सलमा बेगम : शिक्षणाद्वारे महिला सक्षमीकरणाचा पाया रचणारी 'सबला'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
सलमा बेगम
सलमा बेगम

 

सानिया अंजुम 

काही व्यक्ती आपल्या कार्याचा गाजावाजा कधीच करत नाहीत. त्यांचे कार्य शाळा-महाविद्यालयांतील वर्ग, संवाद आणि अनेक दशकांपासून घेतलेल्या ठाम निर्णयांतून शांतपणे आकाराला येते. प्राध्यापिका सलमा बेगम यांचा प्रवासही असाच आहे. ही गोष्ट केवळ महत्त्वाकांक्षेची नाही, तर एका दृढ विश्वासाची आहे. संवेदनशीलतेने आणि ठराविक उद्देशाने दिलेले शिक्षण व्यक्तीलाच नव्हे तर संपूर्ण समाजाला बदलू शकते, अशी त्यांची धारणा आहे.

आपल्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलताना त्या पदव्युत्तर शिक्षणानंतरच्या अनिश्चिततेची आठवण काढतात. त्या म्हणतात, "शिक्षण पूर्ण झाल्यावर मला करिअर करण्याची खूप ओढ होती. पण १९८० च्या दशकात करिअर समुपदेशन किंवा कलचाचणी या गोष्टी फारशा प्रचलित नव्हत्या." त्यांच्या पिढीतील इतर अनेक स्त्रियांप्रमाणे त्यांनीही उपलब्ध वाटा चोखाळल्या. त्यांनी काही काळ एलआयसीमध्ये आणि नंतर एका खाजगी बँकेत काम केले. मात्र तिथे त्यांचे मन फार काळ रमले नाही. 

"मला ते काम पुढे सुरू ठेवायचे नव्हते," असे त्या स्पष्टपणे सांगतात. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण तेव्हा आला, जेव्हा त्यांनी एका खाजगी महाविद्यालयात शिकवण्याची संधी स्वीकारली. त्या म्हणतात, "पहिल्याच दिवसापासून मला जाणीव झाली की हेच माझे खरे क्षेत्र आहे. तोच तो क्षण होता. मला जे करायचे होते तेच मी करत होते. शिकवताना मला सर्वाधिक आनंद मिळायचा."

त्यांच्या या कार्याचा पाया कृष्णगिरी येथील त्यांच्या संस्कारांमध्ये दडलेला आहे. एका लघुउद्योजकाच्या पोटी जन्मलेल्या सलमा यांचे बालपण अशा घरात गेले, जिथे भौतिक सुखापेक्षा मूल्यांना जास्त महत्त्व दिले जायचे. त्यांची आई आणि आजी-आजोबांनी त्यांच्या जागतिक दृष्टिकोनाला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. "आमच्या कुटुंबात इंग्रजी आणि उर्दू साहित्यावर दररोज चर्चा आणि वाचन व्हायचे," असे त्या आठवणीने सांगतात. 
 

"शेक्सपिअर, रुमी आणि पंचतंत्र ही नावे आम्हाला घरच्यांसारखीच परिचित होती." त्यांच्यासाठी साहित्य केवळ अभ्यासाचा विषय नव्हता, तर ते जगले जायचे, त्यावर चर्चा व्हायची आणि ते आत्मसात केले जायचे. या सुरुवातीच्या प्रभावामुळे भाषा, विचार आणि अभिव्यक्ती याबद्दल त्यांच्या मनात एक संवेदनशीलता निर्माण झाली. पुढे त्यांच्या अध्यापन शैलीतही हेच गुण दिसून आले.

जेव्हा त्या मुलींच्या शिक्षणाबद्दल बोलतात, तेव्हा त्यांच्या शब्दांतील विश्वास स्पष्टपणे जाणवतो. "लहानपणापासून मी पाहत आले की कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात नव्हते. प्राथमिक शिक्षणापलीकडे मुलींना शिकण्याची गरज नाही, असेच त्यांच्या मनावर बिंबवले जायचे." अनेकांसाठी शालेय शिक्षण हा केवळ लग्नापर्यंतचा एक तात्पुरता टप्पा मानला जाई. 

मात्र, त्यांच्या कुटुंबाचे विचार पूर्णपणे वेगळे होते. "आमच्या कुटुंबात शिक्षण ही सर्वात महत्त्वाची प्राथमिकता होती आणि मुलींच्या शिक्षणावर तर विशेष भर दिला जात असे," असे त्या सांगतात.

त्यांच्या आईच्या विचारांचा सलमा यांच्यावर कायमचा प्रभाव पडला. "शिक्षणामुळे चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व घडते, असा त्यांच्या आईचा ठाम विश्वास होता. शिक्षण तुम्हाला धैर्य आणि समज देते. आयुष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद ते तुमच्यात निर्माण करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शिक्षण तुम्हाला चांगले आणि वाईट यातील फरक ओळखायला शिकवते." 

कोणत्याही परिस्थितीत योग्य तेच करण्यावर त्यांच्या पालकांचा विश्वास होता. "भौतिक गोष्टींपेक्षा आत्मसन्मान अधिक महत्त्वाचा होता," असे त्या म्हणतात. या मूल्यांमुळेच शिक्षण हा समाजातील, विशेषतः मुलींच्या आयुष्यातील सर्वात मोठा समान दुवा आहे, यावर त्यांचा आयुष्यभर विश्वास राहिला.
 

त्यांच्या करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा चन्नपटना येथे सुरू झाला. तिथे सर्व वर्ग पूर्णपणे कानडी भाषेत चालत असत. त्या सांगतात, "तिथल्या विद्यार्थ्यांना फक्त कानडी समजत असे. त्यामुळे कानडी शिकणे ही माझ्यासाठी गरज बनली." भाषेला अडथळा ठरू न देण्याचा निश्चय करून त्यांनी रोजच्या रेल्वे प्रवासात कानडी शिकायला सुरुवात केली. "सुरुवातीला हे खूप कठीण होते," असे त्या मान्य करतात. पण हळूहळू जिद्दीने आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी त्या भाषेवर आणि अर्थशास्त्र शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या शब्दसंग्रहावर प्रभुत्व मिळवले. "या अनुभवाने माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला," असे त्या सांगतात. 

"जर आपण विद्यार्थ्यांना त्यांना अवगत असलेल्या भाषेत शिकवले, तर कोणताही अवघड विषय सोपा आणि समजण्यासारखा होऊ शकतो. यासाठी शिक्षकाच्या स्वतःच्या भाषेपेक्षा विद्यार्थ्यांची भाषा अधिक महत्त्वाची ठरते." यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि विद्यार्थ्यांशी असलेले त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. पुढे त्या या भाषेत इतक्या निष्णात झाल्या की त्यांना महारानी महाविद्यालयात कानडी माध्यमातून शिकवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

प्राध्यापिका सलमा बेगम यांच्यासाठी अर्थशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय नाही. "अर्थशास्त्र हे इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच अत्यंत उपयुक्त आणि मौल्यवान आहे. व्यवसाय, वित्त आणि व्यापार यांतील प्रत्येक पैलू त्याच्याशी जोडलेला आहे." त्या या विषयाच्या व्याप्तीबद्दल शांतपणे पण उत्साहाने बोलतात. "संशोधन आणि अभ्यासाच्या नवीन क्षेत्रांसाठी अर्थशास्त्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत, ज्यांचा सर्वांनाच फायदा होतो."

सध्याच्या काळात विविध विषयांच्या एकत्रित अभ्यासाच्या (इंटरडिसिप्लिनरी) पद्धतीमुळे या विषयावरचा त्यांचा विश्वास अधिक वाढला आहे. त्या म्हणतात, "यामुळे अर्थशास्त्र विषय अधिक आकर्षक झाला आहे. संधींच्या बाबतीत हे एक आघाडीचे विज्ञान आहे आणि म्हणूनच ते खूप लोकप्रिय आहे." त्यांच्या वर्गातील अध्यापन पद्धतीही याच विचारांवर आधारित आहे. "मी वर्गात जातानाच माझ्या विद्यार्थ्यांच्या मनात अर्थशास्त्र या विषयाबद्दल प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने जाते."

साहित्याबद्दलचे त्यांचे विचार त्यांच्या बौद्धिक जीवनाचा दुसरा पैलू उलगडून दाखवतात. "साहित्य हा कोणत्याही भाषेचा आत्मा असतो. साहित्यामुळेच अभिव्यक्ती आणि संवादामध्ये एक प्रकारची सुसंस्कृतता आणि खोली येते," असे त्या स्पष्ट करतात. इंग्रजी आणि उर्दू साहित्याबद्दल त्यांच्या मनात सारखाच आदर आहे. "दोन्ही भाषा खूप समृद्ध आहेत आणि त्यांना मोठा वारसा लाभला आहे." कविता, नाटक, कथा असो वा कादंबरी, साहित्यामुळे बोलण्याला आणि लिहिण्याला एक शिस्त लागते, असा त्यांचा विश्वास आहे.

साहित्यिक प्रभावाचा विचार करताना त्या इतिहासाचा संदर्भ देतात. "वसाहतकालीन साम्राज्य आणि वसाहतींमध्ये इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे इंग्रजी साहित्याला लोकप्रियता मिळाली." उर्दू भाषेबद्दलचे त्यांचे प्रेम त्यांच्या बोलण्यातून जाणवते. त्या म्हणतात, "उर्दू ही तशी तरुण भाषा आहे, पण तिचे साहित्य अतिशय चैतन्यदायी आणि सुंदर आहे. विषया हाताळण्याची संवेदनशीलता आणि नाजूक पद्धत या भाषेला एक वेगळीच ओळख आणि मोहिनी मिळवून देते."

शैक्षणिक स्तरावर त्यांची कारकीर्द खूपच गौरवशाली राहिली आहे. त्यांनी १९९५ मध्ये बेंगळुरू विद्यापीठातून सरकारी धोरणे आणि त्यांचा महिला उद्योजकतेवर होणारा परिणाम या विषयावर पीएचडी पूर्ण केली. त्या 'टोटल क्वालिटी मॅनेजमेंट' आणि 'ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट'मधील प्रमाणित फॅसिलिटेटर आहेत. तसेच निमहन्स (NIMHANS) आणि बेंगळुरू विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातून त्यांनी प्रमाणित मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणूनही पदवी मिळवली आहे. त्यांनी ५ पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता त्यांनी सबला नावाची संघटना स्थापन केली. विद्यार्थिनी आणि महिला कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या एका औपचारिक व्यासपीठाची गरज ओळखून त्यांनी ही पाऊल उचलले. त्या म्हणतात, "महिलांना संवेदनशील बनवणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सक्षम करणे हाच यामागचा उद्देश होता." 

'सबला'ने कायद्याची जाणीव, हक्क आणि जबाबदाऱ्या, संवाद कौशल्य, सांघिक कार्य आणि उद्योजकता यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. "केवळ जागरूकता निर्माण करणे सुद्धा सक्षमीकरणाचाच एक भाग आहे आणि 'सबला'ने ते यशस्वीपणे करून दाखवले," असे त्या नमूद करतात.

नेतृत्व करू पाहणाऱ्या तरुण स्त्रियांना त्या एक महत्त्वाचा संदेश देतात. "आज महिलांनी जवळजवळ सर्वच क्षेत्रांत आघाडी घेतली आहे," असे त्या म्हणतात. मात्र, तरीही त्यांना एक विषमता जाणवते. "आज अनेक संस्थांच्या प्रमुखपदी स्त्रिया असल्या, तरी व्यवस्थापन मात्र अजूनही पुरुषांच्याच हातात आहे." त्यांचा सल्ला अत्यंत स्पष्ट आणि ठाम आहे.
 
त्या म्हणतात, "नेहमी नेतृत्व करा, केवळ अनुयायी बनू नका. आपल्यापैकी अनेक स्त्रिया भित्री वृत्ती जोपासतात, नवीन वाटा चोखाळायला घाबरतात किंवा समाजाला नाराज करण्याच्या भीतीने गप्प बसतात. स्त्रियांनी या भीतीतून बाहेर येऊन नेतृत्वाची भूमिका स्वीकारणे गरजेचे आहे."

प्राध्यापिका सलमा बेगम यांचे जीवन म्हणजे वर्ग, भाषा, संवेदनशीलता आणि धैर्याच्या जोरावर घडवलेली एक शांत क्रांती आहे. अर्थशास्त्र, साहित्य आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मने घडवली असून त्यांना बोलण्यासाठी ताकद दिली आहे. त्यांचे जीवन आपल्याला आठवण करून देते की खरे शिक्षण हे केवळ शिकवले जात नाही, तर ते जगावे लागते.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter