डॉ. कशिश अझीझ
ओनिका माहेश्वरी
कठीण परिस्थितीपुढे हार न मानणे, शिक्षणाची कास धरणे आणि व्यावसायिक यश मिळवत समाजासाठी काहीतरी करून दाखवणे... या सगळ्या गोष्टींची उत्तम प्रचिती डॉ. कशिश अझीझ यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिल्यावर येते.
डॉ. कशिश अझीझ यांनी केवळ वैयक्तिक यश मिळवले नाही, तर भारतीय औषध निर्माण क्षेत्रात (फार्मा उद्योग) महिलांच्या नेतृत्वाचा एक नवा वस्तुपाठ तयार केला आहे.
१९८७ मध्ये दिल्लीत एका पंजाबी मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेल्या डॉ. कशिश सध्या 'युनिक्युअर इंडिया लिमिटेड' कंपनीत गुणवत्ता (QA/QC) विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. औषध निर्माण क्षेत्राचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांचे आरोग्य जपणे. यासाठी संपूर्ण व्यवस्थेने सतत सुधारणा करत काम केले पाहिजे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
त्या नेहमी एक गोष्ट आवर्जून सांगतात की,"गुणवत्ता ही कधीच योगायोगाने मिळत नाही. त्यासाठी उच्च विचार, प्रामाणिक प्रयत्न, योग्य दिशा आणि अचूक कामाची गरज असते."
"काम मनापासून करा, नाहीतर मार्ग मोकळा आहे!"
आपल्या टीमसोबत काम करताना त्या शिस्तीला खूप महत्त्व देतात. "गुणवत्ता सांभाळा, नाहीतर काम सोडा!" असा त्यांचा थेट संदेश असतो. त्या या गोष्टीला केवळ नोकरी न मानता एक नैतिक कर्तव्य मानतात.
त्यांच्या मते, "एक सशक्त घोडाच मजबूत गाडी ओढू शकतो," म्हणजेच कंपनीचे यश तिथल्या शिस्त आणि गुणवत्तेवरच अवलंबून असते.
पारंपरिक चौकटी मोडून काढलेला मार्ग
त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगताना डॉ. कशिश म्हणाल्या की, त्या एका पारंपरिक पंजाबी मुस्लिम कुटुंबातून येतात. जिथे मुलींनी बाहेर पडून काम करणे सहजासहजी स्वीकारले जात नव्हते आणि कमी वयात लग्नाचा विचार केला जायचा. अशा वातावरणात शिक्षण पूर्ण करणे अन् स्वतःची ओळख निर्माण करणे खूप मोठे आव्हान होते. पण आत्मविश्वास अन् सततच्या मेहनतीमुळे त्या पुढे जात राहिल्या.
त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून २००४ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी जामिया हमदर्द विद्यापीठातून बी.फार्म केले. पुढे एम.फार्म (क्वालिटी एश्युरन्स) पूर्ण करताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाचे तत्कालीन राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्यांना गौरवण्यात आले!
त्यानंतर त्यांनी पीएचडी पूर्ण केली अन् त्यांना विज्ञान-तंत्रज्ञान विभागाची 'इन्स्पायर फेलोशिप' मिळाली. सध्या त्या आयआयएम लखनऊ येथून एमबीए करत आहेत. त्यासोबतच FOPIE युवा विभागाच्या सचिव आणि IDMA च्या सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
२० व्या वर्षी लग्न, २१ व्या वर्षी आई अन् शिक्षणाची धडपड
२००७ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्यांचे लग्न झाले अन् २१ व्या वर्षी त्या पहिल्यांदा आई झाल्या. तरीही त्यांनी मास्टर्सचे शिक्षण थांबवले नाही. सुरुवातीला सासरच्या मंडळींपासून ही गोष्ट काहीशी बाजूला ठेवून त्यांनी अभ्यास सुरू ठेवला.
जेव्हा ही गोष्ट समोर आली, तेव्हा कुटुंबात तणाव निर्माण झाला. पण अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी परीक्षा दिल्या. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आईने मुलाची काळजी घेण्यासाठी मोठी साथ दिली, तर वडिलांनी नेहमीच पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन पाठिंबा दिला. म्हणूनच आपल्या यशाचे श्रेय त्या मुख्यत्वे वडिलांना देतात.
मुलाचे आजारपण अन् समाजकारणाची प्रेरणा
आयुष्यात एक भावनिक वळण तेव्हा आले, जेव्हा त्यांच्या धाकट्या मुलाला दुसऱ्या वाढदिवसाच्या सुमारास 'ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर' असल्याचे निदान झाले.
या अनुभवाने त्यांना मोडून न पाडता अधिक खंबीर बनवले. त्यांनी या अनुभवालाच आपली ताकद बनवले आणि आता त्या विशेष गरजा असलेल्या मुलांच्या अन् व्यक्तींच्या कल्याणासाठी विशेष काम करत आहेत.
२००८ पासून फार्मा क्षेत्रात ठाम पाऊल
२००८ पासून त्या वडिलांसोबत 'युनिक्युअर इंडिया लिमिटेड'च्या नोएडा युनिटशी जोडल्या गेल्या. आज त्या नोएडा, ग्रेटर नोएडा आणि रुडकी येथील प्लँट्सचे संपूर्ण कामकाज पाहतात.
फार्मा क्षेत्र अत्यंत संवेदनशील आहे. इथे औषधांचे प्रमाण मायक्रोग्राम स्तरावर नियंत्रित केले जाते. प्रत्येक बॅचची तपासणी, चाचणी अन् संशोधन आवश्यक असते. हे केवळ उत्पादन नसून लोकांच्या जिवाच्या सुरक्षेचे काम आहे. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नका, असा सल्ला त्या आवर्जून देतात.
WHO, FDA आणि DCGI सारख्या आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय संस्थांच्या नियमांचे पालन इथे करावे लागते. त्यामुळे नेहमी कामात सज्ज राहावे लागते.
कोरोना काळातील मोठी परीक्षा
कोविड-१९ चा काळ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा कसोटीचा काळ होता. औषधे, कर्मचारी आणि कच्च्या मालाचा तुटवडा असतानाही त्यांच्या टीमने एकही दिवस उत्पादन थांबवले नाही.
शासनाच्या सूचनेनुसार पॅरासिटामॉल आणि सॅनिटायझरचे उत्पादन अहोरात्र सुरू ठेवले. गाड्यांची ने-आण अन् कर्मचाऱ्यांचे नियोजन खूप कठीण होते, पण या अनुभवाने त्यांच्या टीमला अधिक घट्ट जोडले. सुरक्षारक्षकापासून ते व्यवस्थापनातील प्रत्येक माणसाशी त्या या काळात जवळून जोडल्या गेल्या.
गुणवत्ता अन् खर्चाचा मेळ
सध्याच्या काळात जागतिक घडामोडी अन् कच्च्या मालाची टंचाई यामुळे या क्षेत्रासमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असले, तरी गुणवत्तेशी तडजोड करणे अशक्य असते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अन् ऑटोमेशनचा वापर केला जातो.
गेल्या १० वर्षांत भारतीय फार्मा क्षेत्राने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. आज भारत जगात 'फार्मेसी ऑफ द वर्ल्ड' म्हणून ओळखला जातो, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो.
युवा पिढीला मोलाचा सल्ला
सुरुवातीच्या दिवसांत दक्षिण दिल्लीहून मोदीनगरपर्यंत रोज गाडी चालवत त्या प्रशिक्षणासाठी जायच्या. कौटुंबिक ओळखीचा कोणताही फायदा न घेता त्यांनी लॅबमध्ये जमिनीवर उतरून काम शिकले.
त्या म्हणतात की, "आज या क्षेत्रात महिलांची संख्या वाढतेय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तरुणांनी नेहमी बेसिक गोष्टी मजबूत ठेवाव्यात, शिकण्याची वृत्ती ठेवावी आणि सकारात्मक राहावे. कारण तुम्ही बनवत असलेले औषध थेट रुग्णाच्या जिवाशी जोडलेले असते."
शेवटी त्या एकच सांगतात की, "आयुष्यात काहीही अशक्य नाही. इच्छाशक्ती भक्कम असेल, मेहनत सातत्यपूर्ण असेल अन् दिशा स्पष्ट असेल, तर छोटीशी सुरुवातही एका मोठ्या यशात बदलू शकते."