फरहान इस्रायली
१२ मे रोजी जोधपूरच्या ५६८ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात मेहरानगड म्युझियम ट्रस्टने जेव्हा मैमुना नर्गिस यांना सन्मानित केले, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा बहुमान नव्हता. जोधपूरचे महाराजा गज सिंह, महाराणी हेमलता राज्ये, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि शहापुरा राजघराण्याचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जयपूरस्थित कला संवर्धनतज्ज्ञ मैमुना यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ७५,००० रुपये रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारताचा कलात्मक आणि वास्तुकलेचा वारसा जतन करण्यासाठी त्यांनी केलेल्या दशकांच्या अथक परिश्रमांची ही पावती होती.
ध्येयाने समृद्ध झालेला प्रवास
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात जन्मलेल्या मैमुना नर्गिस यांचे बालपण मर्यादित संसाधने असलेल्या एका सामान्य कुटुंबात गेले. त्यांचे वडील उत्तर प्रदेश पोलिसांत कार्यरत होते. त्यांनी मैमुना यांच्या महत्त्वाकांक्षांना नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांनी मोरादाबाद जिल्ह्यातील बहजोई येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अलिगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी फाईन आर्ट्सची पदवी घेतली.
त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला खरा वळण मिळाले जेव्हा त्यांनी म्युझिओलॉजीमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. सुरुवातीला केवळ शैक्षणिक आवड असणाऱ्या या विषयाचे पुढे त्यांच्या आयुष्याच्या ध्येयात रूपांतर झाले. भारताचा नाजूक कलात्मक आणि ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले.
आज जयपूरच्या आमेर परिसरात राहणाऱ्या मैमुना भारतातील आघाडीच्या वारसा जतन तज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. देशातील पहिल्या आणि एकमेव शिया मुस्लिम महिला कला संवर्धनतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. शतकानुशतके जुनी हस्तलिखिते, चित्रे, स्मारके, शिल्पे आणि लाकडी वस्तू नष्ट होण्यापासून वाचवण्याचे मोठे काम त्या करत आहेत.
संवर्धनाचे विज्ञान शिकताना
म्युझिओलॉजीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात रुजू झाल्या. तेथे काम करत असतानाच त्यांनी कंझर्वेशन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.
भारत सरकारने आयोजित केलेल्या दोन विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे त्यांचे कौशल्य अधिक धारदार झाले. यातील एक प्रशिक्षण लाकडी वस्तूंच्या संवर्धनावर, तर दुसरे चित्रांच्या पुनरुज्जीवनावर आधारित होते. दुर्मिळ हस्तलिखिते, ऐतिहासिक चित्रे, प्राचीन लाकडी वस्तू आणि अमूल्य दस्तऐवजांवर काम करताना त्यांना एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. संवर्धनासाठी केवळ तांत्रिक ज्ञानाचीच नाही, तर अथांग संयम आणि संवेदनशीलतेची गरज असते. केवळ इतिहासाचा अभ्यास करण्याऐवजी त्या स्वतःच्या हातांनी इतिहास जतन करू लागल्या.
भारताच्या वारशाचे पुनरुज्जीवन
२००२ मध्ये जयपूरच्या जयगड किल्ल्यावर आठ महिने क्युरेटर म्हणून काम करताना मैमुना यांच्या व्यावसायिक प्रवासाला गती मिळाली. हा अनुभव त्यांच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.
त्यानंतर त्या नवी दिल्लीतील प्रसिद्ध चित्रकार जतिन दास यांच्या स्टुडिओमध्ये रुजू झाल्या. तेथे त्यांनी संग्रहकांकडून परत आलेल्या सुमारे १०० दुर्मिळ कॅनव्हास चित्रांची दुरुस्ती केली. या कामामुळे त्यांच्या कौशल्याला अधिक उजाळा मिळाला, पण त्याच वेळी पुरुषप्रधान क्षेत्रात काम करताना येणाऱ्या आव्हानांचाही त्यांना सामना करावा लागला.
हिजाब परिधान करणाऱ्या महिला असल्याने त्यांना अनेकदा लोकांच्या पूर्वग्रहाला आणि संशयास्पद नजरांना सामोरे जावे लागले. अनेक कठीण कामे पूर्ण करूनही ग्राहकांनी मोबदला न दिल्याचे प्रसंगही त्यांच्या आयुष्यात आले. मात्र, या नकारात्मक अनुभवांना त्यांनी आपल्या यशाची पायरी बनवले.
