अर्सला खान, नवी दिल्ली
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) शिकताना एका विद्यार्थिनीने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. तिथल्या प्रसिद्ध ढाब्यावर चहा पिताना विद्यार्थी लिंगभेद आणि पोषण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असत. याच वातावरणात वाढलेल्या एका तरुणीचा आवाज एक दिवस देशभरातील कोट्यवधी घरांमध्ये पोहोचेल, याची कोणालाच कल्पना नव्हती.
आज तीच विद्यार्थिनी नगमा सहर या नावाने एक प्रसिद्ध न्यूज अँकर म्हणून ओळखली जाते. आज मागे वळून पाहताना स्वतः नगमालाही या प्रवासाचे मोठे आश्चर्य वाटते. जेएनयूच्या सुंदर कॅम्पसपासून ते टेलिव्हिजनच्या पडद्यापर्यंतचा हा प्रवास एखाद्या जादूखालचा वाटतो. या यशामागे तिची अनेक वर्षांची कठोर मेहनत, ग्राउंड रिपोर्टिंग आणि स्वतःला सिद्ध करण्याची प्रबळ इच्छाशक्ती दडलेली आहे.
पाटण्यात जन्मलेल्या नगमाने टीव्ही पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. त्या काळात न्यूजरूममध्ये महिलांना फारसे मानाचे स्थान नव्हते. उच्च शिक्षणासाठी ती पाटण्यावरून दिल्लीला आली. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिने जेएनयूमधून एमफिल पूर्ण केले. तिचा अभ्यासाचा विषय 'जेंडर अँड न्यूट्रिशन' (लिंगभेद आणि पोषण) हा होता.
या विषयामुळे तिला सामाजिक विषमतेकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. कॅमेरा अनेकदा समाजातील दरी टिपू शकत नाही. पण या अभ्यासातून तिला ती दरी स्पष्ट समजली. ग्रामीण विकास क्षेत्रात तिला ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली. तिने पॉप्युलेशन कौन्सिलसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत विविध प्रकल्पांवर काम केले. हाच शैक्षणिक अनुभव तिच्या पत्रकारितेचा भक्कम पाया बनला.

नगमाने १९९९ मध्ये एशियन एज या वृत्तपत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली. पण लवकरच ती टेलिव्हिजनकडे वळली. त्या काळात टीव्ही न्यूजरूममध्ये महिलांना बहुधा साचेबद्ध किंवा मनोरंजनाच्या बातम्या दिल्या जायच्या. पण नगमाने स्वतःला या मर्यादित चौकटीत अडकवून घेण्यास स्पष्ट नकार दिला.
२००३ मध्ये तिने एनडीटीव्ही इंडियासोबत आपल्या करिअरचा नवा टप्पा सुरू केला. तिथे प्राईम-टाईम अँकरिंगसोबतच तिने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन रिपोर्टिंगही केले. तमिळनाडूमध्ये त्सुनामीने थैमान घातले होते. त्यावेळी नगमाने प्रभावित भागात १५ दिवस काढले. सर्वस्व गमावलेल्या लोकांच्या डोळ्यांतील वेदना तिने अगदी जवळून पाहिल्या. मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटांचा थरार, काश्मीरमधील निवडणुका किंवा दिल्ली-लाहोर बससेवेचा ऐतिहासिक शुभारंभ असो, नगमा प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष हजर होती.
तिची बातमी सांगण्याची पद्धत नेहमीच साधी आणि शांत असायची. पण तिचे प्रश्न अत्यंत धारदार आणि थेट असत.

नगमा सहरचा 'सलाम जिंदगी' हा कार्यक्रम वृत्तविश्वात अत्यंत लोकप्रिय ठरला. बहुतांश चॅनेल्स केवळ खळबळजनक बातम्यांच्या मागे धावत होते. अशा वेळी नगमाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून तृतीयपंथी, अमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरुण आणि उपेक्षितांचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणले.
तिने कधीही बातमीतील लोकांचा तमाशा बनू दिला नाही. उलट, तिने त्यांच्या सन्मानाचे नेहमी रक्षण केले. याच कारणामुळे हा कार्यक्रम प्रचंड गाजला आणि टीव्ही पत्रकारितेत एक नवा आदर्श निर्माण झाला.
निवडणुकांच्या कव्हरेजमध्येही नगमाची पद्धत पूर्णपणे वेगळी ठरते. 'इलेक्शन एक्सप्रेस' आणि 'व्होट यात्रा' यांसारख्या कार्यक्रमांमधून तिने आठवडेभर बसने देशभरात प्रवास केला. देशाची नेमकी नस ओळखण्यासाठी ती धूळखात पडलेल्या गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये पोहोचली. निवडणूक रॅली आणि राजकीय चर्चांच्या गोंधळात हरवून जाणारे महिलांची सुरक्षा, बेरोजगारी आणि विकास यांसारखे महत्त्वाचे प्रश्न तिने ठळकपणे समोर आणले.

आज ५२ वर्षीय नगमा एनडीटीव्हीमध्ये वरिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. ती 'इंटरनॅशनल अजेंडा' हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सादर करते. या कार्यक्रमात ती जागतिक राजकारणातील गुंतागुंतीचे विषय सामान्य प्रेक्षकांना सोप्या भाषेत समजावून सांगते. इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धे असोत किंवा संयुक्त राष्ट्रांमधील भारताची बदलती भूमिका असो, नगमा प्रत्येक जागतिक घडामोड भारतीय दृष्टिकोनातून मांडते.
ती केवळ एक न्यूज अँकर नाही. परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख मेळ साधणाऱ्या एका मुस्लिम महिलेचा ती एक खंबीर आवाज आहे. तिने तिहेरी तलाक, मुस्लिम महिलांचे शिक्षण आणि सामाजिक समानता यांसारख्या विषयांवर नेहमीच निर्भयपणे आपले मत मांडले आहे. महिलांना समान वाटा मिळाल्याशिवाय कोणताही समाज खऱ्या अर्थाने प्रगती करू शकत नाही, यावर तिचा ठाम विश्वास आहे.
वैयक्तिक आयुष्यात नगमा एका सुशिक्षित मुस्लिम कुटुंबातून येते. तिच्या रेश्मा आणि सायमा या दोन्ही बहिणी आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. तिचा विवाह राजीव श्रीवास्तव यांच्याशी झाला असून त्यांना इरा ताजीन नावाची एक मुलगी आहे.
न्यूजरूममधील गोंधळ आणि प्राईम टाईमच्या तणावातही नगमा आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला कधीच विसरत नाही. तिला प्रवास करणे, छायाचित्रण, पोहणे आणि पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड आहे. या छंदांमुळेच तिला एक पत्रकार म्हणून आवश्यक असलेला समतोल राखण्यास मोठी मदत मिळते.
जरूर वाचा : राणा सिद्दीकी जमान : पत्रकारितेत स्वतःचा ठसा उमटवणारा एक निर्भय आणि अभ्यासू आवाज
एका पत्रकाराने सर्वप्रथम एक संवेदनशील माणूस असणे आवश्यक असते, हा अत्यंत मोठा संदेश नगमा सहरने आपल्या कृतीतून दिला आहे. जेएनयूच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय न्यूज डेस्कपर्यंत पोहोचला आहे. असे असले तरी, नगमाचा साधेपणा आणि तिचा नम्रपणा आजही तसाच टिकून आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter