डॉ. शाइस्ता अंजुम : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बनलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
डॉ. शाइस्ता अंजुम
डॉ. शाइस्ता अंजुम

 

नीलम गुप्ता

डोळ्यांत एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर कमालीचे समाधान बाळगत डॉ. शाइस्ता अंजुम आपल्या आयुष्याची कहाणी अत्यंत शांत आणि संयमी आवाजात सांगतात. त्या म्हणतात, "मी डॉक्टर व्हावे, हे माझ्या आईचे स्वप्न होते. माझे एमबीबीएस पूर्ण झाल्यावर मी पुढे एमएस करावे, असा आग्रह माझ्या पतीने धरला. मी अभ्यास करत असताना माझ्या सासूने केवळ माझ्या मुलीचा सांभाळ केला नाही, तर आजही मला घरकामाची कोणतीही काळजी करावी लागू नये यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करतात. हे तिघे माझ्या आयुष्यात आले नसते, तर आज मी कुठे असते हे मला सांगता येत नाही."

शाइस्ता यांचा डॉक्टर बनण्यापर्यंतचा प्रवास हा एका सामान्य कुटुंबाचा संघर्ष सांगतो. गरीब लोक केवळ मोठी स्वप्ने पाहत नाहीत, तर ती स्वप्ने सत्यात उतरवतात, हेच या कुटुंबाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही केवळ शाइस्ता यांची एकट्याची कहाणी नाही. ही तितकीच त्यांच्या आईची आणि सासूचीही कहाणी आहे. त्यांच्या त्याग आणि निग्रहामुळेच शाइस्ता यांचे हे यश शक्य झाले आहे.

शाइस्ता यांचे बालपण आग्नेय राजस्थानमधील कोटा शहरापासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या बारान या शहरात (आता उपविभाग) गेले. त्यांचे वडील एक छोटे किराणा दुकान चालवायचे, तर आई कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बिड्या वळण्याचे काम करायची. "माझी आई हसरत बानू बिड्या वळायची. आम्ही ५ भावंडे होतो - ३ बहिणी आणि २ भाऊ. अभ्यासात मी सगळ्यांमध्ये हुशार होते. मी डॉक्टर होऊ शकते असा विश्वास माझ्या आईला वाटत होता. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी तिने मला कोटामधील ॲलन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले. मी खूप मेहनत केली, परीक्षा उत्तीर्ण झाले आणि बारानपासून फार लांब नसलेल्या झालावाड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला."
 

आपली इंटर्नशिप आणि एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर शाइस्ता यांची पहिली नियुक्ती पिंडवार गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. राजस्थानमधील वैद्यकीय पदवीधरांना पहिली २ वर्षे ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक असते.

"माझी २ वर्षांची ग्रामीण सेवा पूर्ण होण्यापूर्वीच माझे पती सय्यद इम्रान अली यांनी मला लगेचच एमएस करण्याचा आग्रह धरण्यास सुरुवात केली. माझे पती पेशाने वकील आहेत. २०१५ मध्ये झालावाड येथे इंटर्नशिप सुरू असताना आमचे लग्न झाले होते. ते नेहमी मस्करी करत म्हणायचे, 'मी तुला पुढे शिकण्यापासून रोखले असा आरोप लोक माझ्यावर करतील आणि तो कलंक मला माझ्या डोक्यावर नको आहे.'"

आपली अनिवार्य ग्रामीण सेवा पूर्ण केल्यानंतर शाइस्ता यांची बदली झालावाड येथील शासकीय रुग्णालयात झाली. २०२० मध्ये त्यांनी एमएस प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीतील एका ऑनलाईन कोचिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला.

