डॉ. फरखंदा खान फिदा : चित्रकला, सुफी रूहानियत आणि रंगभूमी गाजवणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
डॉ. फरखंदा खान फिदा
डॉ. फरखंदा खान फिदा

 

ओनिका माहेश्वरी

आयुष्यात काही वळणे अशी येतात जिथे एक छोटीशी भेट संपूर्ण भविष्याचा इतिहास लिहून जाते. दिल्लीची एक सोनेरी संध्याकाळ, वर्ष १९९७ मधील ते कला प्रदर्शन आणि एका तरुण चित्रकाराच्या मनात येणारे अनेक प्रश्न. समोर भारतीय कला जगताचे सूर्य मक़बूल फ़िदा हुसैन उभे होते. त्यावेळच्या युवा कलाकार फरखंदा खान यांच्याकडे चित्रकलेचे तंत्र तर होते, पण कदाचित त्या एका खऱ्या विषयाच्या शोधात होत्या. 

फरखंदा यांनी हुसैन साहेबांना एक भोळा पण अतिशय खोल प्रश्न विचारला, "हुसैन साहेब, मी नक्की काय चित्रित केले पाहिजे?" हुसैन साहेबांनी आपल्या नेहमीच्या परिचित स्मितहास्यासह त्यांना एक असा मंत्र दिला, ज्याने त्यांच्या संपूर्ण कला प्रवासाची दिशाच बदलून टाकली. ते म्हणाले, "तेच चित्रित कर जे तुझ्या मनातून आणि आत्म्यातून निघून तुला प्रेरित करेल." 

बस, हाच तो क्षण होता ज्याने एका साध्या चित्रकाराला 'फरखंदा खान फिदा' म्हणून प्रस्थापित करण्याचा पाया रचला. आज जेव्हा कोणी त्यांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारते, तेव्हा त्या अत्यंत अभिमानाने हुसैन साहेबांसोबत झालेली ती छोटी पण प्रभावी चर्चा आवर्जून सांगून जातात.
 

फरखंदा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक बांदा जिल्ह्यातील कालिंजर या गावात झाला होता. हे गाव आपल्या शौर्यासाठी आणि मातीच्या सुवासासाठी ओळखले जाते. परंतु फरखंदा यांच्या घरात कलेचे एक वेगळेच वारे वाहत होते. त्यांचे वडील मोहम्मद सईद खान हे भारतीय वायुसेनेत एक शिस्तप्रिय अधिकारी होते. 

दिवसभर देशाची सेवा आणि लष्कराची कडक शिस्त अनुभवल्यानंतर, ते आपल्या रात्री रंगांच्या नावे करायचे. ते एक हौशी चित्रकार होते. ते कापडावर आणि जुन्या रेकॉर्ड्सवर राधा-कृष्ण तसेच माता सरस्वतीची जिवंत चित्रे रेखाटायचे. वडिलांना रात्रीच्या शांततेत ब्रश चालवताना पाहणे लहानग्या फरखंदा यांच्यासाठी एखाद्या जादुई अनुभवापेक्षा कमी नव्हते. वडिलांच्या याच प्रेरणेने आणि रंगांबद्दलच्या त्यांच्या समर्पणाने चिमुरड्या फरखंदा यांच्या मनात हे बीज पेरले की, कला हा केवळ एक छंद नाही, तर ती स्वतःला व्यक्त करण्याचे एक पवित्र माध्यम आहे.

त्यांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच प्रभावी राहिला आहे. फरखंदा यांनी आपले प्राथमिक शिक्षण देशातील विविध शहरांमध्ये म्हणजेच पुणे आणि काकिनाडा येथे पूर्ण केले. नंतर त्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पोहोचल्या. तिथे त्यांनी चित्रकला म्हणजेच फाईन आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांच्या कठोर परिश्रमाचा अंदाज यावरूनच लावता येतो की, त्यांनी तिथे सुवर्णपदक जिंकले. 
 

शिकण्याची त्यांची ही भूक इथेच संपली नाही. त्यांनी पुढे नागपूर विद्यापीठातून आधुनिक कलेमध्ये डॉक्टरेट पदवीही संपादन केली. काही काळासाठी त्यांनी दिल्लीच्या सलवान पब्लिक स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून आपली सेवा दिली. याच काळात त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या व्यावसायिक कला जीवनाला एक नवीन विस्तार दिला.

फरखंदा खान फिदा यांच्या कलेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा त्यांनी सूफीवाद आपल्या आत्म्यात उतरवला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कलेचे विविध पैलू, धार्मिकता आणि आध्यात्मिकता यावर सखोल संशोधन केले. शोध घेण्याची त्यांची ही रूहानी ओढ त्यांना दिल्लीच्या प्रसिद्ध हजरत निजामुद्दीन दर्ग्यापर्यंत घेऊन गेली. तिथले शांत वातावरण, कव्वालीचे गुंजणारे सूर आणि प्रार्थनेचा तो माहोल यांनी त्यांच्या मनाला आतून ढवळून काढले. सूफीवादाचा खरा अर्थ शांतता हाच आहे, असे फरखंदा सांगतात. 

जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत शांतता अनुभवता, तेव्हा बाहेरील सर्व द्वेष, मत्सर, नफरत आणि संघर्ष आपोआप संपून जातो. त्यांच्या पेंटिंग्समध्ये आता सूफी संतांची रूहानियत, दर्ग्यांचा सुकुन आणि खुदाच्या प्रार्थनेचे रंग उमटू लागले. त्यांच्या कॅनव्हासवरील रंगांची निवड आणि ब्रशचे स्ट्रोक्स पाहणाऱ्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात, जिथे केवळ शांतता आणि बंधुभाव पाहायला मिळतो.

वर्ष २००२ हे त्यांच्या कारकिर्दीसाठी एक मोठा मैलाचा दगड ठरले. या वर्षी त्यांनी आपल्या पेंटिंग्सचे पहिले मोठे प्रदर्शन भरवले. त्यांच्या कलेतील साधेपणा आणि त्यामध्ये लपलेल्या सखोल अर्थाने केवळ भारतीय कलाप्रेमींनाच प्रभावित केले नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. लंडन आणि बहरीनसारख्या देशांमध्ये त्यांच्या कलेला मोठी मागणी राहिली. 

बहरीनमध्ये त्यांची एक पेंटिंग तब्बल ५ लाख रुपयांना विकली गेली. कलेची निर्मिती जर मनापासून झाली असेल, तर त्याला कोणतीही सीमा नसते, हेच यातून सिद्ध झाले. 'तेच बनव जे तुझा आत्मा सांगेल' हा हुसैन साहेबांचा तो सल्ला आता खरोखरच वास्तवात बदलताना दिसत होता.

फरखंदा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतरही अनेक रंग आहेत. त्यांनी स्वतःला केवळ कॅनव्हासपुरते मर्यादित ठेवले नाही. दिल्लीत असताना त्यांनी प्रसिद्ध रंगभूमी कलाकार यासीन खान यांच्यासोबत मंच सामायिक केला आणि अभिनयाच्या दुनियेतही आपले नशीब आजमावले. त्यांना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या 'डॅडी' या नाटकात अभिनय करण्याची सुवर्णसंधी मिळाली. 

या काळात त्यांनी समाज आणि विशेषतः भारतीय मुस्लिमांच्या जीवनातील एक वेगळेच वास्तव जवळून अनुभवले. भारतीय मुस्लिम हे संपूर्ण जगात सर्वात जास्त आनंदी आहेत, कारण त्यांच्याकडे आपली संस्कृती आणि धर्म आपल्या इच्छेनुसार जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे.

अर्थात, त्यांचा हा कलात्मक प्रवास काट्यांनी भरलेलाही होता. जेव्हा त्यांनी पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजेच मानवी चेहरे बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना समाजातील काही घटकांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागले. त्या काळात धार्मिक आणि पारंपारिक मान्यतांमुळे काही लोक या गोष्टीला योग्य मानत नव्हते. परंतु फरखंदा यांनी या टीकेला स्वतःवर कधीही हावी होऊ दिले नाही. त्यांचा युक्तिवाद अतिशय स्पष्ट आणि सुंदर आहे. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा ही खुदाची एक अनोखी आणि सर्वात सुंदर कलाकृती आहे, असे त्या म्हणतात. देवाच्या या अद्भूत कारागिरीला कॅनव्हासवर चित्रित करणे भला चुकीचे कसे असू शकते? त्यांनी आपल्या विश्वासाला घट्ट धरून ठेवले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून चेहऱ्यांची रूहानियत उकरणे सुरूच ठेवले.

कोरोना महामारीच्या काळानेही फरखंदा यांच्या विचारांवर मोठा प्रभाव पाडला. जगातील भव्यता आणि दिखावा हा केवळ क्षणभंगुर आहे, याची जाणीव त्यांना झाली. एकमेकांबद्दल असलेली दया, करुणा आणि समर्पण यामध्येच जीवनाचे खरे मूल्य दडलेले आहे. खरी शांतता इतरांबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडण्यातच लपलेली आहे, असे त्या मानतात. याच कारणामुळे सूफी चित्रकलेव्यतिरिक्त त्या आता सामाजिक मुद्द्यांवरही आपला ब्रश चालवत आहेत. जलसंकटासारख्या गंभीर विषयावर त्यांनी अनेक पेंटिंग्स बनवल्या आहेत, जेणेकरून लोकांमध्ये पाण्याच्या महत्त्वाबद्दल मोठी जागरूकता निर्माण करता येईल.

आज डॉ. फरखंदा खान फिदा या केवळ एक यशस्वी चित्रकार नाहीत, तर त्या तरुण पिढीसाठी आणि विशेषतः मुलींसाठी एक मोठा प्रेरणास्रोत बनल्या आहेत. त्या दक्षिण दिल्लीत आपले पती आणि दोन मुलांसह राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सातत्याने नवीन पिढीच्या संपर्कात असतात. तरुण पिढीला त्यांचा संदेश अतिशय सोपा आहे, तो म्हणजे कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नाही. मुलींनी कोणत्याही प्रकारच्या सामाजिक किंवा मानसिक बंधनांतून मुक्त होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा आणि आपली प्रतिभा जगासमोर आणावी, अशी शिकवण त्या देतात.

डॉ. फरखंदा खान फिदा यांचा हा कला प्रवास बांदा येथील एका छोट्याशा गावापासून सुरू होऊन आंतरराष्ट्रीय गॅलरीपर्यंत पोहोचण्याची एक सुंदर कथा आहे. आपण जर आपल्या मुळांशी जोडलेले राहिलो आणि आपल्या आत्म्याचा आवाज ऐकला, तर आपण केवळ यशस्वी होत नाही, तर समाजात एक सकारात्मक बदलही घडवून आणू शकतो, हेच ही कथा आपल्याला शिकवते. त्यांच्या पेंटिंग्स म्हणजे केवळ रंगांचा मेळ नाही, तर त्या शांतता, आध्यात्मिकता आणि मानवतेचा एक सुंदर जाहीरनामा आहेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter