पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतदारांनी एक नवा इतिहास रचला आहे. राज्यात दोन टप्प्यांत मिळून तब्बल ९२.४७ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राज्यातील हा सर्वात मोठा मतदानाचा आकडा आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.
राज्यात २३ एप्रिलला पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी पावणेआठ वाजेपर्यंत ९१.६६ टक्के मतदान नोंदवले गेले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दोन्ही टप्प्यांची मिळून एकूण मतदानाची टक्केवारी ९२.४७ वर पोहोचली आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण ६.८१ कोटी मतदार आहेत.
याआधी पश्चिम बंगालमध्ये २०११ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ८४.७२ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदारांनी हा विक्रम मोठ्या फरकाने मोडला आहे. संपूर्ण देशाचा विचार केल्यास २०१३ मध्ये त्रिपुरा विधानसभेत सर्वाधिक ९३.६१ टक्के मतदान झाले होते. हा विक्रम अद्याप अबाधित आहे.
मतदानाच्या या ऐतिहासिक आकडेवारीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. स्वातंत्र्यानंतर राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याबद्दल निवडणूक आयोग पश्चिम बंगालमधील प्रत्येक मतदाराला सॅल्युट करत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे या निवडणुकीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. दुसऱ्या टप्प्यात ९१.०७ टक्के पुरुषांच्या तुलनेत ९२.२८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यातही ९०.९२ टक्के पुरुषांच्या तुलनेत ९२.६९ टक्के महिला मतदानासाठी घराबाहेर पडल्या होत्या.
पश्चिम बंगालसोबतच देशातील इतर राज्यांतही मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. ९ एप्रिल रोजी आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये अनुक्रमे ८५.३८ टक्के आणि ८९.८३ टक्के मतदान झाले. या दोन्ही राज्यांनी आपले जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
तमिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. तिथे ५.७३ कोटी मतदार आहेत. तिथेही पुरुषांच्या (८३.५७ टक्के) तुलनेत महिलांचे (८५.७६ टक्के) मतदान अधिक राहिले. तमिळनाडूमध्ये २०११ मध्ये सर्वाधिक ७८.२९ टक्के मतदान झाले होते. पश्चिम बंगालमध्ये त्याच दिवशी १५२ जागांसाठी मतदान पार पडले आणि तिथे ३.६ कोटी मतदार होते.
पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि आसाम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.