मुमताज थाहा : ९० टक्के हिंदू मतदार असलेल्या वॉर्डातून निवडून आलेल्या पहिल्या मुस्लिम महिला नगरसेविका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
मुमताज थाहा
मुमताज थाहा

 

श्रीलता एम., त्रिशूर

गेल्या ऑगस्टमध्ये मुमताज थाहा यांनी कन्नानकुलंगरा येथून त्रिशूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकली. हा केवळ एक निवडणूक विजय नव्हता. त्रिशूर महानगरपालिकेच्या इतिहासातील त्या पहिल्या मुस्लिम महिला नगरसेविका बनल्या. विशेष म्हणजे, तब्बल ९० टक्के हिंदू मतदार असलेल्या वॉर्डातून त्या भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.

पण मुमताज यांच्यासाठी त्यांची धार्मिक ओळख हे राजकारणाचे साधन कधीच नव्हते. त्या म्हणतात, "मतदार आणि पक्षासाठी मी केवळ एक मुस्लिम नव्हते. मी कन्नानकुलंगराची लेक होते." याच वॉर्डात लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांचे लोकांशी एक घट्ट नाते तयार झाले होते. त्यांनी भाजपचीच निवड का केली, यावरून लोकांच्या मनात शंका आणि उत्सुकता होती. त्यांना वारंवार प्रश्न विचारले गेले. पण लोकांसोबतच्या या घट्ट नात्यामुळे त्यांना या सर्व प्रश्नांना सामोरे जाणे सोपे गेले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारातही त्यांना हे प्रश्न विचारले गेले. यापूर्वी कन्नानकुलंगरा वॉर्डाचे प्रतिनिधित्व हिंदू समाजातील एका भाजप नगरसेवकाने केले होते. त्यामुळे उमेदवाराच्या पार्श्वभूमीतील हा बदल लोकांच्या लगेच लक्षात आला. जुन्या आठवणींना उजाळा देताना त्या सांगतात, "लोकांच्या मनात मोठी उत्सुकता होती. मी कोण आहे आणि इथे का आले आहे, हे त्यांना जाणून घ्यायचे होते."

यावर ३८ वर्षीय मुमताज यांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी एकाच घरात वारंवार भेटीगाठी घेण्याचा धडाका लावला. "दुसऱ्या भेटीत लोकांनी मला थेट प्रश्न विचारले. पण तिसऱ्या किंवा चौथ्या भेटीपर्यंत वातावरण खूप हलकेफुलके झाले होते," असे त्या सांगतात. त्या तिथेच लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या. या ओळखीचा त्यांना मोठा फायदा झाला. लोकांच्या मनातील भीती दूर झाली आणि धार्मिक ओळखीच्या पलीकडे जाऊन एक विश्वासाचे नाते तयार झाले.

निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून आपला राजकारणात प्रवेश झाला नाही, असे त्या स्पष्ट करतात. त्यांच्या कुटुंबाचे तमिळनाडूशी जवळचे संबंध होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्या आजही जयललिता यांचा उल्लेख अत्यंत प्रेमाने 'जयम्मा' असाच करतात. चेन्नईमधील त्यांच्या कुटुंबाचे अनेक मित्र 'अण्णाद्रमुक' (AIADMK) पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या घरात नेहमी राजकीय चर्चा रंगायच्या.

२०१६ मध्ये जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर यातील अनेक मित्रांनी 'अण्णाद्रमुक' सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मुमताज यांना सार्वजनिक कामांची मोठी आवड होती. हे पाहून यातीलच एका मित्राने चेन्नईतील पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. हा प्रस्ताव स्वीकारला गेला. पण तमिळनाडूतील पक्षासोबतचा त्यांचा हा प्रवास अगदी थोड्या काळापुरता होता. काही वर्षांनंतर त्या पुन्हा त्रिशूरला परतल्या.

केरळमध्ये राजकीय काम सुरू करण्यासाठी त्यांच्या वडिलांनीच त्यांना मोठे प्रोत्साहन दिले. "मी लोकसभा निवडणुकीपासून सुरुवात करून इथला अनुभव घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती," असे त्या आवर्जून सांगतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुमताज यांनी भाजपसाठी सक्रियपणे काम सुरू केले. अभिनेते सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधून निवडणूक लढवून ती जिंकली होती. "त्या संधीमुळे मला जिल्ह्यात पक्षाचे काम कसे चालते, हे समजून घेता आले. नंतर मला महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची विचारणा झाली, तेव्हा या अनुभवाचा मला खूप फायदा झाला," असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी भाजपचीच निवड का केली, हा प्रश्न आजही त्यांची पाठ सोडत नाही. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता, हे मुमताज मान्य करतात. पक्षातील काही गट आणि स्वतःच्या समाजातूनही त्यांना या विरोधाचा सामना करावा लागला. "लोकांचा विश्वास जिंकणे हे एक मोठे आव्हान असते. विशेषतः मी सुरुवातीला इथून पक्षात प्रवेश केला नव्हता, त्यामुळे हे आव्हान अधिक मोठे होते," असे त्या सांगतात. आपल्या राजकीय निवडीमुळे कुटुंबातील काही नातेवाईक नाराज असल्याची कबुलीही त्या देतात.

भाजप हा अल्पसंख्याक विरोधी पक्ष असल्याचा एक मोठा समज समाजात पसरलेला आहे. पण मुमताज हा दावा पूर्णपणे फेटाळून लावतात. हा केवळ एक खोटा प्रचार असून, आपला प्रत्यक्ष अनुभव यापेक्षा खूप वेगळा असल्याचे त्या सांगतात. "माझ्या समाजातील अनेक लोक हे बदलणारे वास्तव स्वीकारायला तयार नाहीत," असे त्या म्हणतात. त्याचवेळी विशेषतः अल्पसंख्याक समाजाचा दृष्टिकोन आता हळूहळू बदलत असल्याचेही त्या नमूद करतात. त्रिशूरचे भाजप जिल्हाध्यक्ष एक ख्रिश्चन आहेत, याकडे त्या लक्ष वेधतात. त्यामुळे पक्षाकडे केवळ धार्मिक चष्म्यातून बघू नये, असा युक्तिवाद त्या करतात.

मुमताज या भाजपच्या 'अल्पसंख्याक मोर्चा'च्या सदस्य आहेत. मुस्लिम महिलांना शिक्षणासाठी आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे आपले मुख्य प्राधान्य असल्याचे त्या सांगतात. "शिक्षणामुळे महिलांना स्वतःसाठी योग्य पर्याय निवडण्याचा आत्मविश्वास मिळतो," असे त्यांचे ठाम मत आहे.

निवडणुकीतील विजयासोबतच अनेक नव्या जबाबदाऱ्याही आल्या आहेत. कामाचा व्याप खूप वाढला आहे. कुटुंबासाठी फार कमी वेळ मिळतो, हे त्या प्रामाणिकपणे मान्य करतात. त्यांची आई त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाचा सांभाळ करते. त्यांचे पती आणि वडील मिळून व्यवसाय चालवतात आणि तेच मुमताज यांचे सर्वात मोठे पाठीराखे आहेत. मुमताज त्यांच्या वॉर्डात पाळीव प्राण्यांसाठी एक ग्रूमिंग सेंटरही चालवतात. त्याचे नाव 'नाला' असे आहे. स्वाहिली भाषेत याचा अर्थ 'राणी' असा होतो. याच ठिकाणाहून त्या आपल्या राजकीय बैठका आणि लोकांच्या गाठीभेटीचे कामही पाहतात.

पहिल्यांदाच नगरसेविका झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाचे कामकाज आपण अजूनही शिकत आहोत, असे त्या प्रांजळपणे सांगतात. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. "येणारे काही महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी खूप व्यग्र असेन, हे मी माझ्या कुटुंबाला आधीच सांगितले आहे," असे त्या म्हणतात.

जयललिता यांच्याकडून प्रेरणा घेतली असली, तरी त्यांच्याशी तुलना करणे मुमताज यांना अजिबात आवडत नाही. "जयललिता होण्यासाठी मोठे अग्निदिव्य पार करावे लागते. त्यांची जागा दुसरे कुणीही घेऊ शकत नाही," असे त्या अत्यंत ठामपणे सांगतात. जयललिता यांच्याप्रमाणेच तळागाळातील लोकांशी नाळ जोडून काम करण्याची शैली मात्र त्यांना नक्कीच आत्मसात करायची आहे. "त्यांनी नेहमीच तळाकडून वरपर्यंत काम केले, वरून खाली नाही," असे मुमताज अभिमानाने सांगतात.

राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दल विचारले असता, त्या अत्यंत साधेपणाने उत्तर देतात. "माझे लक्ष केवळ या पाच वर्षांवर केंद्रित आहे. मला पक्ष आणि मतदारांचा विश्वास जिंकायचा आहे. नेतृत्व म्हणजे कायम एकाच खुर्चीला चिकटून बसणे नव्हे," असे त्या स्पष्ट करतात.

सध्या मुमताज यांचे पूर्ण लक्ष स्थानिक पातळीवर आहे. आपल्या वॉर्डातील प्रश्न सोडवणे, परिसरात भाजपचे वर्चस्व वाढवणे आणि सर्व समुदायांमध्ये विश्वासाचा पूल बांधणे, हेच त्यांचे ध्येय आहे. मोठ्या राजकीय स्वप्नांऐवजी रोजच्या जमिनीवरील कामातून तयार झालेला हा त्यांचा अत्यंत साधा आणि सरळ दृष्टिकोन आहे.

आपल्या वॉर्डात आणि ग्रूमिंग सेंटरमध्ये फिरताना, परिसरातील रहिवासी आणि इतर नगरसेवकांना भेटताना मुमताज आपल्या राजकीय आदर्श नेत्याकडून मिळालेली शिकवण नेहमी लक्षात ठेवतात. राजकारणाची खरी सुरुवात तळागाळातून होते आणि तेथून ती वरच्या दिशेने जाते, उलट नाही. हीच त्यांच्या कामाची खरी ओळख आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter