NEPAL FLOOD: जलविद्युत प्रकल्पांना पुराचा मोठा फटका, शेकडो कामगार बोगद्यात अडकल्याची भीती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 39 m ago
नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पांच्या सुरुंग आणि सुरुंगमार्गाजवळ अडकलेल्या कामगारांचा शोध घेताना बचाव पथक
नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पांच्या सुरुंग आणि सुरुंगमार्गाजवळ अडकलेल्या कामगारांचा शोध घेताना बचाव पथक

 

नुवाकोट 

नेपाळमध्ये झालेल्या भीषण महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर, विविध जलविद्युत प्रकल्पांच्या परिसरातील ९३३ कामगार आणि कर्मचारी २६ ऑगस्टपासून संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे. यातील अनेक कामगार प्रकल्पांच्या सुरुंगात (Tunnels) अडकल्याची भीती वर्तवली जात असून, त्यांच्या रक्षणासाठी भारत आणि चीनच्या तज्ज्ञ पथकांच्या मदतीने बचावकार्य अत्यंत तीव्र करण्यात आले आहे.

नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागातील जलविद्युत प्रकल्पांमधून ९३३ जण बेपत्ता आहेत. त्यापैकी ६०० हून अधिक जण बोगद्यांमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, विविध सुरुंगांमधून आतापर्यंत २७९ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. अप्पर त्रिशुली-१ प्रकल्पातील ५०० हून अधिक कर्मचारी अद्याप संपर्कात नसून, त्यातील सुमारे ४०० जण बोगद्यात असल्याचे मानले जात आहे. रसुवागढी, लांगटांग खोला, त्रिशुली आणि चिलिमे प्रकल्पांच्या ठिकाणीही कामगारांचा शोध घेण्यासाठी लष्कराने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

लष्कराकडून बोगदा उघडण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

नुवाकोट येथील अप्पर त्रिशुली-३A प्रकल्पाच्या सुरुंगामध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रविवारी नेपाळी सैनिकांच्या अभियांत्रिकी पथकाने भारी यंत्रसामग्री आणि स्फोटकांचा (Blasting) वापर करून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न तीव्र केले. प्रधानमंत्री कार्यालयाच्या अपडेटनुसार, ६६ लष्करी जवानांचे विशेष पथक, श्वानपथक आणि सशस्त्र पोलीस दल संयुक्तपणे या बचावकार्यात सहभागी झाले आहे. हेलिकॉप्टरद्वारे जड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचवण्यात आली असून, बोगद्याच्या तोंडाचा भाग शोधून अंदर गेलेल्या कामगारांचा शोध घेतला जात आहे.