बांगलादेशात पुन्हा एकदा 'मॉब लिंचिंग'चा थरार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मयमनसिंह जिल्ह्यात जमावाकडून एका हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणी मागायला आल्याचा आरोप करत जमावाने या तरुणाला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा हिंदू समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृताचे नाव दिपू दास असून तो २५ वर्षांचा होता. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मयमनसिंह शहरातील आकुआ भागात घडली. दिपू आणि त्याचे काही साथीदार एका दुकानात आले होते. त्यावेळी त्यांनी दुकानदाराकडे पैशांची मागणी केली. दुकानदाराने आरडाओरडा करताच आजूबाजूचे लोक तिथे जमले. जमावाने दिपूला पकडले, मात्र त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. संतप्त जमावाने दिपूला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू ओढवला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवले आणि मृतदेह ताब्यात घेतला. दिपूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मयमनसिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. दिपू हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, असा दावा काही स्थानिकांनी केला आहे. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मात्र, जमावाकडून कायदा हातात घेऊन अशा प्रकारे हत्या करण्याच्या प्रकारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बांगलादेशात सत्तांतरानंतर अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचारात वाढ झाली आहे. दिपू दास याच्या हत्येपूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. जमावाकडून होणारा हा हिंसाचार (मॉब लिंचिंग) रोखण्याचे मोठे आव्हान अंतरिम सरकारसमोर उभे राहिले आहे.