"रुग्णालयातील कर्तव्य बजावल्यानंतर मला केवळ रात्रीच्या वेळीच वर्गांना उपस्थित राहता येत होते. तोपर्यंत मी आई झाले होते. माझ्या मुलीचा बहुतांश सांभाळ माझ्या सासूनेच केला. मी २ वेळा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले, पण मला हवी असलेली विशेष शाखा मिळण्याइतका माझा रँक चांगला नव्हता. ॲनेस्थेशिओलॉजी वगळता दुसरी कोणतीही आवडती शाखा उपलब्ध नव्हती आणि मला त्यात रस नव्हता. माझ्या तिसऱ्या प्रयत्नात मला उत्तम रँक मिळाला आणि मी माझी आवडती शाखा निवडू शकले. मी स्त्रीरोग शास्त्र (गॉयनेकोलॉजी) शाखा निवडली, कारण माझी आई नेहमी म्हणायची, 'स्त्रियांना अपार वेदना सहन कराव्या लागतात. त्यांचे आयुष्य थोडे सोपे करण्याचा प्रयत्न कर.'"
 

हसत हसत त्या पुढे सांगतात, "हे ऐकताना सर्व काही अगदी सहजरीत्या घडल्यासारखे वाटू शकते. पण या प्रवासामागे माझ्या आईचा अथांग संघर्ष दडलेला आहे."

"माझ्या वडिलांचे एक छोटेसे किराणा दुकान होते, ज्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालायची. माझी आई बिड्या वळायची. त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंज होते, पण प्रत्येक रुपया मोलाचा ठरत होता. आम्ही सर्वजण सरकारी शाळेत शिकलो, तरीही पुस्तके, गणवेश आणि इतर गरजांचा खर्च कायम असायचा. अनेकदा माझे आजोबा आम्हाला आर्थिक मदत करायचे."

"जेव्हा मी कोटा येथे कोचिंग क्लाससाठी जात होते, तेव्हा माझी आई एका छोट्या गल्ल्यात ५ आणि १० रुपयांची नाणी साठवून ठेवायची आणि जमलेली रक्कम मला पाठवायची. तिने स्वतःवर कधीही फारसा खर्च केला नव्हता, पण नंतर तिने घरातील खर्चातही कपात करण्यास सुरुवात केली. तिची एकच इच्छा होती - कशीही करून तिची मुलगी डॉक्टर झाली पाहिजे."

"माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता मला दिल्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानते. हे केवळ तिच्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न नव्हते - तर तिच्या आत्म्याची ती तीव्र तडफ होती."

शाइस्ता स्पष्ट करतात की त्यांच्या आईच्या या निश्चयामागे खूप जुनी आणि खोल पार्श्वभूमी होती.

"माझ्या आजोबांना ३ मुली आणि २ मुले होती. त्यांनी आपल्या मुलींना केवळ ५ वी पर्यंत शिकवले, पण दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यातील एक भाऊ डॉक्टर झाला. माझी आई आणि तिच्या बहिणी आपल्याला पुढे का शिकू दिले जात नाही याबद्दल कसा विचार करायच्या, हे आई आम्हाला नेहमी सांगायची. त्या आपल्या वडिलांकडे विनवणी करायच्या, पण आजोबा म्हणायचे, 'मुलींना उच्च शिक्षणाची गरज नसते.'"

"बहिणी घरातील सर्व कामे करायच्या आणि त्यांचा भाऊ वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्याला सतत चहा बनवून देण्याची जबाबदारीही त्यांचीच असायची. त्याच वेळी माझ्या आईने निश्चय केला होता की, जर तिला कधी मुलगी झाली तर ती तिला नक्की डॉक्टर बनवेल. तिने अनेक हालअपेष्टा सहन केल्या पण ते स्वप्न कधीही सोडले नाही. ते केवळ एक स्वप्न नव्हते - तर तिच्या मनावर झालेली ती एक जुनी जखम होती, ज्यावर मी डॉक्टर झाल्यावर शेवटी मलम पडले."

आईचे त्याग पाहून आपण जीवनासाठी तयार झालो, असे शाइस्ता म्हणतात. मात्र लग्नानंतर त्यांना जाणवले की त्यांच्या सासूची कहाणी ही त्याहूनही मोठ्या संघर्षाची होती.