राजस्थानमधील संग्रहालयांचे जतन
आपल्या 'आर्ट कंझर्वेशन अँड रेस्टोरेशन हाऊस' या संस्थेच्या माध्यमातून मैमुना यांनी राजस्थानसह अनेक राज्यांत मोठे संवर्धन प्रकल्प राबवले आहेत.
राजस्थानमधील सुमारे १६ संग्रहालयांमध्ये त्यांनी काम केले आहे. यात चार संग्रहालयांतील हस्तलिखितांचे जतन, १० संग्रहालयांतील ६ व्या ते १३ व्या शतकातील दगडी शिल्पांचे संरक्षण आणि इतर दोन संग्रहालयांतील स्थापत्य व चित्रांचे संवर्धन या कामांचा समावेश आहे.
२००४ ते २००७ दरम्यान त्यांनी राष्ट्रीय संग्रहालयाच्या प्रयोगशाळेत काम केले. या काळात त्यांनी बाबरनामा, अकबरनामा, जहांगीरनामा आणि शाहजहाननामा यांसारख्या अमूल्य मुघल हस्तलिखितांचे संवर्धन केले.
त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे 'अलिफ लैला' (अरेबियन नाईट्स) या मूळ हस्तलिखिताचे संवर्धन! या हस्तलिखिताचा सुमारे ३६ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला होता.
अमूल्य हस्तलिखिते आणि कलाकृतींचे संवर्धन
कोटा संग्रहालयात मैमुना यांनी भगवद्गीतेच्या ४०० वर्षे जुन्या हस्तलिखिताचे संवर्धन केले. या हस्तलिखिताचे अनेक तुकडे झाले होते. प्रत्येक पान अत्यंत काळजीपूर्वक जोडून त्यांनी विशेष बॅकिंग देऊन ते भावी पिढ्यांसाठी सुरक्षित केले.
याशिवाय त्यांनी याच संग्रहालयातील ७५० वर्षे जुने सोन्याच्या शाईने लिहिलेले कुराण पुनरुज्जीवित केले. ही कलाकृती संग्रहालयाच्या सर्वात मौल्यवान ठेव्यांपैकी एक आहे.
जैसलमेरजवळील लोदुर्वा येथील प्राचीन जैन मंदिरात त्यांनी ४०० वर्षे जुन्या लाकडी रथाचे पुनरुज्जीवन केले. हा रथ वाळवीमुळे जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला होता. लाकडाची भुकटी झाली होती, तरीही आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी हा ऐतिहासिक रथ पुन्हा वापरण्यायोग्य बनवला.
मुंबई विमानतळावर प्रदर्शित करण्यात आलेल्या २०० वर्षे जुन्या पालितना चित्राच्या दुरुस्तीचे कामही त्यांनी केले. अनेक तुकड्यांमध्ये फाटलेला हा भव्य कॅनव्हास त्यांनी अत्यंत बारकाईने दुरुस्त करून पूर्ववत केला.
राजवाडे, भित्तिचित्रे आणि ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण
झालावाडच्या गढ पॅलेसमध्ये त्यांनी वास्तुकलेच्या संवर्धनाचे अत्यंत कठीण काम हाती घेतले. तेथील शतकानुशतके जुनी भित्तिचित्रे आणि राजवाड्याच्या भिंतींवर व छतावर असलेला पारंपरिक चुन्याचा गच्ची गिलावा त्यांनी पूर्ववत केला.
अनेक कंत्राटदारांनी जुना गिलावा पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आधुनिक साहित्याचा वापर करण्याऐवजी पारंपरिक पद्धतींचा वापर करून मूळ वास्तूचे अस्तित्व टिकवून ठेवण्यावर त्या ठाम राहिल्या.
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी राजस्थानच्या सांस्कृतिक वारशावर आधारित भित्तिचित्रे तयार केली. यात हळदीघाटीचे युद्ध, फड चित्रकला, शीश महल डिझाइन आणि नाहरगड किल्ल्याची वास्तुकला साकारण्यात आली आहे.
जयपूरच्या अल्बर्ट हॉल म्युझियममधील फ्रेश्को आणि मिनिएचर पेंटिंग्सचे संवर्धनही त्यांनी केले आहे. भरतपूर संग्रहालयात त्यांनी ३० दुर्मिळ अभ्रकावरील मिनिएचर पेंटिंग्स आणि जतन केलेल्या प्राण्यांच्या अवशेषांचे संवर्धन केले. अनेक वरिष्ठ संवर्धनतज्ज्ञांनी हे काम अत्यंत कठीण मानले होते.
दुर्मिळ लष्करी दस्तऐवजांचे संरक्षण
त्यांच्या अनोख्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित गोपनीय दस्तऐवजांचे संवर्धन होय. त्यांनी विविध लष्करी संस्थांसाठी काम केले असून यात सिंह, वाघ, अजगर आणि सुसर यांच्या जतन केलेल्या अवशेषांचे संवर्धन समाविष्ट आहे. या ऐतिहासिक संग्रहांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम त्यांनी केले.
संग्रहालयांच्या पलीकडचा वारसा
मैमुना यांचे काम केवळ संग्रहालये आणि अभिलेखागारांपुरते मर्यादित नाही. त्यांनी मुंबई आणि दिल्ली विमानतळांवरील वारसा संवर्धन प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वास्तुकलेत शीश महल काम, काचेवरील चित्रकला आणि भित्तिचित्रकलेसारख्या राजस्थानच्या पारंपरिक कलाशैलींचा अंतर्भाव त्यांनी केला आहे.
संवर्धनाच्या कामानिमित्त त्यांनी राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तर प्रदेशचा प्रवास केला आहे. कानपूरमधील जेके ग्रुपच्या खाजगी संग्रहालयासाठीही त्यांनी विशेष काम केले आहे.
पारंपरिक बांधकाम पद्धतींचे पुनरुज्जीवन
मैमुना यांच्या मते, संवर्धन म्हणजे केवळ कलाकृती आणि स्मारके जपणे नव्हे, तर पारंपरिक बांधकाम ज्ञानाचे रक्षण करणे होय. त्या चुन्याचा गारा, सुरखी आणि अराईश प्लास्टरसारख्या जुन्या साहित्याचा वापर करण्याचा आग्रह धरतात.
आधुनिक सिमेंटच्या इमारतींचे आयुष्य कमी असते, पण या पारंपरिक तंत्रज्ञानामुळेच ऐतिहासिक वास्तू शतकानुशतके भक्कम उभ्या आहेत, असे त्या सांगतात. त्यांच्या अनुभवामुळे आजचे वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिक आधुनिक बांधकामात पारंपरिक पद्धतींचा विचार करू लागले आहेत.
शिक्षणाच्या माध्यमातून प्रबोधन
संवर्धनाच्या कामासोबतच मैमुना नियमितपणे चर्चासत्रे, कार्यशाळा आणि जागरूकता मोहिमा आयोजित करतात. याद्वारे त्या वारसा जतन, महिला शिक्षण आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांवर भाष्य करतात.
वारसा जतन करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजाचे संयुक्त कर्तव्य आहे, असा त्यांचा विश्वास आहे. नागरिकांनी स्वतःहून आपला सांस्कृतिक वारसा जपला नाही, तर भावी पिढ्या आपली ओळख आणि इतिहासापासून वंचित राहतील.
पुरस्कार आणि बहुमानांचा प्रवास
वारसा जतन क्षेत्रातील योगदानाबद्दल मैमुना नर्गिस यांना ३२ हून अधिक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. २०१८ मध्ये कुरुक्षेत्र येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात भारतातील १०० प्रज्ञावंत महिलांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. जम्मू विद्यापीठ, फिक्की आणि अनेक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
इतिहास जिवंत ठेवण्याचा ध्यास
राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळूनही मैमुना अजूनही प्रत्यक्ष कामात तितक्याच हिरीरीने सहभागी होतात. त्या अनेकदा कामगारांसोबत स्वतःच्या हाताने चुन्याचा गारा तयार करताना, पारंपरिक गिलावा लावताना किंवा तळपत्या उन्हात शिडीवर उभे राहून शतकानुशतके जुनी भित्तिचित्रे दुरुस्त करताना दिसतात. पुरुषप्रधान क्षेत्रात निष्ठा आणि कौशल्य हे पूर्वग्रहांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
पुनरुज्जीवित केलेले प्रत्येक हस्तलिखित, भित्तिचित्र, स्मारक आणि कलाकृतीच्या माध्यमातून मैमुना नर्गिस भारताचा सांस्कृतिक वारसा सुरक्षित करत आहेत. इतिहास जिवंत ठेवण्यासाठी केवळ ज्ञान नव्हे, तर अढळ निष्ठेची गरज असते, याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. जुन्या अमूल्य कलाकृतींना नवे जीवन देऊन त्या भूतकाळातील गोष्टी भावी पिढ्यांसाठी जिवंत ठेवत आहेत.