आसाम आणि ईशान्य भारताचे मुस्लिम चेंजमेकर्स : समाज परिवर्तनाचे प्रेरक चेहरे

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 7 d ago
आसाम आणि ईशान्य भारताचे मुस्लिम चेंजमेकर्स
आसाम आणि ईशान्य भारताचे मुस्लिम चेंजमेकर्स

 

 

धावपळीच्या आयुष्यात काही माणसं शांतपणे, सातत्याने आणि खंबीरपणे समाजात सकारात्मक बदल घडवतात. प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या समुदायाच्या भल्यासाठी स्वतःला वाहून घेणारी ही माणसं आपल्या कृतीतून, मूल्यांतून जगाला उज्ज्वल भविष्याची स्वप्नं दाखवतात.

अशाच व्यक्तींची आणि त्यांच्या कार्याची ओळख ‘आवाज द व्हॉइस’च्या ‘चेंजमेकर्स’ मालिकेतून करण्यात देऊन येत आहे. पहिल्या टप्प्यात आपण उतर प्रदेशातील दहा मुस्लीम चेंजमेकर्सचे कार्य आणि कर्तृत्व जाणून घेतले. आज रविवारपासून ‘आवाज’वर आसाम आणि ईशान्य भारतातील अशा १० मुस्लिम चेंजमेकर्सच्या यशोगाथा प्रसिद्ध होणार आहेत. शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक सौहार्द आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत असणाऱ्याया व्यक्तींचे समर्पण आणि नवकल्पना लाखो भारतीयांनाप्रेरणा देणाऱ्या आहेत. सलग दहा दिवस प्रसिद्ध होणाऱ्या या दहा चेंजमेकर्सविषयी थोडक्यात...

१. आबिद आझाद

गुवाहाटीतील युवा बँक व्यावसायिक. आरामदायी कार्यालयात बसण्याऐवजी आसामच्या विविध भागांत फिरून भुकेल्यांना अन्न वाटतात. कोविड-१९ आणि लॉकडाउनच्या काळापासून आबिद रस्त्यावर, रुग्णालयात आणि गरजूंना मोफत जेवण पुरवत आहेत. गौहाटी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय परिसरात संध्याकाळी आणि मध्यरात्री वाटलं जाणारं अन्न मुस्लिमांसाठी इफ्तार आणि सेहरी, तर हिंदू आणि इतर धर्मीयांसाठी स्वादिष्ट भोजन ठरतं. त्यांचं हे कार्य सर्वधर्मीय सौहार्दाचा संदेश देतं.

अहमद अली

दक्षिण आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील गावात राहणारे अशिक्षित रिक्षाचालक. अहमद अली यांनी आपल्या रिक्षा चालवण्याच्या कमाईतून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि दक्षिण आसाममध्ये नऊ शाळा उभारल्या.स्वतः शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अहमद यांना आपल्या समाजात कोणीही निरक्षर राहू नये, ही इच्छा होती. त्यांच्या या असामान्य कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात घेतली. यंदा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारत सरकारने त्यांना दिल्लीत विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केलं, जिथे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं .

नझरुल हक

आसाम गौरव पुरस्काराने सन्मानित मासेपालन उद्योजक. नझरुल यांनी फक्त १०,००० रुपयांपासून आपला उद्योजकीय प्रवास सुरू केला. अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी अनेक मत्स्यपालन केंद्रं उभारली. त्यांच्या समर्पणाने आसामच्या मत्स्यपालन क्षेत्राला बळकटी मिळाली आणि शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचं कार्य आसामच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवं बळ देतं.

नबाब अली

आसामचे क्रिकेट विश्वातील ‘द्रोणाचार्य’. नबाब यांनी माजी आसाम रणजी कर्णधार पराग दास यांना घडवलं आणि त्यांचा मुलगा रियान पराग याला भारताच्या क्रिकेट संघात स्थान मिळवून देणारा पहिला आसामी खेळाडू बनवलं. क्रिकेट विश्वात ‘नबाबदा’ म्हणून प्रेमाने ओळखले जाणारे नबाब अली यांनी आपल्या छोट्या क्रिकेट कारकीर्दीत शतकं, अर्धशतकं कदाचित न झळकावली, पण प्रशिक्षक म्हणून त्यांनी आसाम आणि भारतासाठी दर्जेदार क्रिकेटपटूंची फौज तयार केली.

डॉ. मुस्तफा ए. बारभुयाँ

दक्षिण आसामच्या हायलाकांडी जिल्ह्यातील दुर्गम गावातून आलेले पॅथॉलॉजी तज्ज्ञ. २०२५ मध्ये अमेरिकेत पॅथॉलॉजी क्षेत्रातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे, त्यांना ‘टॉप २० हिरोज ऑफ पॅथॉलॉजी’ यादीत स्थान मिळालं. त्यांचं कार्य वैद्यकीय क्षेत्रात आसामसाठी अभिमानास्पद आहे.

सय्यदुल्ला नोंग्रम

मेघालयातील खासी मुस्लिमांचा आवाज आणि समुदायांमधील सेतू. शिलॉंग येथे त्यांनी भारतातील पहिली आणि आशियातील पहिली काचेची मस्जिद, मदीना मस्जिद उभारली. ही भव्य रचना केवळ प्रार्थनास्थळ नाही, तर यात इस्लामी शिक्षण केंद्र, गरजू मुलांसाठी शाळा आणि विज्ञान, कला, तंत्रज्ञानाच्या आधुनिक सुविधांसह उच्च शिक्षणाचं महाविद्यालय आहे. ही मस्जिद भारतातील तिसऱ्या देशातील काचेची मस्जिद आहे .

अर्शेल अख्तर

गुवाहाटीचे पहिले ‘सायकल मेयर’. आयटी शिक्षण, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बँकिंग आणि शेअर गुंतवणूक अशा विविध क्षेत्रांत काम केल्यानंतर, २०१८ मध्ये अर्शेल यांना गुवाहाटीचे ‘सायकल मेयर’ म्हणून नियुक्त करण्यात आलं. ‘पेडल फॉर अ चेंज’ आणि ‘द ग्रीन लेन फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांमधून ते सायकलिंगला प्रोत्साहन देतात. त्यांनी ‘सायकल कौन्सिलर्स ऑफ गुवाहाटी’ नावाचा सक्रिय नागरिक गट स्थापन केला, जो सायकलिंगला सुरक्षित, सर्वसमावेशक आणि आकांक्षी वाहतूक माध्यम बनवण्यासाठी कार्यरत आहे.

नाहिद आफ्रिन

२०१५ च्या इंडियन आयडॉल ज्युनियरची उपविजेती. २०१६ मध्ये सोनाक्षी सिन्हा अभिनीत ‘अकिरा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पार्श्वगायिका म्हणून पदार्पण. २०२४ मध्ये युनिसेफ इंडियाने नाहिद यांना युवा समर्थक म्हणून नियुक्त केलं. करीना कपूर-खानसह तीन अन्य युवा समर्थकांसोबत त्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देत आहेत.

मौलाना नुरूल अमिन कासिमी

समाजात इस्लामबद्दल असलेले गैरसमज दूर करणारे धर्मगुरू. इस्लामची खरी तत्त्वं आणि आदर्श असामान्य विचारांनी स्पष्ट करतात. त्यांचा संदेश सौहार्द आणि समजूतदारपणाचा आहे, जो समाजाला एकत्र बांधतो.

डॉ. अन्वरुद्दीन चौधरी

‘आसामचा बर्डमॅन’ म्हणून ओळखले जाणारे माजी आयएएस अधिकारी. पक्षी संवर्धनासाठी २८ पुस्तके, ५० तांत्रिक अहवाल आणि ९००हून अधिक लेख, वैज्ञानिक पेपर लिहिले. ईशान्य भारतातील पक्ष्यांवरील त्यांच्या अभ्यासाने संवर्धन आणि जागरूकतेला चालना दिली. २००३ मध्ये पांढऱ्या पंखांचा कस्तुरी बदक आसामचा राज्यपक्षी घोषित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

तर उद्या सोमवार पासून जाणून घेऊया ईशान्य भारत आणि आसाममधील या प्रेरणादायी मुस्लीम चेंजमेकर्सविषयी