"माझी सासू हसरत बानो एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. पण त्यांच्या पतीने दुसरे लग्न केले आणि त्यांना सोडले. त्या आपल्या ६ वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी परतल्या. त्यांच्या भावाने आणि वहिनीने त्यांच्याशी चांगली वागणूक दिली नाही. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांची आई त्यांच्यासोबत वेगळी राहू लागली."

"छोट्या मुलाचे संगोपन करायचे होते आणि समोर संपूर्ण आयुष्य पडून होते. त्यांच्या आईने त्यांना आसरा दिला, पण उदरनिर्वाह चालवणे हे मोठे आव्हान होते. त्यांनी बिड्या वळण्यास सुरुवात केली, पण तेवढे उत्पन्न पुरेसे नव्हते. मग त्यांनी घरोघरी जाऊन कपडे विकण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी आपल्या टोपलीत बांगड्या, नेलपॉलिश, लिपस्टिक आणि इतर सौंदर्यप्रसाधने जोडली."

"त्या माल खरेदी करण्यासाठी कोटा येथे जायच्या आणि नंतर झालावाडपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकेत या गावात जाऊन घरोघरी वस्तू विकायच्या. झालावाडमध्ये वस्तू विकणे त्या टाळायच्या, कारण नातेवाईक नावे ठेवतील आणि अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत होती."

"आपल्या मुलाला शिकवता यावे यासाठी प्रत्येक रुपया कमावण्यासाठी त्या दिवस-दिवसभर प्रवास आणि कष्ट करायच्या. आज तोच मुलगा एक यशस्वी वकील आहे."

आपल्या शादीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना शाइस्ता म्हणतात, "लग्नानंतर जेव्हा मी या कुटुंबात आले, तेव्हा घरात फ्रिज किंवा टीव्ही काहीही नव्हते. आमच्याकडे फक्त एक स्टीलची प्लेट आणि ४ वाट्या होत्या. आम्ही तिघे एकाच ताटात जेवायचो. पण आज आमच्याकडे स्वतःची गाडी आहे, पक्के घर आहे आणि माझ्या माहेरचे भाऊसुद्धा आर्थिकदृष्ट्या चांगले स्थिरावले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता माझ्या आईला किंवा सासूला बिड्या वळाव्या लागत नाहीत."

आपले एमएस पूर्ण केल्यानंतर शाइस्ता यांची पुन्हा एकदा ग्रामीण भागात नियुक्ती झाली - घरापासून तब्बल १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या डग चौमहला येथील समुदाय आरोग्य केंद्रात.

"लहान मुलीला सांभाळून एवढ्या लांबच्या ठिकाणी नोकरी करणे अत्यंत कठीण झाले होते. म्हणून मी वरिष्ठ निवासी (सीनिअर रेसिडेन्सी) पदासाठी अर्ज केला. ईश्वराच्या कृपेने माझी निवड झाली आणि माझी नियुक्ती झालावाड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली."

त्यांनी एमएस पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांची अध्ययन रजा घेतली होती आणि जानेवारी २०२६ मध्ये त्या पुन्हा सरकारी सेवेत रुजू झाल्या.

"आज माझी आई आपल्यात नाही. पण मी जे काही मिळवले आहे ते केवळ तिच्यामुळेच. संपूर्ण नातेवाईकांमध्ये मला आज जो मान-सन्मान मिळतो तो यामुळेच, कारण घराबाहेर पडून उच्च शिक्षण घेणारी आणि यशस्वी करिअर घडवणारी मी आमच्या कुटुंबातील पहिली मुलगी होते."

डॉ. शाइस्ता अंजुम यांचा हा प्रवास ३ असाधारण व्यक्तींना वाहिलेली एक आदरांजली आहे - त्यांची आई, जिने महिलांवर लादलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन स्वप्न पाहण्याचे धाडस केले; त्यांचे पती, जे त्यांच्या आकांक्षांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले; आणि त्यांच्या सासू, ज्यांनी दुसऱ्या स्त्रीचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वतःच्या सुखाचा मूकपणे त्याग केला. या सर्वांनी मिळून एका स्त्रीच्या यशाचे रूपांतर पिढ्यानपिढ्यांच्या कौटुंबिक विजयात केले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter