बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमल
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमल

 

बांगलादेशच्या 'आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने' (ICT-1) सोमवारी (१७ नोव्हेंबर २०२५) एका ऐतिहासिक निकालात, माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमल यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान 'नरसंहार' (genocide) आणि 'मानवताविरोधी गुन्हे' (crimes against humanity) केल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

याच खटल्यात, माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-ममुन, जे माफीचे साक्षीदार (approver) बनले होते आणि त्यांनी माजी पंतप्रधानांविरुद्ध साक्ष दिली होती, त्यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

"शेख हसीना यांनी माणुसकीविरुद्ध गुन्हे केले आहेत. ५ ऑगस्ट रोजी चनखारपूल येथे ६ आंदोलकांना प्राणघातक शस्त्रांनी मारले गेले... हे हत्याकांड पंतप्रधान शेख हसीना यांच्या आदेशाने आणि पूर्ण माहितीनिशी झाले," असे लवादाने म्हटले आहे.

शेख हसीना यांना माणुसकीविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी जन्मठेप आणि अनेक लोकांच्या हत्येतील भूमिकेसाठी स्वतंत्रपणे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने शेख हसीना आणि असदुज्जमान खान यांची मालमत्ता जप्त करून ती सरकारच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती मो. गोलम मोर्तुझा मोजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय लवादाने ४५३ पानांच्या निकालाचा सारांश वाचून दाखवला. यावेळी शेख हसीना आणि कमल न्यायालयात उपस्थित नव्हते, कारण ते फरार आहेत.

शेख हसीना यांची प्रतिक्रिया

सध्या भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांनी हा निकाल फेटाळला आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे, "माझ्याविरुद्ध दिलेला निकाल हा एका लोकशाही जनादेश नसलेल्या, बिनविरोध सरकारने स्थापन केलेल्या लवादाने दिला आहे. हे निकाल पक्षपाती आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत."

बांगलादेशात तणाव आणि हाय अलर्ट

निकालाच्या पार्श्वभूमीवर ढाका शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस आणि रॅपिड ॲक्शन बटालियनचे जवान तैनात आहेत. ढाका पोलीस आयुक्तांनी जाळपोळ किंवा स्फोट घडवणाऱ्यांवर 'शूट-ॲट-साईट'चे आदेश दिले आहेत.

अवामी लीगने पुकारलेल्या दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी क्रूड बॉम्बचे स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

भारताची प्रतिक्रिया

भारताने या निकालावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, "भारताने बांगलादेशच्या 'आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने' माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत जाहीर केलेल्या निकालाची नोंद घेतली आहे. जवळचा शेजारी म्हणून, भारत बांगलादेशातील लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी, ज्यात शांतता, लोकशाही, सर्वसमावेशकता आणि स्थिरता यांचा समावेश आहे, कटिबद्ध आहे."

युनूस सरकारचे आवाहन

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या निकालाला ऐतिहासिक म्हटले आहे आणि जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची अराजकता खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही सरकारने दिला आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter