भारत-चीन सीमावादावर तोडगा निघणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 11 h ago
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि  चीनी समपदस्थ अॅडमिरल डोंग जुन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनी समपदस्थ अॅडमिरल डोंग जुन

 

भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद हा गेल्या अनेक दशकांपासूनचा प्रश्न आहे. दोन दिवसांपूर्वी शांघाय सहकार्य संघटने (SCO)च्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनी समपदस्थ अॅडमिरल डोंग जुन यांच्याशी चर्चा केली. या भेटीत त्यांनी सीमावाद सोडवण्यासाठी चार मुद्द्यांवर चर्चा केली. या दोन्ही नेत्यांची भेट किंगदाओ येथे झाली. ऑक्टोबर २०२४ मध्ये डेमचोक आणि देपसांग येथे सैन्य माघारीनंतरची ही पहिली उच्चस्तरीय लष्करी चर्चा होती. या बैठकीत दोन्ही देशांनी तणाव कमी करणे, सीमा व्यवस्थापन आणि सीमेची कायमस्वरूपी हद्द निश्चित करण्यावर भर दिला.

भारताने मांडलेले चार मुद्दे 

  • ऑक्टोबर २०२४ च्या कराराची अंमलबजावणी : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या सैन्य माघारीच्या कराराची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विशेषत: पूर्व लडाखमधील डेमचोक आणि देपसांग यांसारख्या उर्वरित तणावग्रस्त ठिकाणांवर हा करार लागू करावा, असे भारताचे म्हणणे आहे.

  •  तणाव कमी करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न : राजनाथ सिंह यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोन्ही देशांनी सतर्क राहावे.

  •  सीमेची हद्द निश्चित करणे : सीमेची स्पष्ट हद्द निश्चित करण्यासाठी तातडीने चर्चा व्हावी, अशी भारताची मागणी आहे. यासाठी विद्यमान यंत्रणांचा वापर करून सीमा व्यवस्थापन आणि हद्द निश्चितीला गती द्यावी. 

  •  विश्वासाची कमतरता दूर करणे : २०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील विश्वास कमी झाला आहे. हा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. 

बैठकीचे महत्त्व आणि पार्श्वभूमी
ही भेट भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा होत असताना झाली आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. या चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाले होते, तर चीनलाही मोठी हानी सहन करावी लागली होती. त्यानंतर चार वर्षे चाललेल्या सैन्य तणावानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये डेमचोक आणि देपसांग येथे सैन्य माघारीचा करार झाला. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होण्याच्या दिशेने पावले पडू लागली. राजनाथ सिंह यांनी या भेटीत कैलास मानसरोवर यात्रेची पुनरुज्जन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.   

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter