांनी काश्मीरचे प्रादेशिक राजकारण घडवले. कलम ३७० हटवल्यानंतर त्यांना नजरकैदेत राहावे लागले आणि अलीकडच्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला. तरीही, काश्मीरच्या आजच्या राजकारणात मेहबुबा मुफ्ती या एक अत्यंत खंबीर आणि प्रभावशाली नेत्या राहिल्या आहेत.

मुमताज थाहा (Mumtaz Thaha)

मुमताज थाहा यांनी त्रिशूर महानगरपालिकेच्या पहिल्या मुस्लिम महिला नगरसेविका बनून इतिहास रचला आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून कन्नानकुलंगरा वॉर्डातून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे हा बहुल हिंदू वॉर्ड आहे.

त्यांची स्थानिक लोकांशी अत्यंत घट्ट नाळ जोडलेली आहे. लोकांमध्ये सातत्याने मिसळून त्यांनी हा विश्वास कमावला आहे. त्यांनी स्वतःची धार्मिक ओळख पुढे करण्याऐवजी स्वतःला वॉर्डाची कन्या म्हणून समोर आणले.

जे. जयललिता यांच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या मुमताज थाहा आता स्थानिक प्रशासन, महिलांचे शिक्षण आणि अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करत आहेत. चिकाटी आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या धोरणातून एक नवे आणि मुळांशी जोडलेले नेतृत्व उदयास आले आहे.

सायरा शाह हलीम (Sayra Shah Halim)

सायरा शाह हलीम या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि विचारवंत आहेत. आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकशाही हक्क या सर्व क्षेत्रांना जोडण्याचे काम त्या करतात. कॉर्पोरेट क्षेत्रात दीर्घकाळ काम केल्यानंतर त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतले. 'कोलकाता हेल्थ संकल्प'सारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी गरीब रुग्णांना अत्यंत माफक दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली.

साहित्यिक मंचाच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक संवादालाही प्रोत्साहन दिले. २०२२ मध्ये त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) उमेदवार म्हणून निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. कोलकात्यात डाव्या पक्षांचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. २०२४ मध्ये आलेले त्यांचे 'कॉम्रेड्स अँड कमबॅक्स' (Comrades and Comebacks) हे पुस्तक लोकाभिमुख, सर्वसमावेशक आणि सामाजिक न्यायावर आधारित राजकारणाचा त्यांचा दृष्टिकोन मांडते.

शमा मोहम्मद (Shama Mohammad)

शमा मोहम्मद यांचा राजकीय प्रवास पितृसत्ताक पद्धती, धार्मिक पूर्वग्रह आणि कोणताही घराणेशाहीचा वारसा नसताना मिळवलेल्या यशाची कहाणी आहे. त्या एक माजी दंतचिकित्सक (Dentist) आणि पत्रकार आहेत. राजकारणावर केवळ बाहेरून भाष्य करण्यापेक्षा, व्यवस्थेतील बदलाचा एक भाग होण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्त्या असून, केरळमध्ये तळागाळातील कार्यकर्त्या म्हणून काम करतात. त्यांनी महिलांचे प्रतिनिधित्व आणि अल्पसंख्याकांना सामावून घेण्याचे मुद्दे सातत्याने लावून धरले आहेत. 'झोया चॅरिटेबल ट्रस्ट'च्या माध्यमातून त्या शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करतात. समाजसेवा ही केवळ राजकीय पक्षांच्या व्यासपीठापुरती मर्यादित असू नये, हा त्यांचा विश्वास त्यांच्या कामातून दिसून येतो.

सोफिया फिरदोस (Sofia Firdaus)

२०२४ च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत अचानक राजकारणात प्रवेश करून सोफिया फिरदोस या भारतातील मोजक्या मुस्लिम महिला आमदारांपैकी एक बनल्या. बाराबती कटक मतदारसंघातून त्यांना अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली. या मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या अतिशय नगण्य असूनही त्यांनी मोठा विजय मिळवला.

रिअल इस्टेट व्यवसायातून सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर, त्यांनी कटकचे आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व पुन्हा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. चांदीच्या नाजूक दागिन्यांच्या (Silver Filigree) उद्योगाला पाठिंबा देणे, तसेच शिक्षण आणि विशेषतः महिलांच्या रोजगाराला प्राधान्य देणे, हे त्यांचे ध्येय आहे. त्यांचा हा विजय म्हणजे सर्वच समुदायांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाची पोचपावती आहे.

जाहिदा खान (Zahida Khan)

जाहिदा खान या मेवातच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाच्या नेत्या असून, त्या या भागातील पहिल्या महिला आमदार आहेत. वकिलीच्या यशस्वी व्यवसायातून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. शिक्षण आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर आधारित समाजसुधारणेचा त्यांच्या कुटुंबाचा तीन पिढ्यांचा वारसा त्यांनी पुढे चालवला आहे.

त्या दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी राजस्थानच्या शिक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांनी मुलींचे शिक्षण, सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक विकासाला प्राधान्य दिले. त्यांचा प्रवास सेवेवर आधारित तत्त्वनिष्ठ राजकारणाचे दर्शन घडवतो. यामुळे केवळ महिलाच नाही, तर संपूर्ण समाज सन्मान आणि प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी प्रेरित होतो.

या सर्व महिला 'परवाझ'च्या कणा आहेत. जेव्हा राजकारण धाडस आणि सद्सद्विवेकबुद्धीने केले जाते, तेव्हा ते प्रेरणा आणि बदलाचे एक अत्यंत शक्तिशाली साधन बनू शकते, हेच या कर्तृत्ववान महिलांनी सिद्ध केले आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter