BANGLADESH FLOODS: बांगलादेशात पुराचा भीषण विळखा: ४४ जणांचा मृत्यू, ढाका शहरात जनजीवन विस्कळीत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 19 h ago
बांगलादेशात पुराचा हाहाकार
बांगलादेशात पुराचा हाहाकार

 

ढाका

बांगलादेशमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरामुळे आणि दरड कोसळल्यामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे २.५ लाखांहून अधिक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. पुराची तीव्रता पाहता, सरकारने मदत आणि बचावकार्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांना तैनात केले आहे.

ढाका शहराला पुराचा फटका

रविवारी पहाटे सहा तासांत ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने राजधानी ढाका शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून, रस्ते जलमय झाल्याने वाहनांची ये-जा बंद झाली आहे. पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, तर अनेक आरोग्य केंद्रेही जलमय झाल्यामुळे रुग्णांना वैद्यकीय मदत मिळणे कठीण झाले आहे.

परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता

आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलैपासून आतापर्यंत पुराशी संबंधित घटनांमध्ये ४४ मृत्यूंची अधिकृत नोंद झाली आहे. बहुतांश मृत्यू हे दरड कोसळल्यामुळे किंवा पुरात वाहून गेल्यामुळे झाले आहेत. बांगलादेशातील विविध भागात ४४,००० हून अधिक नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ ते ४८ तासांत उत्तर-पूर्व सिलहेट, उत्तर-पश्चिम रंगपूर आणि उत्तरी मयमनसिंह विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, भारत आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागांतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. ब्रह्मपुत्रा आणि मेघना खोऱ्यातील नद्यांच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नजीकच्या काळात सखल भागांतील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.